Saturday, March 24, 2018

Just for a change :-)

असंच कधीतरी मन उदास होतं
चिडचिड व्हायला लागते
मनासारख्या गोष्टी होत नाहीत
सगळं जग दुष्मन वाटायला लागतं
अगदी अंथरुणातून उठायचंही मन होत नाही

अशावेळी स्वतःला कसं सावरावं?
अनेक तज्ज्ञांनी अनेक उपाय सुचवले असतील
पण माझ्यापुरते मी उपाय शोधून ठेवले आहेत

सकाळी उठल्यावर रोजच्या पेस्टपेक्षा वेगळी पेस्ट ट्राय करावी किंवा चक्क दंतमंजन वापरून बघावं
रोज उजव्या हाताने ब्रश करतो, आज डाव्या हाताने ट्राय करावा.
मग टीव्हीवर म्युझिक चॅनेल्स लावावेत, त्यावरचं मस्त म्युझिक ऐकत कडक चहा घ्यावा.. जरा मनाला उभारी येते.
रोजच्या गरम पाण्याच्या आंघोळीऐवजी थंडगार शॉवर घ्यावा.. पहिल्यांदा पटकन गार पाण्याखाली जायचा धीर होत नाही. निग्रहाने त्या थंड पाण्याच्या वर्षावाखाली जावं आणि तो शहारा मेंदूत रेकॉर्ड करून ठेवावा.
नेहमी डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ घालतो, आज उजव्या हातावर ट्राय करावं
रोज घालतो त्यापेक्षा वेगळा चष्मा घालावा, डावीकडून भांग पाडतो त्याऐवजी उजवीकडून पाडावा.
क्लीन शेव्ह ऐवजी फ्रेंच कट /मिशी ठेवून बघावी

ऑफिसला जर रोज फॉर्मल ड्रेस घालून जात असेल तर आज फॉर अ चेंज एखादा ब्राईट कलरचा शर्ट किंवा टीशर्ट-जीन्स घालून जावं
बाईकवरून ऑफिसला जाताना आजूबाजूच्या गाड्या पहाव्यात.
उगीचच तुमच्या शहराच्या सोडून बाकीच्या शहरांच्या गाड्यांचे पासिंग पहावे, काऊंट वाढवत जावा. उदाहरणार्थ - नाशिक पासिंगच्या १० गाड्या, नगर पासिंगच्या १५ गाड्या, इत्यादी
ऑफिसला जायचा रोजचा रस्ता सोडून एखादा वेगळा रस्ता ट्राय करावा.
रोज ज्या सिक्वेन्सने गाणी ऐकत बाईकवरून जातो त्याऐवजी प्लेलिस्ट शफल मोडमध्ये करून बघायला काय हरकत आहे?
ऑफिसमध्ये रोज जाऊन जे काम करतो त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करावं
नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या लोकांशी संवाद साधावा
लंचला रोज भाजी पोळी खातो त्याऐवजी पास्ता, चायनीज ट्राय करावं

असे अनेक सुहृद, जुने मित्र/नातेवाईक असतात ज्यांच्याशी वर्षानुवर्षे बोलणं झालेलं नसतं
आज वेळात वेळ काढून त्यांना कॉल लावावा आणि मग त्यांचं आश्चर्य उरात भरून घ्यावं. त्या समाधानावर पुढचे कित्येक दिवस जाणार असतात


ऑफिसमधून आज नेहमीपेक्षा लवकर निघावं
घरी कॉल करून सांगावं की आज स्वयंपाक नका करू, आपण बाहेर जेवूया
एखाद्या नाटकाची, चित्रपटाची तिकिटे काढावीत आणि घरच्यांना सरप्राईज द्यावं

ह्या सगळ्याचा हेतू एकच की आपल्या मेंदूला जे रोजच्या रुटीनचं कंडिशनिंग झालंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं,
मेंदूला जरा शॉक द्यावा. आपले सेन्सेस पुन्हा जागृत होतायेत का ते पहावं

शेवटी अंथरुणाला पाठ टेकताना काहीतरी वेगळं केल्याचं नक्कीच समाधान लाभेल.
आयुष्य सुखकर करायला अजून काय हवं असतं?

Friday, March 16, 2018

मन करा रे प्रसन्न...

आताशा असे हे मला काय होते
.
.
.
.
कशी ही अवस्था कुणाला कळावे
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो
असा तोल जाता, कुणी सावरावे..


ह्या संदीप खरेच्या कवितेसारखी कधीतरी अवस्था होते. सगळं छान, मजेत चाललेलं असतं. अचानक तो क्षण येतो जेव्हा उदास वाटायला लागतं, मनावर नैराश्याचे मळभ दाटून येते.

असं का होत असावं? सगळं मनाजोगतं चाललेलं असताना नकळत आपल्या आयुष्याकडून अपेक्षा तर वाढत जात नसतील? मग जरा काही मनाविरुद्ध झालं की औदासिन्य हळूच मनात शिरकाव करत असेल.
मनाला कितीही बजावत राहिलो की आपल्याला कायम सकारात्मक विचार करायचा आहे तरीही नैराश्याची हलकीशी सावलीदेखील पटकन मन ग्रासून टाकते.

आजकाल आपल्या दिनचर्येचा बराचसा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे. सकाळी उठल्यापासून पार डोळे जड होऊन मिटायला लागेस्तोवर आपण व्हाट्सएप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक चेक करत असतो.
ह्या व्हर्च्युअल जगात दिवसरात्र वेळ घालवल्यामुळे प्रचंड शीण येतो, जो अर्थात आपण सोयीस्कररित्या दुर्लक्षतो.

ह्या सोशल मिडीयाच्या नादात अनेक गोष्टींना मुकत असल्याची आज मला प्रकर्षाने जाणीव होतेय.
घरात कॅरम बोर्ड, उनो, पत्ते, बुद्धिबळ आहे. पण कित्येक महिन्यांत त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीये. हे खेळ खेळत असताना जे थेट ह्युमन इन्ट्रॅकशन होतं त्याला तोड नाही.
एका कलीगने 3 महिन्यांपूर्वी एक सुंदर पुस्तक दिलंय, ज्याचं अजून मी पहिलं पानही वाचलं नाही.
केबल/सेट टॉप बॉक्ससाठी वर्षाला हजारो रुपये भरतोय पण अनेक उत्तमोत्तम चित्रपट, डॉक्युमेंट्रीज बघायलाही वेळ मिळत नाहीये.
वाचन, लिखाणासारख्या छंदांकडे दुर्लक्ष होतंय.
वेळ नाहीये हे अर्थातच खरं नाहीये, सोशल मीडियाच्या नादात ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाहीये.

बऱ्याचदा असं होतंय की समोर फूट-दोन फुटांवर बसलेल्या माणसाच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं. जगभर पसरलेल्या लोकांशी चॅटिंग करण्यात आपण बिझी असतो.
आणि हे फक्त आपण नाही तर बऱ्याचदा समोर बसलेला माणूसही तेच करत असतो.
एकमेकांशी समोर बसून गप्पा-टप्पा, हास्य-विनोद करणं हळू हळू कमी होत चाललंय.

ह्या सगळ्या जाणिवा जेव्हा तीव्रतेने बोचायला लागतात, तेव्हा पटकन नैराश्य/विरक्ती येते. 
काहीतरी चुकतंय, हरवतंय ह्याची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते.
मग जालीम उपाय म्हणून तत्परतेने आपण काही व्हाट्सएप ग्रुप्स सोडतो, फेसबुक डीऍक्टिव्हेट करतो, ट्विटर/इंस्टाग्राम अनइंस्टॉल करतो.
अत्युच्च प्रतीचे नैराश्य/विरक्ती आली असेल तर व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतो. स्मार्टफोन सोडून नोकिया आशा वगैरे बेसिक हँडसेट वापरायला लागतो.
अर्थात, ही तात्पुरती मलमपट्टी असते. काही दिवसांत येरे माझ्या मागल्या होऊन ती जखम, खपली धरायच्या अगोदरच, अधिक तीव्रतेने भळाभळा वाहणार असते.

खरं पाहता, हा नक्कीच कायमस्वरूपी तोडगा नाही. वर्षानुवर्षाच्या सहवासातून जोडली गेलेली माणसं ही आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, बोलू शकत नाहीत. हे सर्वजण बहुतांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच संवाद साधत असतात. त्यामुळे सोशल मिडियापासून कायमची फारकत घेण्याला काहीच अर्थ नाहीये.

ह्या प्रश्नावर सखोल विचारमंथन केल्यावर असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठणं महत्वाचं आहे.
एखाद दोन दिवस सोशल मिडियावरचे अपडेट्स पाहिले नाही तर जगबुडी नक्कीच येणार नाही. ह्या गोष्टी फावल्या वेळातच केल्या पाहिजेत.

पण त्याआधी फावल्या वेळाची व्याख्या नक्कीच ठरवायली हवी. जेव्हा खरोखरच तुम्हाला करण्याजोगे काही काम नसेल तो खरा फावला वेळ.
आता काम म्हणजे काय फक्त ऑफिसचं काम नाही, इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.
सोशल मिडीयाच्या अडिक्शन पायी तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय.

रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायम करणं हे अत्यावश्यक आहे.
घरच्या, बाहेरच्या कामांची यादी करून ती वेळच्यावेळी निपटवणे गरजेचं आहे.
आता, उदाहरणार्थ, प्रवास करताना सहप्रवासी चांगला नसेल तर त्यावेळी नक्कीच सोशल मिडियावर वेळ घालवणं योग्य आहे. पण जरका सहप्रवासी इंटरेस्टिंग असेल आणि त्याच्याकडून ४ अनुभवाच्या, मौलिक गोष्टींचं ज्ञान मिळणार असेल तर त्याच्याशी थेट संवाद साधणं जास्त महत्वाचं.

अति सर्वत्र वर्जयेत ह्या उक्तीनुसार वागलं तर सगळ्या गोष्टींचा नक्कीच उत्तम मेळ घालता येईल.
आपल्या मागल्या पिढीने विचारही केला नसेल अशी भौतिक सुखं आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण ह्या सगळ्यापेक्षा अपेक्षित असं मानसिक समाधान लाभतंय का ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे.

शेवटी काय, जीवन सुंदर, अर्थपूर्ण, समतोल बनवणं महत्वाचं. ते जर साधता येत नसेल तर नैराश्य तुमच्या दाराशी उभं आहेच.