tag:blogger.com,1999:blog-15268073860422574202024-02-19T17:27:09.821+05:30सुचेल तसं....Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.comBlogger29125tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-73037093848848889522018-03-24T04:52:00.000+05:302018-03-24T04:52:36.724+05:30Just for a change :-)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
असंच कधीतरी मन उदास होतं<br />
चिडचिड व्हायला लागते<br />
मनासारख्या गोष्टी होत नाहीत<br />
सगळं जग दुष्मन वाटायला लागतं<br />
अगदी अंथरुणातून उठायचंही मन होत नाही<br />
<br />
अशावेळी स्वतःला कसं सावरावं?<br />
अनेक तज्ज्ञांनी अनेक उपाय सुचवले असतील<br />
पण माझ्यापुरते मी उपाय शोधून ठेवले आहेत<br />
<br />
सकाळी उठल्यावर रोजच्या पेस्टपेक्षा वेगळी पेस्ट ट्राय करावी किंवा चक्क दंतमंजन वापरून बघावं<br />
रोज उजव्या हाताने ब्रश करतो, आज डाव्या हाताने ट्राय करावा.<br />
मग टीव्हीवर म्युझिक चॅनेल्स लावावेत, त्यावरचं मस्त म्युझिक ऐकत कडक चहा घ्यावा.. जरा मनाला उभारी येते.<br />
रोजच्या गरम पाण्याच्या आंघोळीऐवजी थंडगार शॉवर घ्यावा.. पहिल्यांदा पटकन गार पाण्याखाली जायचा धीर होत नाही. निग्रहाने त्या थंड पाण्याच्या वर्षावाखाली जावं आणि तो शहारा मेंदूत रेकॉर्ड करून ठेवावा.<br />
नेहमी डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ घालतो, आज उजव्या हातावर ट्राय करावं<br />
रोज घालतो त्यापेक्षा वेगळा चष्मा घालावा, डावीकडून भांग पाडतो त्याऐवजी उजवीकडून पाडावा.<br />
क्लीन शेव्ह ऐवजी फ्रेंच कट /मिशी ठेवून बघावी<br />
<br />
ऑफिसला जर रोज फॉर्मल ड्रेस घालून जात असेल तर आज फॉर अ चेंज एखादा ब्राईट कलरचा शर्ट किंवा टीशर्ट-जीन्स घालून जावं<br />
बाईकवरून ऑफिसला जाताना आजूबाजूच्या गाड्या पहाव्यात.<br />
उगीचच तुमच्या शहराच्या सोडून बाकीच्या शहरांच्या गाड्यांचे पासिंग पहावे, काऊंट वाढवत जावा. उदाहरणार्थ - नाशिक पासिंगच्या १० गाड्या, नगर पासिंगच्या १५ गाड्या, इत्यादी<br />
ऑफिसला जायचा रोजचा रस्ता सोडून एखादा वेगळा रस्ता ट्राय करावा.<br />
रोज ज्या सिक्वेन्सने गाणी ऐकत बाईकवरून जातो त्याऐवजी प्लेलिस्ट शफल मोडमध्ये करून बघायला काय हरकत आहे?<br />
ऑफिसमध्ये रोज जाऊन जे काम करतो त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करावं<br />
नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या लोकांशी संवाद साधावा<br />
लंचला रोज भाजी पोळी खातो त्याऐवजी पास्ता, चायनीज ट्राय करावं<br />
<br />
असे अनेक सुहृद, जुने मित्र/नातेवाईक असतात ज्यांच्याशी वर्षानुवर्षे बोलणं झालेलं नसतं<br />
आज वेळात वेळ काढून त्यांना कॉल लावावा आणि मग त्यांचं आश्चर्य उरात भरून घ्यावं. त्या समाधानावर पुढचे कित्येक दिवस जाणार असतात<br />
<br />
<br />
ऑफिसमधून आज नेहमीपेक्षा लवकर निघावं<br />
घरी कॉल करून सांगावं की आज स्वयंपाक नका करू, आपण बाहेर जेवूया<br />
एखाद्या नाटकाची, चित्रपटाची तिकिटे काढावीत आणि घरच्यांना सरप्राईज द्यावं<br />
<br />
ह्या सगळ्याचा हेतू एकच की आपल्या मेंदूला जे रोजच्या रुटीनचं कंडिशनिंग झालंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं,<br />
मेंदूला जरा शॉक द्यावा. आपले सेन्सेस पुन्हा जागृत होतायेत का ते पहावं<br />
<br />
शेवटी अंथरुणाला पाठ टेकताना काहीतरी वेगळं केल्याचं नक्कीच समाधान लाभेल.<br />
आयुष्य सुखकर करायला अजून काय हवं असतं?</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-63787578757623597252018-03-16T03:44:00.005+05:302018-03-16T03:44:59.871+05:30मन करा रे प्रसन्न...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आताशा असे हे मला काय होते<br />
.<br />
.<br />
.<br />
.<br />
कशी ही अवस्था कुणाला कळावे<br />
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...<br />
किती खोल जातो, तरी तोल जातो<br />
असा तोल जाता, कुणी सावरावे..<br />
<br />
<br />
ह्या संदीप खरेच्या कवितेसारखी कधीतरी अवस्था होते. सगळं छान, मजेत चाललेलं असतं. अचानक तो क्षण येतो जेव्हा उदास वाटायला लागतं, मनावर नैराश्याचे मळभ दाटून येते.<br />
<br />
असं का होत असावं? सगळं मनाजोगतं चाललेलं असताना नकळत आपल्या आयुष्याकडून अपेक्षा तर वाढत जात नसतील? मग जरा काही मनाविरुद्ध झालं की औदासिन्य हळूच मनात शिरकाव करत असेल.<br />
मनाला कितीही बजावत राहिलो की आपल्याला कायम सकारात्मक विचार करायचा आहे तरीही नैराश्याची हलकीशी सावलीदेखील पटकन मन ग्रासून टाकते.<br />
<br />
आजकाल आपल्या दिनचर्येचा बराचसा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे. सकाळी उठल्यापासून पार डोळे जड होऊन मिटायला लागेस्तोवर आपण व्हाट्सएप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक चेक करत असतो.<br />
ह्या व्हर्च्युअल जगात दिवसरात्र वेळ घालवल्यामुळे प्रचंड शीण येतो, जो अर्थात आपण सोयीस्कररित्या दुर्लक्षतो.<br />
<br />
ह्या सोशल मिडीयाच्या नादात अनेक गोष्टींना मुकत असल्याची आज मला प्रकर्षाने जाणीव होतेय.<br />
घरात कॅरम बोर्ड, उनो, पत्ते, बुद्धिबळ आहे. पण कित्येक महिन्यांत त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीये. हे खेळ खेळत असताना जे थेट ह्युमन इन्ट्रॅकशन होतं त्याला तोड नाही.<br />
एका कलीगने 3 महिन्यांपूर्वी एक सुंदर पुस्तक दिलंय, ज्याचं अजून मी पहिलं पानही वाचलं नाही.<br />
केबल/सेट टॉप बॉक्ससाठी वर्षाला हजारो रुपये भरतोय पण अनेक उत्तमोत्तम चित्रपट, डॉक्युमेंट्रीज बघायलाही वेळ मिळत नाहीये.<br />
वाचन, लिखाणासारख्या छंदांकडे दुर्लक्ष होतंय.<br />
वेळ नाहीये हे अर्थातच खरं नाहीये, सोशल मीडियाच्या नादात ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाहीये.<br />
<br />
बऱ्याचदा असं होतंय की समोर फूट-दोन फुटांवर बसलेल्या माणसाच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं. जगभर पसरलेल्या लोकांशी चॅटिंग करण्यात आपण बिझी असतो.<br />
आणि हे फक्त आपण नाही तर बऱ्याचदा समोर बसलेला माणूसही तेच करत असतो.<br />
एकमेकांशी समोर बसून गप्पा-टप्पा, हास्य-विनोद करणं हळू हळू कमी होत चाललंय.<br />
<br />
ह्या सगळ्या जाणिवा जेव्हा तीव्रतेने बोचायला लागतात, तेव्हा पटकन नैराश्य/विरक्ती येते. <br />
काहीतरी चुकतंय, हरवतंय ह्याची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते.<br />
मग जालीम उपाय म्हणून तत्परतेने आपण काही व्हाट्सएप ग्रुप्स सोडतो, फेसबुक डीऍक्टिव्हेट करतो, ट्विटर/इंस्टाग्राम अनइंस्टॉल करतो.<br />
अत्युच्च प्रतीचे नैराश्य/विरक्ती आली असेल तर व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतो. स्मार्टफोन सोडून नोकिया आशा वगैरे बेसिक हँडसेट वापरायला लागतो.<br />
अर्थात, ही तात्पुरती मलमपट्टी असते. काही दिवसांत येरे माझ्या मागल्या होऊन ती जखम, खपली धरायच्या अगोदरच, अधिक तीव्रतेने भळाभळा वाहणार असते.<br />
<br />
खरं पाहता, हा नक्कीच कायमस्वरूपी तोडगा नाही. वर्षानुवर्षाच्या सहवासातून जोडली गेलेली माणसं ही आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, बोलू शकत नाहीत. हे सर्वजण बहुतांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच संवाद साधत असतात. त्यामुळे सोशल मिडियापासून कायमची फारकत घेण्याला काहीच अर्थ नाहीये.<br />
<br />
ह्या प्रश्नावर सखोल विचारमंथन केल्यावर असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठणं महत्वाचं आहे.<br />
एखाद दोन दिवस सोशल मिडियावरचे अपडेट्स पाहिले नाही तर जगबुडी नक्कीच येणार नाही. ह्या गोष्टी फावल्या वेळातच केल्या पाहिजेत.<br />
<br />
पण त्याआधी फावल्या वेळाची व्याख्या नक्कीच ठरवायली हवी. जेव्हा खरोखरच तुम्हाला करण्याजोगे काही काम नसेल तो खरा फावला वेळ.<br />
आता काम म्हणजे काय फक्त ऑफिसचं काम नाही, इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.<br />
सोशल मिडीयाच्या अडिक्शन पायी तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय.<br />
<br />
रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायम करणं हे अत्यावश्यक आहे.<br />
घरच्या, बाहेरच्या कामांची यादी करून ती वेळच्यावेळी निपटवणे गरजेचं आहे.<br />
आता, उदाहरणार्थ, प्रवास करताना सहप्रवासी चांगला नसेल तर त्यावेळी नक्कीच सोशल मिडियावर वेळ घालवणं योग्य आहे. पण जरका सहप्रवासी इंटरेस्टिंग असेल आणि त्याच्याकडून ४ अनुभवाच्या, मौलिक गोष्टींचं ज्ञान मिळणार असेल तर त्याच्याशी थेट संवाद साधणं जास्त महत्वाचं.<br />
<br />
<b>अति सर्वत्र वर्जयेत</b> ह्या उक्तीनुसार वागलं तर सगळ्या गोष्टींचा नक्कीच उत्तम मेळ घालता येईल.<br />
आपल्या मागल्या पिढीने विचारही केला नसेल अशी भौतिक सुखं आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण ह्या सगळ्यापेक्षा अपेक्षित असं मानसिक समाधान लाभतंय का ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे.<br />
<br />
शेवटी काय, जीवन सुंदर, अर्थपूर्ण, समतोल बनवणं महत्वाचं. ते जर साधता येत नसेल तर नैराश्य तुमच्या दाराशी उभं आहेच.</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-72873664316437994592017-12-19T04:07:00.000+05:302017-12-19T04:07:06.501+05:30शाळा बिळा आणि बरंच काही...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
माझा मुलगा जवळच्याच एका शाळेत जातो. त्याच्या शाळेत एक दिवस छोट्याश्या स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा तास असतो, एखाद दिवशी मातीमध्ये खेळायचा तास असतो. वार्षिक स्नेहसंमेलनात तो व्हेंगाबॉईजच्या "गोईंग टू इबिझ्झा" गाण्यावर डान्स करतो आणि ह्या सगळ्यांतून वेळ मिळाला की थोडाफार अभ्यासही करतो.<br />
पुढे पुढे तर त्यांना स्केटिंगचा, टेनिसचा ही तास असेल.<br />
<br />
मला अनेकदा माझे शाळेचे दिवस आठवतात. रोज पाच गणितं वहीत सोडवून आणायची, अचानक उभं केल्यावर पाठयपुस्तकातला उतारा वाचवून दाखवायचा, शिक्षक सांगतील ते ईमान इतबारे वहीत शक्यतो सुवाच्च अक्षरात उतरवून घ्यायचं, रोज न चुकता गृहपाठ पूर्ण करायचा अशी अनेक अवघड कामं असायची<br />
<br />
शिवाय, राजा रवी वर्मा किंवा एम एफ हुसेननी कोपरापासून हात जोडावेत अशी चित्रं काढणं, कार्यानुभवाच्या तासाला वाट्टेल त्या आकाराच्या कागदी आकृत्या बनवणं(अजूनही मला होडी आणि विमानाशिवाय दुसरं काही येत नाही :-)), प्रयोगशाळेत जे समोर येईल ते विचार न करता एकमेकांत मिसळून कुठल्यातरी<br />
नव्या वायूचा शोध जगाला बहाल करणं, पायथागोरसनी निवृत्ती स्वीकारावी असल्या अफाट भूमितीच्या आकृत्या काढणं,<br />
महाराष्ट्रात चहा तर आसामात ऊसाची लागवड करणं, अकबराकडून ताजमहाल बांधून घेणं, इतिहासाच्या पुस्तकातल्या (स्त्री असो की पुरुष) सगळ्यांना दाढी मिशा काढणं असे अनेक सर्जनशील प्रयोग करत राहिलो.<br />
<br />
खरं सांगायचं तर शाळेतला प्रत्येक दिवस हा कुरुक्षेत्रावर लढायला निघालेल्या योद्धापेक्षा कमी नव्हता. ह्या संग्रामात यशस्वी होण्यापेक्षा घायाळ व्हायचे प्रसंगच अधिक आले.<br />
प्रगतीपुस्तक वेळेवर दिलं नाही म्हणून किंवा गृहपाठ केला नाही म्हणून किंवा शिक्षक शिकवत असताना मध्येच हसलो म्हणून गदा, भाले, बाणांनी अनेकवेळा जखमी व्हायची वेळ आली.<br />
सुदैवाने ह्या संग्रामात कधी धारातीर्थी पडलो नाही.<br />
<br />
मुस्काडास्त्र, गुद्देअस्त्र, टपलास्त्र, धपाटास्त्र, चिमटास्त्र, कानपिरगाळास्त्र, फूटपट्टास्त्र, डस्टरास्त्र, रुळास्त्र अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग होऊनही शाळेतून सहीसलामत बाहेर पडलो :-)<br />
<br />
हे सगळं वाचून कदाचित तुम्हांला वाटेल की सगळंच उदासवाणं, निराशाजनक होतं. पण नाही, ह्या सगळ्यातूनही जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा मजा लुटली.<br />
<br />
माझ्या मागे आशिष रसाळ नावाचा मुलगा बसायचा. राष्ट्रगीताच्या वेळी जेव्हा "तव शुभ नाम जागे, तव शुभ आशिष मागे" यायचं तेव्हा मी हमखास मागे वळून आशिषकडे बघत हसायचो (ह्याकरिता मी अगणित वेळा मार खाल्ला आहे :-))<br />
<br />
मोनेकला मंदिरात एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी सगळे जमायचो तेव्हा मी पुढे बसलेल्या दोन वर्गमित्रांच्या दप्तरांचे बंद एकमेकांना बांधायचो. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा ते उठायचे, तेव्हा काय व्हायचं ह्याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.<br />
<br />
तास चालू असताना तोंड कमीत कमी हलवून जेव्हा बोरकूट किंवा लेमनची गोळी चघळायचो तेव्हा ती मजा काही और होती.<br />
<br />
शेजाऱ्याचं लक्ष नसताना त्याच्या चायना पेन मधली शाई जेव्हा त्या पेनच्या झाकणात पुरेपूर ओतायचो आणि जेव्हा तो लिहायला पेन उघडायचा तेव्हाची मजा शब्दातीत आहे.<br />
<br />
व्हीक्स इन्हेलर उघडून जेव्हा त्याच्या आतली नळी डोळ्याला हलकेच लावून डोळ्यांतून पाणी काढायचो आणि आजारी आहे सांगत घरी पळायचो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.<br />
<br />
आजोबांची शिंकणी आणून जेव्हा शेजाऱ्याला हुंगायला दिली होती त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ते सांगणं अवघड आहे :-)<br />
<br />
अशा असंख्य मजेशीर आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत.<br />
शाळेविषयी मला अजिबात कटुता नाही. कदाचित त्या काळातल्या बहुसंख्य मराठी शाळा ह्याच धाटणीच्या असतील. तेव्हाची ती सर्वरूढ पद्धत असेल.<br />
<br />
आज ह्या शाळेमुळेच आपलं पहिलं गेट टू गेदर झालं. जुने मित्र भेटले, तेव्हा न भेटलेले अनेक नवे मित्रही झाले. अजून काय हवं?<br />
आपल्या सगळ्यांच्या मनात शाळेबद्दल कडू-गोड आठवणी असतीलही पण आपल्या सगळ्यांना आज बांधून ठेवणारा, जोडणारा हाच तर तो धागा आहे. </div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-81934497099267695652017-11-07T01:33:00.002+05:302023-05-07T06:42:11.065+05:30Life is beautiful<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काही चित्रपट असे असतात की ते पाहताना आपण खळखळून हसतो तर काही चित्रपट पाहताना आपण भारावून जातो. काही चित्रपट पाहताना आपल्याला अश्रू अनावर होतात तर काही आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात आणि काही आपल्याला मानवी जीवनमूल्यांचं उत्तुंग दर्शन घडवतात.. खरंय ना?<br />
आणि हे सगळे अनुभव एकाच चित्रपटात अनुभवायला मिळाले तर? तर मग त्याच्यासारखा दुसरा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स नाही...<br />
<br />
नाझी हुकूमशहा हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांवर अनेक चित्रपट बनले, बनत राहतील.. स्पिलबर्गसारख्या अद्भुत माणसाच्या मुशीतून साकारलेल्या शिंडलर्स लिस्ट सारख्या चित्रपटानंतर (ज्याला ऑस्कर मिळालंय) अजून काय पाहण्यासारखं राहतं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे..<br />
<br />
खरं तर ज्यू समाजाच्या अत्याचारांवर, जो अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय आहे, चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण इटालियन दिग्दर्शक आणि अभिनेता रॉबेर्तो बेनिनी (roberto benigni) ह्याने ते लीलया पेललंय..<br />
<br />
लाईफ इज ब्युटीफुल ह्या चित्रपटाच्या कथेचे ढोबळमानाने दोन भाग पाडता येतील. पहिला म्हणजे रॉबेर्तोची प्रेमकथा आणि दुसरा म्हणजे ज्यू छळछावणीतील त्याच्या आयुष्याचा प्रवास.<br />
ही कथा १९३९ पासून सुरू होते. शहरामध्ये नशीब काढायला, पुस्तकाचं दुकान उघडायला आलेला आपला हा नायक त्याच्या काहीशा वेंधळ्या, निष्पाप, विनोदी कृत्यांनी धमाल उडवून देतो.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGgYXgt2x-HvId5mqXGutipSqUG-hpvUL4hmuSFlaRVpnEFWJKvxk6HcQDgXebfgXoG277xys3arxjzZp8TabkJbUSnCxxrvFW0xnToIV7ocI75khevwxVVfc-8vNRWobZoOD6BQhBkOI/s1600/unnamed.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="286" data-original-width="500" height="182" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGgYXgt2x-HvId5mqXGutipSqUG-hpvUL4hmuSFlaRVpnEFWJKvxk6HcQDgXebfgXoG277xys3arxjzZp8TabkJbUSnCxxrvFW0xnToIV7ocI75khevwxVVfc-8vNRWobZoOD6BQhBkOI/s320/unnamed.gif" width="320" /></a></div>
<br />
दरम्यानच्या काळात उदरनिर्वाहासाठी तो त्याच्या काकांच्या उपहारगृहात वेटरची नोकरीही करतो.<br />
तिथे तो त्याच्या आनंदी, उत्साही स्वभावाने ग्राहकांची मनं जिंकून घेतो.<br />
<br />
कर्मधर्मसंयोगाने त्याला त्याची नायिकाही(जी त्याच्या खऱ्या आयुष्यातली पत्नी आहे) वारंवार ह्या ना त्या कारणाने भेटत राहते.. तिच्या हृदयात आपलं स्थान मिळवण्यासाठी तो अचाट मार्ग शोधत राहतो..<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzQLy1IIT-eiyEP_uSTT1rtOSmHtmC3GC5rzMG4IlikF-egOxpK9mCY4u6Ker2rPyGg-hVFf8Wf_Vj-PPnzFyZqIYHbZL3iHFYxuaLIwIBf5OtTCefyFQH8nGMq3EEERysdsrnWOGajmI/s1600/unnamed+%25282%2529.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="140" data-original-width="245" height="182" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzQLy1IIT-eiyEP_uSTT1rtOSmHtmC3GC5rzMG4IlikF-egOxpK9mCY4u6Ker2rPyGg-hVFf8Wf_Vj-PPnzFyZqIYHbZL3iHFYxuaLIwIBf5OtTCefyFQH8nGMq3EEERysdsrnWOGajmI/s320/unnamed+%25282%2529.gif" width="320" /></a></div>
<br />
<br />
अखेर आपला भोळाभाबडा, जिंदादिल नायक तिचं मन जिंकून घेतो आणि एका अत्यंत नाट्यमय प्रसंगातून तिला पळवून नेत तिच्याशी लग्नही करतो..<br />
<br />
नायिकेच्या आईला आपल्या मुलीचं एका कफल्लक, ज्यू माणसाशी झालेलं लग्न कदापि मान्य नसतं.<br />
कथेच्या हा पहिला भाग जरी हलका फुलका असला तरीही आपल्याला अधून मधून इटलीत उसळलेली ज्यू द्वेषाची चुणूक पहायला मिळते. रॉबेर्तोचे करुण रसात्मक विनोदी प्रसंग आपल्याला चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांची आठवण नक्कीच करून देतात.<br />
<br />
चित्रपटाचा आत्मा हा कथेचा दुसरा भाग आहे.<br />
रॉबेर्तोच्या लग्नानंतर थेट आपल्याला त्याचा छोटा मुलगा भेटतो. कथेच्या ह्या भागेत वडील-मुलाच्या नात्यातले हळुवार पदर उलगडले जातात. मुलाच्या सुखासाठी जीवाचं रान करणारा रॉबेर्तो आपल्याला भेटतो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhET29qzQVYMO39IbgnBxqIT8HmBEzDowUfnP4cTTIUC7EAiqUHhKMz0Fyzcaspj6gJUpnWFbpgdiJ2vNWAATaqKOk-ig3ulgyUcW8GPuT2I0J736Z6KTWTBkQZ9ZGRu2vchgdAAPwxiGY/s1600/unnamed+%25281%2529.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="158" data-original-width="245" height="205" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhET29qzQVYMO39IbgnBxqIT8HmBEzDowUfnP4cTTIUC7EAiqUHhKMz0Fyzcaspj6gJUpnWFbpgdiJ2vNWAATaqKOk-ig3ulgyUcW8GPuT2I0J736Z6KTWTBkQZ9ZGRu2vchgdAAPwxiGY/s320/unnamed+%25281%2529.gif" width="320" /></a></div>
<br />
<br />
नायिकेची आई कपटी चाल खेळते आणि रॉबेर्तो, त्याचा मुलगा, काकाची ज्यू असल्या कारणाने छळछावणीत रवानगी होते. आपली नायिका, जन्माने ज्यू नसली तरीही, हट्टाने त्यांच्यासोबत आगगाडीत चढते.<br />
<br />
चित्रपटाच्या ह्या भागात रॉबेर्तो त्याच्यातल्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यातले अत्युच्च कौशल्य दाखवतो.<br />
जेव्हा एक नाझी ऑफिसर कैद्यांना सूचना द्यायला येतो तेव्हा रॉबेर्तो त्याला जर्मन येतं अशी बेलामूम थाप मारतो आणि त्याच्या मुलासमोर त्या ऑफिसरच्या सुचनांचं ढळढळीत खोटं भाषांतर करत खेळाचे नियम सांगतो..<br />
<br />
आपण एक खेळ खेळायला जात असून जो कोणी सर्वप्रथम हजार पॉईंट्स मिळवेल त्याला एक खराखुरा टॅंक बक्षीस म्हणून मिळेल अशी रॉबेर्तो कथा त्याच्या मुलासमोर रचतो.<br />
हा प्रसंग म्हणा किंवा शॉवर घेण्याच्या नावाखाली लहानग्या ज्यू मुलांना यमदसनी धाडण्यात येते आणि रॉबेर्तो स्वतःच्या मुलाला कसे वाचवतो तो प्रसंग म्हणा किंवा संधी मिळाल्यावर स्पीकरवरून लेडीज सेक्शनमध्ये असलेल्या बायकोशी रॉबेर्तो कशा प्रकारे संवाद साधतो तो प्रसंग म्हणा असे अनेक काळजाला भिडणारे प्रसंग चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आहेत.<br />
<br />
आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे जरी रॉबेर्तोला माहीत असले तरी तो आपल्या लहानग्या, कोवळ्या मुलाला येऊ घातलेल्या भीषण परिस्थितीची जाणीव न करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.<br />
<br />
शेवटी रॉबेर्तो, त्याचा मुलगा आणि बायको ह्यांची सहीसलामत सुटका होते की त्यांचं आयुष्य छळछावणीत संपुष्टात येतं हे पडद्यावर पहाणचं योग्य ठरेल..<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQoAJcuCpRQUd5hnLz4sVlWRi7RZK0f9vdMWEBL3fJKIgxHVsvo-Ilh-ZEE-LQ29Sejigr1LF1FHO_XtpnZgIogb3VaqudvRfiuqaHqv8UyjGnOO9iY8G7O7xIJNQRPC7zcVGnUGdAHaE/s1600/unnamed+%25283%2529.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="170" data-original-width="245" height="221" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQoAJcuCpRQUd5hnLz4sVlWRi7RZK0f9vdMWEBL3fJKIgxHVsvo-Ilh-ZEE-LQ29Sejigr1LF1FHO_XtpnZgIogb3VaqudvRfiuqaHqv8UyjGnOO9iY8G7O7xIJNQRPC7zcVGnUGdAHaE/s320/unnamed+%25283%2529.gif" width="320" /></a></div>
<br />
<br />
हा चित्रपट रुबिनो सलमोनिच्या "आय बीट हिटलर" ह्या पुस्तकावर आणि रॉबेर्तोच्या वडिलांच्या जर्मन छावणीत 2 वर्ष काढलेल्या अनुभवावर आधारीत आहे.<br />
<br />
लाईफ ईज ब्युटीफुलला जशी लोकमान्यता मिळाली तशी राजमान्यतही मिळाली. ह्या चित्रपटाने 4 ऑस्कर अवॉर्डस मिळवले.<br />
<br />
हा चित्रपट का पहावा? ह्याची अनेक कारणं आहेत. तुमच्याकडे जर विनोदबुद्धी आणि जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अत्यंत प्रतिकूल आयुष्यालाही तुम्ही सुसह्य बनवू शकता. रॉबेर्तो आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवघेण्या संकटांसमोर आपल्याला स्वतःचे प्रश्न अगदी क्षुल्लक वाटू लागतात.<br />
<br />
जेव्हा आपल्या आयुष्यात मनासारखं घडत नसेल, नकारात्मक विचारांनी आपला ताबा घेतला असेल तेव्हा हा चित्रपट नक्कीच दिपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल ह्यात शंका नाही.</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-85839554309402006902017-07-09T20:57:00.000+05:302017-07-09T20:57:38.512+05:30मी टाईपरायटर बोलतोय<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
माझ्या प्रिय मित्र/मैत्रिणींनो,<br />
<br />
मी टाईपरायटर बोलतोय.. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या निर्जीव टाईपरायटरला अचानक वाचा कशी फुटली? दिवा विझण्याआधी जसा अचानक मोठा होतो ना तसाच तुम्हां सगळ्यांचा शेवटचा निरोप घेण्याआधी परमेश्वराने मला वाचा बहाल केली असावी...<br />
<br />
तसा मी दीर्घायुषी बरंका.. जेव्हा तुमचे आजोबाही जन्मले नसतील त्या काळात, साता समुद्रापलिकडे, अमेरिकेत माझा जन्म झाला.. सगळं जग पादाक्रांत करत करत भारतात यायला मला जरा उशीरच झाला..<br />
पण तुम्ही लोकांनी मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो आश्चर्यकारकच होता...<br />
रेमिंगटन, गोदरेजसारख्या मोठमोठ्या कंपनीज मला तयार करायला पुढे सरसावल्या.. आधी फक्त इंग्लिश मग मराठी, हिंदी अशा तुमच्या स्थानिक भाषांकरीताही माझे कीबोर्ड बनू लागले...<br />
<br />
न्यायालयात, शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रात अशा सगळीकडे माझा बोलबाला सुरू झाला आणि मग हळू हळू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावात टंकलेखन संस्थांचा उदय झाला.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दहावी/बारावी झालं की टायपिंग शिकायला मुला/मुलींची झुंबड उडू लागली.. नोकरीच्या मुलाखतीसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट अनिवार्य होऊन गेलं.. आणि काय सांगू, मला ह्या जगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव व्हायला लागली...<br />
<br />
खरं सांगू, माझी जन्मभूमी जरी अमेरिका असली ना तरीही मला तुम्हां भारतीयांकडूनच भरभरून प्रेम मिळालंय.. तुम्ही लोकं तुमची मुलं दमून भागून अस्ताव्यस्त झोपली की हळूच त्यांच्यावर मायेचं पांघरूण घालायचे ना तसंच तुमच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लोकांनी दिवसभर मला यथेच्छ वापरलं की शेवटी तुम्ही मला मायेने कव्हर घालायचे.. तुमच्या मुलांसारखंच मग मीही गाढ झोपी जायचो... आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवायचे ना तसंच मलाही कव्हर काढून, व्यवस्थित पुसून पहिल्या बॅचसाठी तयार करायचे...<br />
<br />
मी वरकरणी जरी निर्जीव यंत्र वाटत असलो ना तरी माझ्याही अंगावर रोमांच उभे रहायचे, आनंदानी मीही बहरून जायचो..<br />
तुमच्या कोणत्यातरी एका सणाला तुम्ही लोकं हळद, कुंकू, फुलं वाहून माझी पूजा करायचे... त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून जायचा.. त्यावेळी कदाचित तुम्हाला माझ्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू दिसले नसतील.. पण खरंच सांगतो मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं..<br />
<br />
आज मागे वळून पाहताना जाणवतंय की तुम्हां सगळ्यांच्या प्रत्येक सुख दुःखाचा मी साक्षीदार राहिलो आहे..<br />
इन्स्टिट्यूट/जॉबवर्क सुरू केल्यानंतरचा तुमचा संघर्षाचा काळ, लग्नकार्य, नव्या घरात प्रवेश, मुलांची शिक्षणं अशा प्रत्येक प्रसंगी तुमच्या घरातलाच एक सदस्य असल्याची जाणीव होत राहिली... तुमच्या यशापशयात आपण दोघेही एकमेकांना घट्ट धरून वाटचाल करत राहिलो, अजून काय पाहिजे?<br />
<br />
टायपिंगच्या परीक्षांच्या वेळी तुम्ही मला हातगाडी, रिक्षा, टेम्पो जे साधन मिळेल आणि मुख्य म्हणजे परवडेल त्यात घालून परीक्षा केंद्रात न्यायचे...तेव्हा मला हादरे बसायचे, हाडं खिळखिळी व्हायची पण केवळ तुमच्या प्रेमाखातर मी सगळं सहन करत आलो आहे... नाही नाही तक्रार करत नाहीये पण आजची ही शेवटची संधी समजून माझं मन मोकळं करतोय..<br />
<br />
asdf ;lkj पासून ते थेट लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज पर्यंतची माझ्या मित्र मैत्रिणींची प्रगती पाहिली की सगळे कष्ट विसरायला व्हायचे...मला हात असते ना तर मी नक्कीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती..<br />
<br />
मी यशाच्या शिखरावर होतो आणि मग संगणक क्रांती झाली...<br />
घराघरात, गावागावात संगणक पोहोचले आणि मला कळून चुकलं की ह्या झंझावतात माझा फार काळ निभाव लागणार नाही..<br />
बदल हा सृष्टीचा नियमच आहे म्हणा...जिथे अवाढव्य, सर्वशक्तिशाली डायनासोर पृथ्वीच्या उदरात गडप झाले तिथे माझ्यासारख्या एका छोट्या यंत्राचं काय घेऊन बसलात..<br />
<br />
आता ही येणारी परीक्षा संपली की माझाही खडखडाट थांबणार..आणि मग माझं काय करायचं हा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील.. तुमच्यातले काही जण मला कवडीमोल भावात विकून टाकाल...काहीजण ओळखीच्या लोकांत वाटून टाकाल...काही जणांना मला निरोप देणं जड जाईल, काही प्रॅक्टिकल (माझ्या अमेरिकेत आहेत तशी) लोकं म्हणतील एवढं काय मनाला लावून घ्यायचं? निर्जीव यंत्रच होतं ना ते.. ते ऐकून कदाचित मला वाईट वाटेल.. तुमच्या आठवणींत तरी मला जिवंत ठेवाल ना? असा विचारायचा मोहसुद्धा होईल..<br />
<br />
बघा, तुम्ही भारतीयांसोबत राहून मीही इमोशनल बनलो आहे.. संगत का असर, दुसरं काय? :-) अलविदा!!!!</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-33995975715399433912016-08-26T04:30:00.004+05:302016-09-01T02:12:24.792+05:30हजारो ख्वाहिशें ऐसी....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काही महिन्यांपूर्वीच मी माझा 35 वा बड्डे धुमधडाक्यात साजरा केला. आयुष्याच्या ह्या स्टेजला खरंतर मी (आणि माझे बव्हतांशी समवयस्क मित्र/मैत्रिणी) खुश असायला हवेत..... आर्थिक, सामाजिक, इत्यादी इत्यादी सगळं स्वातंत्र्य कमावलं आहे... आयुष्याच्या जहाजाचं सुकाणू आपल्या हातात आहे..त्याला आपण जिथे पाहिजे तिथे घुमवू शकतो.... आहे कि नाही मजा?<br />
<br />
पण दुर्दैवाने माझे काही दोस्त ह्या स्टेजला "आलिया भोगासी असावे सादर", "आता उरलो उपकारापुरता", "आता काय राहिलंय आयुष्यात", "चाळीशी जवळ आलीये' अशा टाईपचा निराशावादी विचार करतात तेव्हा मला आश्चर्यचकित व्हायला होतं...<br />
<br />
माझ्यापुरतं म्हणाल तर मी थोडंफार कमावलंय, थोडं फार शिकलोय आणि अजून खूप काही मिळवायचंय असाच विचार येतो.. मुलं किती मोठं झालीयेत, पुढे खर्च किती आहेत, शरीराला काय काय व्याधी जडल्यायेत हे क्षुल्लक विचार आहेत..<br />
<br />
आता बघा हां, अजूनही मला पोहता येत नाही...उगीच चार पाच फुटात डुंबत राहून इतरांनी मारलेले सूर बघत बसण्यात काय हशील आहे??<br />
मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या आम जनतेलासुध्दा समजणाऱ्या भाषांशिवाय कुठली नवीन भाषा शिकलोय?<br />
बाथरूम सिंगर आणि इतरांच्या गाण्याला टेबलावर धरलेल्या ठेक्याशिवाय संगीतातलं काय ज्ञान मी मिळवलंय?<br />
क्रिकेट हा आपला अघोषित राष्ट्रीय खेळ सोडला तर मला इतर खेळांविषयी कितपत माहिती आहे?<br />
स्वयंपाक हा काही फक्त बायकांसाठी राखून ठेवलेला प्रांत नाही.. चहा आणि मॅगीशिवाय दुसरं काय बनवायला शिकलोय?<br />
<br />
मारे स्वतःला पट्टीचा वाचक समजतो मी पण विशिष्ट लेखक/लेखिका सोडले तर काय वाचलंय मी?<br />
मराठीत अजूनही नामदेव ढसाळ, दया पवार, इत्यादींचं दलित साहित्य वाचायचंय....संत साहित्यातलं रा.चिं ढेरे, सदानंद मोरेंचं लिखाण अजून वाचायचं बाकी आहे.. समग्र ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, रामदास, चोखामेळा, एकनाथांचं लिखाण वाचायचंय...<br />
<br />
इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोनी दांडेकरांच्या एकाही पुस्तकाला अजून हात लावलेला नाही...बऱ्याच आधी नेमाडे, श्याम मनोहरांची पुस्तकं वाचायचा, समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता... पण तेव्हा काही केल्या ती झेपली नव्हती... काय हरकत आहे आता पुन्हा वाचून बघायला? कदाचित गेल्या काही वर्षांत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या असतील आणि ती पुस्तकं आता कदाचित नव्याने उमगतीलही...<br />
<br />
मराठी कविता/गझलांमध्ये कुसुमाग्रज, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, संदीप खरे, थोड्या प्रमाणात केशवसुत, बा.सी. मर्ढेकर, दा.सु. वैद्य, बा.भ. बोरकर, विं.दा., इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट सोडले तर बरेचसे कवी/कवयित्री आणि त्यांच्या कविता मला अनभिज्ञ आहेत....<br />
<br />
नाटकांचं म्हणाल तर शांतेचं कार्ट, तरुण तुर्क, यदाकदाचित अशी लोकप्रिय विनोदी नाटकं, प्रशांत दामलेची नाटकं सोडली तर अजूनही मी विजया मेहता, सतीश आळेकर, चेतन दातार, तेंडुलकर, एलकुंचवार, अतुल पेठे, दुबे इत्यादींच्या महासागरात प्रवेश केलेलाच नाही<br />
<br />
<br />
इंग्रजी साहित्याबद्दल म्हणाल तर चेतन भगत, रॉबिन शर्मा आणि तत्सम व्यवस्थापन किंवा सेल्फ-हेल्प कॅटेगरीतली पुस्तकं, खालीद हुसेनी, फौंटनहेड, शेरलॉक होम्स अशी तुटपुंजी यादी वगळता अजून बरंच काही वाचायचं बाकी आहे...<br />
<br />
चित्रपटांचं म्हणाल तर मराठी, हिंदी आणि निवडक लोकप्रिय इंग्लिश चित्रपट वगळता अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं बाकी आहे....जगभरातल्या उत्कृष्ट अशा डॉक्यूमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स अजून बघायच्या बाकी आहेत....<br />
<br />
पंढरीची वारी, नर्मदा परिक्रमा, लेह-लडाख मध्ये बाईकवर प्रवास, मनाली ट्रेक, कैलाश-मानसरोवर, महाराष्ट्रातले बहुतांश गड-किल्ले, गिरनार अशा अनेक अनुभूती घ्यायच्या बाकी आहेत.. भारतात मध्य प्रदेश, हिमाचल, गोवा वगळता अनेक प्रदेश पादाक्रांत करायचे बाकी आहेत...तेव्हा जगप्रवास तर पुढची पायरी आहे...<br />
<br />
ही यादी न संपणारी आहे... डन पेक्षा टू डू लिस्ट फार मोठी आहे... ह्यातल्या कितपत गोष्टी साध्य होतील हा भाग अलहीदा पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?<br />
<br />
ह्या निमित्ताने, मिर्झा गालिबच्या खालील ओळी आठवल्यावाचून रहात नाहीत<br />
<br />
"हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले<br />
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-15714047016066166642016-07-02T02:23:00.001+05:302016-07-02T05:02:49.347+05:30मधुसूदन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...<br />
<br />
किलकिल्या डोळ्यांनी त्यानी रस्त्यावर एक नजर टाकली... भगभगतं ऊन, रस्त्यावरची गर्दी, लोकांची धावपळ आणि पुन्हा एकदा जाणवलेलं स्वतःचं रिकामपण डोळ्यांत साठवत त्याने डोळे गच्च मिटले... चहा ढोसायला ये अशी आईची हाक आल्यावर त्यानी त्याचे शुष्क डोळे उघडले आणि आत येऊन भिंतीला टेकला...कानतुटका कप आणि टवके उडालेल्या बशीचा दाणकन आवाज आल्यावर त्यानी समोर बघितलं... आईने नेहेमीप्रमाणे जोरात कपबशी पुढ्यात आदळल्याने अर्धाअधिक चहा बशीतच सांडला होता..<br />
<br />
नावापुरतं दूध, अर्धा चमचा साखर असलेला तो कडू चहा त्याने दोन घोटात गिळला... "मन्याकाकाच्या कंपनीत सेक्युरिटी गार्डची पोस्ट खाली आहे.. तिकडे जाणारेस की बापाला म्हातारपणात तंगडतोड करायला लावणारेस?" असा कोपऱ्यातून आवाज आल्यावर मधू उठला आणि त्या एका रूमच्या आडोशाला केलेल्या न्हाणीघरात घुसला.. चतकोरच्याही अर्ध्या उरलेल्या साबणाला अंग घासत दोन तांब्यात त्याने आंघोळ उरकली.. कळकट झालेला शर्ट आणि पॅन्ट अंगावर चढवत मधू घराबाहेर पडला<br />
<br />
चाळीतल्या लोकांच्या टोचणाऱ्या नजरांकडे दुर्लक्ष करत तो बस स्टॉपपाशी पोहोचला.. "हा मध्याच ना ग? बापाच्या पेन्शनवर आयतं खाणारा"? "हो तोच आहे हा".. ह्या नेहेमीच्या कुजबूजीकडे दुर्लक्ष करत तो बसची वाट पाहू लागला...212 नंबरची बस आल्यावर मधू नेहेमीप्रमाणे दाराशी जाऊन लटकला..कंडक्टर तिकिटाचे पैसे गोळे करत त्याच्या अगदी हातभर अंतरावर आला तेव्हा मधू घाईघाईत 2 स्टॉप अलीकडेच उतरला... फुकटे, चोर साले ह्या कंडक्टरच्या चिरपरिचित आवाजाकडे दुर्लक्ष करत तो झपझप पावले टाकू लागला...ठाकूरदास सांस्कृतिक हॉल ही पाटी दिसताच तो आत घुसला...<br />
<br />
तो पोहोचला तेव्हा हॉल बऱ्यापैकी भरला होता... <b>ओल्ड इज गोल्ड ऑर्केस्ट्रा ऑडिशन</b> अशी गिचमीड्या अक्षरात एक पाटी स्टेजवर लावली होती.. सिंथेसाईजरवर वयस्कर अमरदा बसले होते... स्टेजवर माईक घेऊन एक पोरसवदा मुलगा "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू" किंचाळत होता...<br />
तेवढ्यात अमरदांची नजर मधूवर गेली.. सिंथेसाईझर मधेच थांबवत ते मधूकडे गेले आणि त्याला ओढत नरेशभाईंकडे गेले... "नरेशभाई, ये लडके का गाना सुनो, आप बाकी सबको भूल जाओगे" अस म्हणत त्या स्टेजवरच्या पोराकडून माईक हिसकावत त्यांनी मधूकडे दिला...<br />
<br />
मधू माईक हातात घेत स्टेजवर चढला... अमरदांना तो कोणतं गाणं गाणारे हे पक्क ठाऊक होतं... मधूनी डोळे मिटले आणि "ओ मांझी रे" सुरु केलं.. क्षणभरात संपूर्ण हॉल चिडीचूप झाला... "साहिलों पे बेहेनेवाले"ला जेव्हा त्याने सूर लावला तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला.... गाणं संपल्यावर काही क्षण भयाण शांतता पसरली आणि मग सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला<br />
<br />
त्या कडकडाटात नकळतपणे मधुसूदन भूतकाळात गेला.. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी जेव्हा त्याने हेच गाणं गायलं होतं तेव्हा पहिल्या रांगेत बसलेली अवंतिका त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन एकटक पहात राहिली... गाणं संपल्यावर तिनी स्वतःहून त्याच्याशी ओळख करून घेतली... आणि नंतर तर त्याच्या आवाजावर फिदा होत ती त्याच्या प्रेमातच पडली...<br />
<br />
चांदण्या रात्री, नदीकाठी हातात हात गुंफून चालत असताना दोघांनी मिळून गायलेलं "ये रातें, ये मौसम नदीका किनारा" आठवलं.. "कहा दो दिलोने के, मिलकर कभी हम ना होंगे जुदा" हे एकसुरात गात अवंतिकानी त्याच्या खांद्यावर हलकेच ठेवलेलं डोकं आठवलं...कॉलेज संपल्यावर ऑडिटोरियमच्या पायऱ्यांवर बसून तिच्यासाठी गायलेलं "छुकर मेरे मनको किया तुने क्या इशारा" आठवलं.... अवंतिकाच्या नजरेतील व्याकुळता आणि तेव्हाच घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका आठवल्या...<br />
<div>
<br /></div>
तेवढ्यात त्याच्या पाठीवर नरेशभाईंची थाप पडली आणि तो भानावर आला... "हिरा आहे रे तू हिरा, इतके दिवस कुठे लपून बसला होतास रे? अमरदा इसको नवरात्री के लिये फायनल कर दो"....<br />
मग बराच वेळ मधू अमरदांबरोबर गाणी सिलेक्ट करत बसला... रात्री बऱ्याच उशिरा तो घरात शिरला..<br />
बल्बचा अपुरा पडणारा उदासवाणा प्रकाश, त्यात माणसांच्या, वस्तूंच्या पडलेल्या अनावश्यक सावल्या, स्टोव्हची भगभग ...<br />
मधू येऊन भिंतीला टेकला... बाप तिरिमिरीत येऊन मधूचे दोन्ही खांदे पकडून जोरजोरात हलवत म्हणाला "नालायका, कुठे तडफडला होतास दिवसभर?? मन्याकाकाच्या कंपनीत का नाही गेलास? अरे बांडगुळा अजून किती दिवस जगशील बापाच्या पैशावर?" संतापाचा उद्रेक होऊन मधूचा बाप हमसून हमसून रडायला लागला.. आईनी नेहेमीसारखं बाप-लेकाकडे हतबल होऊन पाहिलं आणि डॊळ्याला पदर लावला...<br />
बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही आणि मग मधू सावकाशीने उठला आणि पेलाभर पाणी पिऊन गॅलरीत झोपायला गेला. अरे जेवण..... , आईचे शब्द अर्धवटच राहिले...<br />
<br />
पुढचे काही दिवस मधू गाण्याच्या सरावाच्या निमित्तानी बाहेरच राहू लागला.. "इशारो, इशारोमें दिल लेनेवाले"च्या वेळी त्याच्या आवाजातल्या हरकती पाहून सीमा आश्चर्यचकित झाली... "वो शाम कुछ अजीब थी"च्या वेळचा त्याच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून अख्खा ऑर्केस्ट्रा ग्रुप निःशब्द झाला..<br />
<br />
मधू सुरांच्या साम्राज्यातला राजा होता.. डोळे बंद करून एकदा गाणं सुरु केलं कि त्याला आयुष्यातलं अपयश, बेकारी, भकास चाळ, तुटका कप, कडवट चहा, भिंतींचे पोपडे, गॅलरीतलं ते अंग मुडपून झोपणं, बल्बचा पिवळट, उदासवाणा उजेड, हतबल आई, पिचलेला बाप सगळं सगळं विसरायला व्हायचं...<br />
<br />
असाच एकदा सराव चालू होता.. "हम खो चलें, चांद है या कोई जादूगर है" म्हणत असतानाच दरवाजा खाडकन उघडला गेला... नरेशभाई घाईघाईने आत आले आणि थेट अमरदांकडे गेले.. "अमरदा, आपला प्रोग्राम थोडा चेंज करावा लागेल... अभी ये नये लोगोंको रफी, लता, मुकेश, किशोर ज्यादा पता नहीं है... तो आधा टाईम ओल्ड इज गोल्ड और बाकीका आधा न्यू इज फन करना पडेगा... मिका, हनी सिंग ह्या लोकांची गाणी सिलेक्ट करून टाका.." अमरदांनी होकारार्थी मान डोलावली.... तो होकार नरेशभाईंच्या प्रपोजलपेक्षाही कितीतरी पटीने अधिक त्यांच्या स्वतःच्या अगतिकतेमुळे होता.. वन रूम किचनचा हप्ता, पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिपायाची नोकरी लावण्यासाठी द्यावे लागणारे पैसे, बायकोचं आजारपण सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं..ह्याच अगतिकतेमुळे त्यांनी आधीही गणपतीतल्या, नवरात्रातल्या आरत्यांना फिल्मी गाण्यांच्या चाली लावल्या होत्या.. <br />
<br />
तेवढ्यात नरेश भाई मधू कडे वळून म्हणाले, " अरे सुपरस्टार, जरा आता माझी सटकली ऐकव यार..." <br />
हे ऐकताच मधूनी जळजळीत नजरेनी पाहिलं... नरेशभाईना त्याच्या नजरेतला अंगार जाणवला असावा, "क्या प्रॉब्लेम है रे तुझे?"<br />
<br />
"असली गल्लाभरू गाणी गाणं शक्य नाही मला... रफी, किशोर मुकेशच्या सुरांवर पोसलोय मी... फक्त गायकच नाही तर संगीतकार, गीतकारही तेवढ्याच ताकदीचे होते.. आरडी, ओपी, एसडी, मदनमोहनसारख्या दिग्गजांच्या चाली ओठावर आहेत आणि साहिर, शैलेंद्र, मजरूह, गुलजारसारख्यांचे शब्द मनात... ही अशी थिल्लर गाणी गाणं शक्य नाही मला"<br />
<br />
हे ऐकताच नरेशभाईंचा राग अनावर झाला आणि ते मधूला ओरडून म्हणाले "दिडदमडीचा गायक तू आणि दुसऱ्याच्या गाण्याची लायकी काढतोस?? अरे तुझ्यासारखे पन्नास गायक पडलेत बाजारात, पैसा फेकला तर वाट्टेल ते गातील माझ्यासाठी... आणि काय रे स्वतःच्या बापाच्या पेन्शनवर जगतो तू.. चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मला शहाणपणा शिकवतोस? चल हो बाहेर, परत तोंड नको दाखवूस मला"<br />
<br />
…..........<br />
<br />
अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-19071117638608132222016-06-27T06:02:00.002+05:302016-06-27T06:21:55.640+05:30एक भयाण रात्र<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
"मे आय कम इन समर?"<br />
"येस प्लीज कामिनी "...<br />
<br />
समर आपल्या केबिनमध्ये लॅपटॉप उघडून गंभीर चेहऱ्याने बसला होता... "सीट डाऊन प्लीज कामिनी"...<br />
<br />
समर हा इझी सोल्युशन्स कंपनीत टीम लीडर होता.. आज त्याचं कामिनीसोबत अन्युअल अप्रेझल डिस्कशन होतं... कामिनी ज्युनिअर होती आणि तिचं कंपनीतलं हे पहिलं अप्रेझल होतं... त्यामुळे साहजिकच ती नर्व्हस होती...<br />
<br />
"कामिनी तू गेल्या वर्षभर चांगलं काम केलंस... पण तीन चार वेळा तुझ्याकडून खूप अक्षम्य चुका झाल्या आणि त्यामुळे कंपनीचं नाव खराब झालंय... त्यामुळे मॅनेजमेन्ट तुझ्यावर नाखूष आहे.. आय एम सॉरी पण आम्हाला तुला काढून टाकावं लागत आहे... तू जर स्वतःहून रिझाईन केलंस तर बरं होईल... तुला आम्ही 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स देऊ आणि मग तुला दुसरी नोकरी शोधायला वेळही मिळेल"...<br />
<br />
हे ऐकताच कामिनीचा चेहरा रडवेला झाला आणि क्षणार्धात तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले...<br />
"सर प्लीज मला माफ करा. मी स्वतःला सुधारेन... हवं तर विकेन्डस लाही काम करेन आणि कॉम्प ऑफ ही घेणार नाही.., प्लीज सर आय रिअली नीड धिस जॉब".. असं बोलून तिचा बांध फुटला...<br />
<br />
तेवढ्यात समर घाईघाईने म्हणाला "अरे मी तर मजा करत होतो... तू खूप छान काम केलं आहेस आणि त्यामुळे तुला टॉप रेटिंग मिळालंय.. रिलॅक्स यार"..हे ऐकताच कामिनीच्या जीवात जीव आला आणि ती "थँक्यू सर" म्हणाली.. मग स्वतःला सावरत ती म्हणाली "सर प्लीज अशी जीवघेणी चेष्टा नका ओ करत जाऊ.. त्रास होतो अशाने"..<br />
<br />
त्यावर समर मोठमोठ्यानी हसत म्हणाला, "अरे मी तर नेहेमीच अशी चेष्टा करतो, डोन्च यु नो येट"???<br />
<br />
खरोखरच ही काही समरनी केलेली पहिली चेष्टा नव्हती... मागे एकदा लंच ब्रेक मध्ये त्याने एकाच्या सॅकमध्ये रबरी साप टाकला होता... लंच ब्रेकहून आल्यावर जेव्हा त्या माणसाने डायरी काढण्यासाठी सॅकमध्ये हात घातला तेव्हा डायरीऐवजी त्याच्या हातात रबरी साप आला आणि तो जो मोठ्याने ओरडला की अख्खा फ्लोअर त्याच्या डेस्कपाशी जमा झाला... आणि मग समर त्याचं नेहेमीचं गडगडाटी हास्य करत आला आणि त्याला मजा केल्याबद्दल सॉरी म्हणाला...<br />
<br />
अशा अनेक मजा तो आजवर करत आला होता... त्यामुळे लोकांना त्याचा राग येणं स्वाभाविक होतं... तरीही समर लोकांना आवडायचा कारण तो दिलखुलास होता.. तात्पुरती मजा करायचा आणि मग त्या व्यक्तीला सॉरी म्हणून त्या व्यक्तीला कॉफी, स्नॅक्स खायला न्यायचा .. त्यामुळे समोरच्याचा राग लगेच निवळायचा..<br />
कुठल्याही टीम इव्हेंटला तो सगळ्यात आधी दिलदारपणे पैसे द्यायचा.. त्याच्या अंडरच्या लोकांना तो खूप चांगलं रेटिंग द्यायचा त्यामुळे साहजिकच त्याचे ज्युनिअर्स त्याच्यावर खुश होते.. तो स्वतः एक हाय परफॉर्मिंग इंडिव्हिजुल होता.. टेक्निकली तर तो चांगला होताच पण त्याच्या संभाषण चातुर्यामुळे त्याने कंपनीला अनेक क्लाइंट्स मिळवून दिले होते.. साहजिकच मॅनेजमेन्टही त्याच्यावर जाम खुश होतं आणि त्यामुळे त्याच्या चेष्टेखोर स्वभावाकडे ते आपसूक दुर्लक्ष करायचे<br />
<br />
अशातच एक दिवस कंपनीची दिवेआगारला ट्रिप ठरली.... समरची बायको पूर्वा श्रीवर्धनची होती... त्यामुळे तिनी समरला "मला तुमच्यासोबत न्या आणि माहेरी सोडा" अशी गळ घातली.... "नाहीतर तू ट्रीपला नाही जायचं" असं फर्मान तिनी सोडलं.. अखेर हो नाही करत करत समर तयार झाला...<br />
<br />
शनिवारी संध्याकाळी सगळे दिवेआगारला पोहोचले... आणि मग समर त्याच्या होंडा सिटीतून पूर्वाला श्रीवर्धनला पोहोचवायला निघाला.. हिवाळा असल्यामुळे बऱ्यापैकी अंधार झाला होता... निम्म्या रस्त्यात येऊस्तोवर रात्र झाली होती.. समरला नेहेमीप्रमाणे मजा करायची हुक्की आली... त्यानी गाडीचे हेडलाईट्स बंद केले, पूर्वा किंचाळली "नको ना समर खूप भीती वाटते रे"... मग त्यानी परत हेडलाईट्स चालू केले... कोकणातल्या अरुंद, निर्जन रस्त्यावरची ही त्याची आवडती चेष्टा होती. संपूर्ण रस्ताभर पूर्वाला घाबरवत तो अखेर श्रीवर्धनला पोहोचला...<br />
<br />
सासुरवाडीला समरचं जंगी स्वागत झालं.. कोकणी जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर समर काही वेळ सासरेबुवांसोबत गप्पा मारत बसला... दिवाणखान्यातल्या घड्याळात 10 चे टोले झाले आणि समर एकदम उठून उभा राहिला...<br />
"काय झालं ओ जावाईबापू"?<br />
"चला मी निघतो आता दिवेआगारला" - इति समर<br />
"काय???? अहो आज अमावस्या आहे, तुम्ही कृपया उद्या पहाटे निघा"...<br />
"नाही नाही... माझी टीम माझी वाट पहातेय... आय नीड टू गो" असं म्हणत समर लगबगिनी निघाला...<br />
कोणाचंही न ऐकता हट्टी समर गाडी स्टार्ट करून श्रीवर्धनहून दिवेआगारकडे निघाला...<br />
<br />
त्याच्या गाडीत ब्लौपंकची भारी म्युझिक सिस्टिम होती... त्यावर जगजितच्या गझल ऐकत तो सुसाट निघाला.. काही वेळाने परत तो सुनसान अरुंद रस्ता सुरु झाला.. समरला तो रस्ता आता पाठ झाला होता..त्याला परत एकदा मजा करायची हुक्की आली... त्यानि हेडलाईट्स चालू बंद करायला सुरुवात केली.... बरोबर सहाव्या वेळी जेव्हा त्यानी हेडलाईट्स चालू केले त्यावेळी त्याला समोर एक लाल साडीतली बाई दिसली.. त्यानी करकचून ब्रेक दाबला पण तोवर ती बाई त्याच्या गाडीला धडकून बॉनेटवर येऊन पडली...<br />
<br />
तिचे लांबसडक, अस्ताव्यस्त झालेले केस समोरच्या काचेवर पसरले होते... त्यामुळे समरला नीट काही दिसत नव्हतं... एरवी शूर असणाऱ्या समरचे पाय आता, त्याच्या नकळत, लटलट कापत होते... थरथरत्या हातानी त्यानी दरवाजा उघडला...<br />
"हॅलो हॅलो" ओरडत तो गाडीच्या पुढच्या बाजूला गेला... त्या बाईकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही.. समरच्या घशाला आता कोरड पडली.. त्याने उसने अवसान आणत त्या पालथ्या पडलेल्या बाईला सरळ केलं.. गोऱ्यापान चेहऱ्याच्या त्या बाईच कुंकू कपाळभर पसरलं होतं..तिचे डोळे अर्धवट उघडे होते आणि बुबुळ वरती गेल्याने डोळ्यातला नुसताच पांढरा भाग दिसत होता...ते पाहून समरच्या अंगावर सर्रकन काटा आला... तरीही हिम्मत करून समरनी त्या बाईला उचललं आणि मागच्या सीटवर झोपवलं..<br />
<br />
टीम मेम्बर्सला कॉल करून हेल्प मागावी म्हणून समरनी मोबाइल हातात घेतला पण दुर्दैवाने मोबाइलला अजिबात रेंज नव्हती... कशीबशी गाडी स्टार्ट करत समर दिवेआगारकडे निघाला... अधून मधून तो मागे झोपलेल्या बाईकडे पहात होता... अमावस्या असल्या कारणाने रस्त्यावर किर्र काळोख होता... डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं...एक शार्प टर्न घेतल्यावर त्यानि परत मागे बघितलं आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला...<br />
ती बाई उठून सीटवर बसली होती आणि डोळे सताड उघडे ठेवून समरकडेच पहात होती... हे पाहून समरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी डावीकडच्या झाडावर जाऊन आदळली...<br />
समरचं डोकं दाणकन स्टीरिंगवर आदळलं आणि त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले...<br />
<br />
काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि त्याने घाबरत घाबरत मागे बघितलं... परत एकदा त्याच्या हृदयाचा ठोका चुकला कारण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं...गाडीचं दार उघडून तो लडखडत्या पावलांनी बाहेर आला.. ती बाई कुठेच दिसत नव्हती.. तेवढ्यात त्याला डावीकडच्या झाडीतून रडण्याचा आवाज ऐकू आला..<br />
<br />
मनाचा हिय्या करत समर झाडीत उतरला... जसजसा तो पुढे जात होता तसतसा त्याला रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला.. समोर आलेलं झुडूप त्यानी हातानी बाजूला केलं आणि त्याला समोर जे दिसलं ते पाहून त्याची जाम टरकली..<br />
ती बाई एका झाडाखाली बसून हुंदके देत होती.. तिची मान खाली होती आणि त्यामुळे तिचे लांबसडक केस जमिनीपर्यंत पसरले होते... उरलीसुरली हिम्मत गोळा करत समर त्या बाईपाशी पोहोचला आणि त्याने तिच्या खांद्याला स्पर्श केला....<br />
तत्क्षणी त्या बाईने डोके वर उचलले आणि समरकडे पहात भेसूर आवाजात खदखदा हसू लागली....<br />
<br />
भर थंडीत समरला दरदरून घाम फुटला आणि मागे वळून तो अडखळत्या पावलांनी धावायला लागला.. तेवढ्यात एक मोठया दगडाला त्याची ठेच लागली आणि तो खाली कोसळला<br />
<br />
अचानक रोडवरून गलका ऐकू आला आणि दहा बारा लोक समरकडे धावले... "कशी वाटली आमची गंमत समर/सर?? घाबरलात की नाही"??<br />
ती लाल साडीतली बाईसुद्धा हसत हसत आली आणि बाकीच्यांना टाळी देत म्हणाली "ऐ काय रे कसलं डेंजर नाटक करवलं तुम्ही माझ्याकडून.. परत नाही हां असं करणार कधी"...<br />
<br />
एवढा गोंधळ होऊनही समर उठला नाही.. ते पाहून सगळे चिडीचूप झाले ... लगेच एकानी समरला गदागदा हलवलं पण समरनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही... शेवटी त्याने समरच्या छातीपाशी कान नेऊन हृदयाचे ठोके चालू आहेत का ते पाहिलं.. दुर्दैवाने तीव्र धक्क्याने समरचं हृदय बंद पडलं होतं..<br />
<br />
पदोपदी सगळ्यांची चेष्टा करणाऱ्या समरच्या टीममेट्सनी केलेली एकमेव चेष्टा त्याच्या जीवावर बेतली होती</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-19558223040002687152016-06-25T20:00:00.003+05:302016-06-25T20:14:00.401+05:30एक काहीच्या काही कथा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काल रात्री भयंकर पाऊस आणि विजा पडल्या असाव्यात..कारण सकाळी जाग आली तेव्हा मी पाण्यावर तरंगत होतो... आजूबाजूला पाच पंचवीस चांदण्या तरंगत होत्या आणि वरती छत कोसळून डायरेक्ट खड्डे पडलेलं आभाळ दिसत होतं..<br />
मी नेम धरून एक एक चांदणी वरती फेकली आणि एकेका खड्डयात त्या व्यवस्थित जाऊन बसल्या...हे करत असताना एक चांदणी चुकून माझ्या मनगटाला घासली गेली.. आणि तेवढा भाग लख्ख गोरा झाला... ताबडतोब मी उरलेल्या चांदण्या संपूर्ण अंगाला घासून घेतल्या आणि आरशापुढे जाऊन उभा राहिलो... पाहतो तर काय, मी हृतिकपेक्षा साडे बत्तीसपट गोरा दिसत होतो.... मग मी उरलेल्या चांदण्या आकाशात फेकून दिल्या....<br />
<br />
वरतून आवाज आला, चंद्र काय तुझा काका फेकणारे?? मी पोहत पोहत हॉल मध्ये गेलो.. पाहतो तर काय टीव्ही चालू होता आणि चंद्र त्यावर <b>चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे</b> गाणं पहात हसत बसला होता..<br />
तेवढ्यात <b>चांद छुपा बादलमें</b> गाणं लागलं आणि घाईघाईत चंद्र पडद्याआड जाऊन लपला...<br />
<br />
मी ड्राय बाल्कनीत जाऊन कपडे वाळत घालायची दोरी काढून आणली.... चंद्राला त्या दोरीनी बांधून मी त्याचा झिलबिंडा केला आणी सात आठ वेळा गोल गोल घुमवला.... शेवटी वेग आल्यावर तो आकाशाच्या दिशेनी जोरात फेकला... तो बरोबर सर्वात मोठ्या खड्डयात जाऊन फिट्ट बसला.... अयायाया असं करत चंद्र विव्हळायला लागला... पाठ मोडली रे माझी काहीतरी औषध फेक असा वरून आवाज आला.. मी लगबगीने आयोडेक्स, मूव्ह, झंडू बाम, रेली स्प्रे, टायगर बाम एकत्र करून त्याचा परत झिलबिंडा बनवला आणि चंद्राच्या दिशेनी फेकला.. अर्ध्या मिनिटाच्या आत <b>आह से आहा तक</b>, <b>आयोडेक्स मलीये काम पे चलीये</b> अशा आकाशवाण्या सुरु झाल्या... मी मनात म्हणालो चला मामांची सेटिंग लागली दिसतेय....<br />
<br />
तेवढ्यात मला आमच्या दुसऱ्या बेडरूम मधून वाफा येताना दिसल्या.. मी जाऊन पाहिलं तर काय शनी खिडकीतून खालच्या लोकांकडे रागाने बघत होता.. मी हळूच बादलीभर पाणी आणलं आणि 2 डबल साईझ बेडशीट्सची टोकं जोडून एक भली मोठी बेडशीट तयार केली... शनी बेसावध आहे हे पाहून त्याच्यावर भसकन बादलीभर थंड पाणी ओतलं आणि पटकन ती बेडशीट त्याच्याभोवती गुंडाळून पक्की गाठ बांधली....मग मी आमचं डबल बेडचं स्टोअरेज उघडून त्यात शनीला बंद केलं...<br />
<br />
अचानक मला बाथरूम मधून शॉवरचा आवाज आला, मी हळूच दार उघडून पाहिलं तर मंगळ मजेत शॉवरखाली आंघोळ करत होता...<br />
तो बेसावध आहे हे हेरून मी लगेच दोन्ही बाथरुमचे शॉवर कर्टन्स एकमेकांना जोडले आणि त्यात मंगळाला बंदिस्त केलं<br />
<br />
तेवढ्यात मला बाहेर गलका ऐकू आला, जाऊन पाहातो तर काय सगळे मीडियावाले हॉल मध्ये जमा झालेले.. त्यांनी मला सांगितलं की चंद्र आणि चांदण्यांनी एकमताने व्होटिंग केल्यामुळे माझी आंतरराष्ट्रीय गॅलिलियो आणि कोपर्निकस पुरस्कारासाठी निवड झाली आहे...<br />
हे कमी होते म्हणून की काय मला राष्ट्रीय ज्योतिष आणि आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला होता </div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-83705020066406989542016-04-21T05:03:00.001+05:302016-04-21T05:27:30.363+05:30पावनखिंड - एक अविस्मरणीय अनुभव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
तसा मी लहरी महंमद आहे.. कधी कुठलं खुळ डोक्यात शिरेल त्याचा नेम नाही.. हल्ली पायाला भिंगरी(आणि गाडीला चाकं) लागलीये त्यामुळे फिरायच खुळ डोक्यात शिरलंय...<br />
<br />
गेल्या विकांतालाच फॅमिलीसोबत पावनखिंडीला जायचं ठरलं.. शनवार, रविवार पुरले नसते म्हणून (माझ्या बॉसच्या भाषेत स्वतःचा कॉन्शस मारून :-))शुक्रवारची सुट्टी टाकली.. गुरुवारी निदान दहा वेळा तरी मला म्हणाला की अरे एन्जॉय कर वेकेशन, बस तेरा कॉन्शस तुझे अलाऊ कर रहा है ना, फिर ठीक है.. हे असं बोलून बोलून उगाचच मनात अपराधिपणाची भावना निर्माण केली त्यानी... "हृषी फ्रायडेसे छुट्टीपे जा रहा है" असं सारखं बोलून दाखवायला लागल्याने "अरे भाई सिर्फ फ्रायडेकोही छूट्टीपे हूँ" हे कैलेंडर त्याच्यासमोर नाचवत सांगावं लागलं.. असो....<br />
<br />
आम्ही पावनखिंड रिसॉर्टच आधीच ऑनलाइन बुकिंग केलं होतं... (2100/- पर हेड, पर डे - इन्क्लूडिंग लंच, डिनर, ब्रेकफास्ट इत्यादि.. लहान मुलांच साधारण 845/- पर हेड 【सहा वर्षाखालील】) त्यांच्या वेबसाईटवर अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यानी सगळी माहिती दिली आहे.. ते पाहून, आपलं रिक्वायरमेंट किंवा टेक्नीकल डोक्युमेंट पण इतकं व्यवस्थित नसतं असा एक विचार उगाचच मनात येवून गेला (परत एक हकनाक अपराधिपणाची भावना)<br />
<br />
डे 1:<br />
-------<br />
मुलांचं (आणि माझं) उठून आवरेस्तोवर निघायला पार साडेदहा वाजले आणि सगळ्यांच्या (मी)शिव्या खात पावनखिंडीकडे कूच केलं...<br />
<br />
आता गाडीला इंधन लागो न लागो मला मात्र प्रवासात सारखं काहीतरी खायला नाहीतर प्यायला (चहा/कॉफी) लागतं... त्यामुळे कोल्हापूर हायवेचा पहिला टोलानाका क्रॉस केला आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला.. मग मजल दरमजल करत कऱ्हाडपर्यन्त पोचलो आणि तिथे जेवण केलं... कऱ्हाडपासून साधारण सहा किलोमीटरवर (हॉटेल पंकजच्या पुढे) सर्विस रोडनी उजवीकडे एक कळे ( म्हसोलि/येवती) फाटा लागतो .. तिकडे वळालो आणि मग सिंगल लेन रस्ता लागला (नाशिक हायवेसारखा गजबजलेला अजिबात नाहिये तो) रस्ता अतिशय उत्तम आहे.. पुण्या(वाकड)पासून साधारणपणे अडिचशे किलोमीटरवर पावनखिंड रिसॉर्ट आलं...<br />
<br />
पार्किंग अतिशय मोठं आहे... एखाद्या सराईत ड्रायवरसारखं लगेच मी झाडाखाली सावली बघून गाडी पार्क केली... रिसॉर्टवाल्यांकडे एक ढकलगाडी आहे, त्यात सामान भरून आम्ही रूमकडे रवाना झालो...<br />
<br />
रूम्स (आणि मुख्यतः वॉशरूम्स) कमालीच्या स्वच्छ होत्या... पुणेरी मैनेजमेंट असल्याने प्रत्येक ठिकाणी सूचना (पक्षी:पाट्या) दिसल्या (टू बी ऑनेस्ट, त्या अतिशय हेल्पफुल ठरल्या) जाळीच्या दरवाजावर "हा दरवाजा नेहेमी बंद ठेवा", वॉशरूमच्या बेसिनवर "इथले पाणी अतिमृदु आहे, त्यामुळे थोडासाच् साबण पुरतो.. एक्सट्रा साबण बेसिनला चिकटून राहील आणि तो जाणार नाही" अशा प्रकारच्या मार्मिक सूचना लिहिल्या होत्या...<br />
<br />
पुण्याच्या शिरगांवकर दांपत्याने (नवरा इंजीनियर आणि बायको आर्किटेक्ट) 94 साली हे रिसॉर्ट सुरु केलं... ठायी ठायी त्यांची कल्पकता दिसून येते... पाली, सरडे, इतर कीडे आत घुसू नयेत म्हणून दरवाजाला आणि खिडक्याना केलेल्या जाळ्या (माझ्या घराच्या जाळ्या 2 वर्षातच फाटायला सुरुवात झालिये), रूम्समधे आणि बाहेरही रिसॉर्टमधे वापरलेले (मोस्टली सोलर एनर्जीवर चालणारे) छोटे छोटे दिवे, चहा/कॉफीचे कप वापरून झाल्यावर ते टाकून द्यायला केलेल्या दंडगोलाच्या आकाराच्या लोखंडी नळ्या आणि अशा अनेक गोष्टी (ज्या लेखात पुढे ओघानि येतीलच)<br />
<br />
फ्रेश झालो आणि लगेचच रिसॉर्टवाल्यानी आम्हाला जवळच्याच एका धरणावर नेलं... ह्यांनी टेम्पो किंवा जीपला वरती अजुन एक मजला तयार केलाय... ज्यायोगे तुम्हाला आजुबाजुचं जंगल एका वेगळ्याच अँगलनी बघता येतं... मला तर मुंबईच्या डबलडेकरमधे वरती बसल्याचा फील आला, रियली टू गुड़....<br />
<br />
डैमच्या बैकवॉटर पाशी गेल्यावर रिसॉर्टच्या ड्रायवर कम गाईड काकांनी आम्हाला बाजूच्या घनदाट जंगलातून पायी एक लांब टूर घडवली (इंग्लिश पिक्चर बघायची सवय असल्यानी, इथे एनाकॉन्डा तर येणार नाहीना अशी सारखी भीती वाटत होती).... काही लोक त्या पाण्यातून ट्यूबने (किंवा ज्यांना पोहता येतं ते पोहत) दुसऱ्या टोकाला पोहोचले... इथे महाराष्ट्रात सगळीकडे पाण्याची वानवा असताना ते भरपूर पाणी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं...(लातूरला जसं ट्रेननी पाणी पोहोचवलं तसच इथलं मुबलक पाणी मराठवाड्यात घेवून जावं का असा एक समाजोपयोगी विचार मनात आला) साधारण पाच सहा किलोमीटर तंगडतोड करून गाडिपाशी परत आल्यावर त्यांनी कूलर मधलं गारेगार पाणी देवून सगळ्यांची तहान भागवली...<br />
<br />
रिसॉर्टवर (डबलडेकर मधून) परत आल्यावर त्यांनी लगेच चहा/कॉफी सेंटरकड़े नेलं... इथे रिसॉर्टच्या साधारण मध्यभागी त्यांनी ते बनवलय... चहा आणि कॉफीचे थर्मास भरून ते वेळोवेळी रिफिल करतात... ह्या कौलारू सेंटरच्या प्रत्येक दिशेचं एक कौल त्यांनी काढून ठेवलय, ज्यायोगे दिवसा तिथे मुबलक प्रकाश येईल आणि लाईटची गरज भासणार नाही.... तसेच, रूम्समधे इंटरकॉम दिलेला नाही, रूम सर्विससाठी तुम्हाला डायनिंग हॉल पर्यन्त जावं लागतं (आणि त्याच्या आधीच हे टी/कॉफी सेंटर लागतं)<br />
त्यामुळे कमितकमी मनुष्यबळामधे हे लोकं एवढं मोठं रिसॉर्ट मैनेज करतात ..<br />
<br />
नंतर आम्ही रिसॉर्टच्या एंटरटेनमेंट सेक्शनला गेलो... तिथे कराओके होतं, शंभरच्या वर गाणी आणि आपला भसाडा आवाज ऐकायला कोणी नाही ह्या संधिचा फ़ायदा उठवून रोमॅंटिक, दर्दभरे, किशोर/मुकेश/रफ़ी/महम्मद अझीज/नितीन मुकेश/उदित/सोनू/कुमार सानू असे वाट्टेल त्या कॉंबिनाशनचे गाणे गाऊन घेतले... इतर लोक आल्यावर मग टेबल टेनिस, सापशिडी आणि कैरम खेळलो...<br />
<br />
नंतर "चला जेवायला" ह्या अत्यंत उत्साहवर्धक ( आणि खुप वेळापासून वाट पहात असलेल्या) हाकेला ओ देत डायनिंग सेक्शनकड़े पळालो...भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, लोणी, ताक, भात, वरण असा दमदार मेनू (नॉनव्हेज वाल्यांसाठी तांबड़ा/पांढरा रस्सा, मटन) होता... तुडुंब जेवल्यावर हात धुवायला बम्बाच पाणी आणि खाली घंगाळं असा राजेशाही थाट होता(इथे उष्टे पेले, वाट्या, ताट, चमचे आणि ताटातलं उरलं सुरलं टाकायला वेगळे सेक्शन आहेत.)<br />
<br />
दिवसभराच्या प्रवासाने आणि संध्याकाळच्या पायपीटीने दमल्यामुळे अंथरूणाला पाठ टेकताच झोप लागली (बाय द वे, इथे एसी, नॉन-एसी, डीलक्स, सुपर डीलक्स अशा रूम्स नाहीत... उन्हाळ्यात, एप्रिल<br />
मधेहि, पंख्याचं वारं पुरत.. कारण इथे अजिबात उकाडा जाणवत नाही)<br />
<br />
डे 2<br />
-----<br />
सकाळी उठून पहिले चहा/कॉफी प्यायला गेलो (त्याची वेळ त्यांनी 6.30 ते 8.30 अशी ठेवलिये.. स्वभावधर्माला अनुसरून मी शार्प 8. 25 ला तिथे पोहोचलो :-))<br />
त्यानंतर ब्रेकफास्टची वेळ 8.30 ते 10.30... ह्यावेळी मात्र मी स्वतःत कमालीची इम्प्रूवमेंट घडवून शार्प 10 ला तिथे पोहोचलो... तरीही ब्रेकफास्ट करणारा मी रिसॉर्टचा शेवटचा मेंबर होतो (मी काही फारसं मनाला लावून नाही घेतलं म्हणा ते पण रिसॉर्ट स्टाफ च्या कपाळावरच्या आठया मात्र मी उत्सुकतेनि मोजून घेतल्या) लुसलुशित आलू पराठे लोण्यासोबत चापून , परत एक कॉफी ओरपून घरच्यांसोबत डबलडेकरमधे पावनखिंडीकडे कूच केलं<br />
<br />
पक्का डांबरी रस्ता आणि दुतर्फा घनदाट जंगल अशा निसर्गरम्य प्रवासाला आमची सुरुवात झाली...इथे गवा, साळीन्दर, सांबार असे विविध प्राणी दिसतात असं आमचा ड्रायवर कम गाईड सांगत होता.. आम्हाला मात्र चार्ल्स डार्विन काकांचा आवडता प्राणी माकडच ठिकठिकाणी दिसत होता.. एके ठिकाणी सगळ्या गाड्या अचानक थांबल्या.. आमचे गाईड म्हणाले, "वरती बघा जांभळं".. खरोखरच जांभळानी लगडलेल्या अनेक फांद्या आमच्या हातात आल्या... आपण नेहेमी खातो त्यापेक्षा लहान (साधारण बोराच्या आकाराची) जांभळं आम्ही तोडून खाल्ली... सरप्राइजिंगलि, अतिशय गोड होती ती...<br />
<br />
पुढे विशाळगडाकडे जाणाऱ्या घाटात गाड्या पुन्हा थांबल्या... आमच्या गाडीत एक मोठा स्पीकर होता, त्यावरून रिसॉर्ट ओनरच्या आवाजात पावनखिंडीची माहिती देणारी कैसेट सुरू झाली...ती थोडक्यात सांगतो<br />
<br />
एका दिशेला दूरवर पन्हाळा किल्ला आहे... शिवाजी महाराजांच्या काळात त्याला एकदा सिद्दी जौहरचा वेढा पडला... बऱ्याच दिवसानंतर किल्ल्यातली धान्यसामुग्री संपल्यावर महाराजांनी रात्रीत 600 मोजक्या मावळ्यांसोबत विशाळगड़ाकडे कूच करायचं ठरवलं... घोड्यांच्या टापांचा आवाज टाळण्यासाठी सगळे भर पावसात पायी निघाले (महाराज पालखीत होते)... शत्रूसैन्याची दिशाभूल करण्यासाठी महाराजांचा वेश परिधान करून शिवा न्हावी काशिद दुसऱ्या रस्त्यानि मोजक्या मावळ्यांसोबत निघाला... काही वेळानी सिद्दीच्या लोकांना महाराज पळाल्याची खबर लागली आणि त्यांनी घोड्यावरून पाठलाग करत शिवाला गाठलं... अंधारात नीट न समजल्याने ते शिवाला महाराज समजून सिद्दिकडे घेवून आले... उजेडात नीट पाहिल्यावर सिद्दीला खरा प्रकार समजला आणि त्याने तिथल्या तिथे शिवाची गर्दन छाटायचा हुकूम दिला...(इथे अंगावर पहिल्यांदा शहारा आला आणि नकळत डोळे पाणावले.. मनोमन शिवाला वंदन करून आतापर्यंत ऐकलेल्यातली सगळ्यात घाणेरडी शिवी सिद्दीला दिली)<br />
<br />
मग सिद्दीच् सैन्य खऱ्या महाराजांच्या मागे लागलं... विशाळगडाच्या अलीकडे एका गावात महाराज आणि त्यांच्या मावळ्याना त्यांनी गाठलच.. घमासान युद्ध सुरू झालं... शत्रूसैन्य खुप जास्त असल्यानं बाजीप्रभू देशपांडे ह्या महाराजांच्या सरदारानी "मी इथे 300 मावळ्यांसोबत ह्यांचा मुकाबला करतो तुम्ही विशाळगड़ाकडे कूच करा... गडावर पोचले की तोफांची सलामी दया म्हणजे आम्हाला तुम्ही सुखरूप पोहोचल्याचं समजेल.. तोवर आम्ही ह्यांना अडवून धरतो" असा हट्ट धरत महाराजांना बळेच जायला भाग पाडलं...(लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे वाक्य आठवले) महाराज नाखुशीनेच तिथून निघाले.. सिद्दिचे हजाराच्यावर सैनिक विरुद्ध बाजींचे केवळ 300 मावळे असं अशक्यप्राय युद्ध सुरू झालं...<br />
<br />
इथे मराठ्यांचा गनीमी कावा (परत एकदा) उपयोगी पडला... बाजीच्या सैन्यानी मोठ्या हुशारीनि सिद्दीच्या सैन्याला अरूंद अशा पावनखिंडीत यायला भाग पडलं..बाजींचा जो अंदाज होता त्यापेक्षा बराच जास्त वेळ महाराजांना गडावर पोहोचायला लागला.. पावसामुळे त्यांना वेळ लागला आणि नंतर विशाळगडाला दुसऱ्या एका शत्रूसैन्याचा वेढा पडला होता.. त्यांच्याशी लढायला प्रत्यक्ष महाराज पालखीतून उतरले असं सांगतात... गडावर पोहोचल्यावर त्वरेने महाराजांनी तोफा डागण्याचा आदेश दिला.. पण पावसाळा असल्या कारणाने सगळ्या तोफा मेण भरून आतमधे ठेवल्या होत्या... त्यांना तयार करून तोफा डागूस्तोवर अजुन वेळ गेला...<br />
<br />
साधारण दहा, साडेदहाला लढायला सुरू केलेल्या बाजीच्या सैन्याला तोफांचा आवाज ऐकू यायला संध्याकाळाचा पहिला प्रहर (साधारण चार साडेचार वाजले असावेत) उजाडला...तोवर बाजींच्या अंगाचा असा एकही भाग शिल्लक राहला नव्हता जिथे जखमा झाल्या नसतील... तोफांचा आवाज ऐकून बाजीप्रभू, त्यांचे बंधू फुलाजी ह्यांनी समाधानानी प्राण सोडले.... बाजीप्रभूंसोबतचे तसेच महाराजांसोबतचे किती मावळे ह्या मोहिमेत धारातीर्थी पडले ह्याची आपल्या इतिहासात (दुर्दैवाने)नोंद नाही...(हे सगळं ऐकून डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या होत्या) धन्य ते महाराज !!! धन्य ते बाजीप्रभू!!! आणि धन्य ते स्वामिनिष्ठ मावळे!!!!<br />
<br />
पावनखिंडीला जायच्या रस्त्यावर साधारण सहा किलोमीटरचा पैच अतिशय खराब आहे... ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या वाहनातून सावकाश जाणे श्रेयस्कर...<br />
(कारण ह्यांच्या डबलडेकरला सस्पेंशन नावाचा प्रकार जवळपास नाही म्हंटले तरी चालेल).....पावनखिंडीत उतरायला एक अरूंद अशी लोखंडी शिडी बनवलिये... आम्ही लहान मुलांना घेवून न जाण्याचा निर्णय घेतला होता पण आम्ही खाली उतरल्यावर आमच्या गाईड लोकांनी मुलांना कडेवर घेवून यायला सुरुवात केली.. ते पाहून माझी जाम टरकली... मी लगेच मनात रामरक्षा/भीमरूपी म्हणायला सुरुवात केली..(मला बाकीचं काही येतं नाही, नाहीतर गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, पुरूषसूक्त, स्त्रीसूक्त असे सगळे श्लोक नक्कीच म्हंटले असते)<br />
<br />
त्या खिंडीत पुढे पुढे जाताना आम्हाला त्रास होत होता तर बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे इथे तासनतास कसे लढले असतील ह्या विचाराने अंगावर सर्रकन काटा आला... भारावलेल्या अवस्थेत आम्ही सगळे खिंडीतून वर आलो आणि रिसॉर्टवाल्यानी सगळ्यांना कूलरमधून आणलेलं गारेगार, सुमधुर कोकम सरबत दिलं... सगळ्यानी निदान 4, 5 ग्लास तरी सरबत पिलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...<br />
<br />
येताना मधे आमच्या गाड्या थांबल्या आणि जंगलात थोडंसं आत बार्बेक्यूची मेजवानी मिळाली.. व्हेज वाल्यांसाठी भाजलेले बटाटे, वांगी, स्वीट कॉर्न, ढोबळी मिर्ची तर नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन असा जंगी मेन्यू होता... मग जेवायला साग्रसंगीत स्वैपाक आणि वामकुक्षी घेवून झाल्यावर गरमागरम चहाची मेजवानी होती...<br />
<br />
रिसॉर्टवर आल्यावर आम्ही स्विमिंगपूल मधे दोन तीन तास डुंबलो आणि मग (भसाड्या आवाजात) कराओके, सापशिडी, कैरम खेळून रात्रीचं जेवण घेतलं...रिसॉर्ट मधे झोके, झोपाळे, मोठ्ठी घसरगुंडी असल्यामुळे मुलांनी खुप एन्जॉय केलं... तुम्ही जर ब्रश, पेस्ट, दाढीचं सामान, बर्मूडा, इत्यादि गोष्टी आणायला विसरला असाल तर रिसॉर्टचं नो सेल्समन वालं एक दूकान आहे... जिथे तुम्ही हव्या त्या वस्तू विकत घेवून त्यांच्या कॅश बॉक्समधे पैसे ठेवू शकता ..<br />
<br />
डे 3<br />
------<br />
<br />
ब्रेकफास्ट घेवून एडीशनल पैसे देवून (अडवांस पेमेंटव्यतिरिक्त डैमच्या आणि पावनखिंडीच्या सफारीचे फक्त 1750/- द्यावे लागले)...जड अंतःकरणानि आम्ही साधारण साडेदहाला पुण्याकडे प्रस्थान ठेवलं... खाली काही फोटोज शेयर करतोय..<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
सामान ने-आण करण्यासाठीची ढकल गाडी</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRYXPcyr_h3H5Jp_b216xmV6HnmrhlWhw00mplxGD0SqIhnLQPNB-DKy6NY4FQNbtBBRLUkbdtPNqISy-I9xY3SyZBtIfpm9xMkWo9LHclRlRZYDotOENGqPk4msGKnb-a9jyW6iVq3Sg/s1600/IMG_20160417_112052.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRYXPcyr_h3H5Jp_b216xmV6HnmrhlWhw00mplxGD0SqIhnLQPNB-DKy6NY4FQNbtBBRLUkbdtPNqISy-I9xY3SyZBtIfpm9xMkWo9LHclRlRZYDotOENGqPk4msGKnb-a9jyW6iVq3Sg/s320/IMG_20160417_112052.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
रिसॉर्ट</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivvi_2qaugq8Wta03ztKvuB8WgVDJFj_jHSqDNcXh_80P0YVrVGZZ-02eSRFwuQ6gRZYir0fNzLZpngIOpE356l1DOlBRNbgqG-Kw5GiGW9ZPZRNwuILpHojtSuHI8B41OkMRWYj-Dr_o/s1600/IMG_20160417_104250.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivvi_2qaugq8Wta03ztKvuB8WgVDJFj_jHSqDNcXh_80P0YVrVGZZ-02eSRFwuQ6gRZYir0fNzLZpngIOpE356l1DOlBRNbgqG-Kw5GiGW9ZPZRNwuILpHojtSuHI8B41OkMRWYj-Dr_o/s320/IMG_20160417_104250.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
हात धुवायला असलेला बंब </div>
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1JIuUh_VdjzggTFUELLWIyqa5CZxDozE-MHk_vOwoW2slYp0hIO0AQR4N8p8H4GjXCpDcUbH7724lrxmU1TEiz-XUcIlg2FZ51LNGCadn08I-_MGmhugnZ1YEHd2k7f5NfQTz3MVWJUQ/s1600/IMG_20160417_095601.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1JIuUh_VdjzggTFUELLWIyqa5CZxDozE-MHk_vOwoW2slYp0hIO0AQR4N8p8H4GjXCpDcUbH7724lrxmU1TEiz-XUcIlg2FZ51LNGCadn08I-_MGmhugnZ1YEHd2k7f5NfQTz3MVWJUQ/s320/IMG_20160417_095601.jpg" width="240" /></a><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
स्विमिंग पूल</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiheSbzpnYenOCAlQ9EbGk6RzPoLuE9z4D1dIVBsLtNa9F7dPMPCpDoLYvEgfWwAqB-tUSM_zivBh2KpLKmHE4Pc94ERh0Twt2dHHTDXWzNZDdb-tmxG5wdI3E-IlBE2I2kdOwQaHEiKRg/s1600/IMG_20160416_085306.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiheSbzpnYenOCAlQ9EbGk6RzPoLuE9z4D1dIVBsLtNa9F7dPMPCpDoLYvEgfWwAqB-tUSM_zivBh2KpLKmHE4Pc94ERh0Twt2dHHTDXWzNZDdb-tmxG5wdI3E-IlBE2I2kdOwQaHEiKRg/s320/IMG_20160416_085306.jpg" width="180" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
घसरगुंडी</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS3ngGSKST7sasyjG9_EkesKRpJpVNq-nHEOD6JbIpKuKEbKy4oKQVOVa9ym9loP2bHEK_N4xVA2q-k4hUCgy0VWUleZH_CU1TNCq84eWXNEIrCE0aUPIrmjazIhHYrf5UvrRkHYejbhs/s1600/IMG_20160416_085631.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiS3ngGSKST7sasyjG9_EkesKRpJpVNq-nHEOD6JbIpKuKEbKy4oKQVOVa9ym9loP2bHEK_N4xVA2q-k4hUCgy0VWUleZH_CU1TNCq84eWXNEIrCE0aUPIrmjazIhHYrf5UvrRkHYejbhs/s320/IMG_20160416_085631.jpg" width="180" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
चहा/कॉफी सेंटर</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjleqW2pUbJ1tsZU9YnBbohn7EAwoVJFTUOMFsUmaVxSR5I86gVbZn3d2JHbertv4NTnDl9LACnNWWLH53q6h5c_R6IO11WuOSduuMPZNUgK4NcFZOGVssdi09-zC6nuZmwWcj5fuluN8k/s1600/IMG_20160416_180755.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjleqW2pUbJ1tsZU9YnBbohn7EAwoVJFTUOMFsUmaVxSR5I86gVbZn3d2JHbertv4NTnDl9LACnNWWLH53q6h5c_R6IO11WuOSduuMPZNUgK4NcFZOGVssdi09-zC6nuZmwWcj5fuluN8k/s320/IMG_20160416_180755.jpg" width="320" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
पावनखिंड स्मारक</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJW4M79iG7kmmXLQjhyphenhyphenSG2V5J9Z8354-G0tOk_ob6BrWikxKbBX9hscIz9gVMZCvRHEoHeu07f6F4xUGsV4-utsP1hmyUKUtNWIWo4qSjfuyBS1K9oMItSh2hdk0Q4vRzg-QF5Z-zG5Dc/s1600/IMG_20160416_135734.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhJW4M79iG7kmmXLQjhyphenhyphenSG2V5J9Z8354-G0tOk_ob6BrWikxKbBX9hscIz9gVMZCvRHEoHeu07f6F4xUGsV4-utsP1hmyUKUtNWIWo4qSjfuyBS1K9oMItSh2hdk0Q4vRzg-QF5Z-zG5Dc/s320/IMG_20160416_135734.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgD5UVkMSlgp3nxiI8qYPlt2me30Qg2ZJTE_9_nzXVvOyU5tE2oG9OnwCIfPgMiupwaRtMv_u2BQ4sTFrIcyM8MibIrUxKlLc-zptdc7Tno2OG7j8A7McQX-UocWsN5o2bHq0uJzqylP6E/s1600/IMG_20160416_135111.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgD5UVkMSlgp3nxiI8qYPlt2me30Qg2ZJTE_9_nzXVvOyU5tE2oG9OnwCIfPgMiupwaRtMv_u2BQ4sTFrIcyM8MibIrUxKlLc-zptdc7Tno2OG7j8A7McQX-UocWsN5o2bHq0uJzqylP6E/s320/IMG_20160416_135111.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
प्रत्यक्ष पावनखिंड</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUOMPA9QoIKpth7RLT3EZZxqJFbCo8RqmhAURnSZ6NPAYu2RIztD86MnmHps8NNB5-rG9dkteWfQlv-ycCuAV6_szd9xkW8Tz0FxWApEMhxkB_B05Bhp6qZwTHxq50Z7Wb4ou5T0Erq3o/s1600/IMG_20160416_134618.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUOMPA9QoIKpth7RLT3EZZxqJFbCo8RqmhAURnSZ6NPAYu2RIztD86MnmHps8NNB5-rG9dkteWfQlv-ycCuAV6_szd9xkW8Tz0FxWApEMhxkB_B05Bhp6qZwTHxq50Z7Wb4ou5T0Erq3o/s320/IMG_20160416_134618.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
खाली उतरायला केलेला लोखंडी जिना</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgR4qKP70pIrdwbtdXZWlZv4z3mn2STGMNSBevlb1LBuxbeBoDhKaG6nvwsPQcsUr6aFxJBB-tOBO14NBZwnjXZQoUWPk1fUI87E8H6rBS9kNeI-XxhPwM3ElzDVHLatnpXEMEP4ysUiwg/s1600/IMG_20160416_131839.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgR4qKP70pIrdwbtdXZWlZv4z3mn2STGMNSBevlb1LBuxbeBoDhKaG6nvwsPQcsUr6aFxJBB-tOBO14NBZwnjXZQoUWPk1fUI87E8H6rBS9kNeI-XxhPwM3ElzDVHLatnpXEMEP4ysUiwg/s320/IMG_20160416_131839.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
गावातल्या लोकांनी बाजींच्या स्मरणार्थ लावालेला फ्लेक्स</div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUQfLNMTlpXiVhrXANcqXty2PJeeGPzXtOVzjbeVS9x3vRwXvSQh_PKT61N3uW6fqCB-2fm8z38T42IUNcCcdfIz9se6afzEdLp4FHPFpt7Wh4mgxTMC_QM3YNODmfxolojJTOUWjaJII/s1600/IMG_20160416_130432.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUQfLNMTlpXiVhrXANcqXty2PJeeGPzXtOVzjbeVS9x3vRwXvSQh_PKT61N3uW6fqCB-2fm8z38T42IUNcCcdfIz9se6afzEdLp4FHPFpt7Wh4mgxTMC_QM3YNODmfxolojJTOUWjaJII/s320/IMG_20160416_130432.jpg" width="320" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
पावनखिंड लढाईची माहिती</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisVbcKDhhTbMhgXVXF9RmIAGr5YvYlt4oJCQQyEFXH1MO32XCveiNFvF7h0eijGnUndJLIudh7l06Oo3FW-BEJADo4hhhg5lg4CYcqFBpVX6gnoNi1KaAJ-NWDMadSBHR-akbKqHIGPwo/s1600/IMG_20160416_131029.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEisVbcKDhhTbMhgXVXF9RmIAGr5YvYlt4oJCQQyEFXH1MO32XCveiNFvF7h0eijGnUndJLIudh7l06Oo3FW-BEJADo4hhhg5lg4CYcqFBpVX6gnoNi1KaAJ-NWDMadSBHR-akbKqHIGPwo/s320/IMG_20160416_131029.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
रिसॉर्टची डबलडेकर</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV9yovvWWFdLSttGvL3WA44HkFYN5pRUoSpM64oubpfgWgyGq9lXA3TQoK5CeFbcyHSKdn1MaGBCCx8xLCZEH1x5ne9o-HLkxvNIiZeWgac4o2tigQ__Zi4AeVZr2QczidnglXztMa0jU/s1600/IMG_20160416_110553.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV9yovvWWFdLSttGvL3WA44HkFYN5pRUoSpM64oubpfgWgyGq9lXA3TQoK5CeFbcyHSKdn1MaGBCCx8xLCZEH1x5ne9o-HLkxvNIiZeWgac4o2tigQ__Zi4AeVZr2QczidnglXztMa0jU/s320/IMG_20160416_110553.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
जंगलातलं बार्बेक्यू</div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNrZEe-i5lzCsaZZhEQW9Nygy5RwCH1OQrH0rbs97CCk7eHfudWrHdYW-bRNSPHXEEy7Lsk4twixv_sVK50ZfgZdgTEv-K08tSHCp5983NZFefLLr1hG6RqnUz-zAKAvHB8LA7VfyLjmk/s1600/IMG_20160416_155714.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNrZEe-i5lzCsaZZhEQW9Nygy5RwCH1OQrH0rbs97CCk7eHfudWrHdYW-bRNSPHXEEy7Lsk4twixv_sVK50ZfgZdgTEv-K08tSHCp5983NZFefLLr1hG6RqnUz-zAKAvHB8LA7VfyLjmk/s320/IMG_20160416_155714.jpg" width="320" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
पावनखिंड</div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhY5n8J5FbXnHkd969z0YqUSCTFF5mE8t_6qCU4nmMxyAXec7oV6b5nZKeKZ5N26NmvWS9W6NlJa9iL8MzTYFojUo3yABSqhg2hwH9rJxoHyHYMu46CtNLyIyuaEmnhi4Lbn4PLSoPD9tQ/s1600/IMG_20160416_134004.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhY5n8J5FbXnHkd969z0YqUSCTFF5mE8t_6qCU4nmMxyAXec7oV6b5nZKeKZ5N26NmvWS9W6NlJa9iL8MzTYFojUo3yABSqhg2hwH9rJxoHyHYMu46CtNLyIyuaEmnhi4Lbn4PLSoPD9tQ/s320/IMG_20160416_134004.jpg" width="240" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
डैमचं बैकवॉटर</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9CKL0msjFuu34GNk0Zm6GO3L1gGnBxgGOmvxbMTwbTKkEYVufRTOqJNn4JDv_vs1-O9QvxTPXk1OKiEIpHMp72-E7_bAAYatsisqvnhbCZKIvR4H9zmSBASnF_VL0x_ig2pGJ_WuT-5g/s1600/IMG_20160415_184531.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="180" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9CKL0msjFuu34GNk0Zm6GO3L1gGnBxgGOmvxbMTwbTKkEYVufRTOqJNn4JDv_vs1-O9QvxTPXk1OKiEIpHMp72-E7_bAAYatsisqvnhbCZKIvR4H9zmSBASnF_VL0x_ig2pGJ_WuT-5g/s320/IMG_20160415_184531.jpg" width="320" /></a></div>
<br /></div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com20tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-85271241522738690112016-03-20T21:24:00.000+05:302016-03-20T21:24:01.959+05:30कॉलेज रियूनियन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
माझ्या एका मैत्रिणीला कॉलेज रियूनियनसाठी एक राईट-अप लिहून हवं होतं.. कॉलेज लाईफ आठवून मग हे लिहिलं -<br />
<br />
एक नेहेमीसारखीच संध्याकाळ.... दिवसभराच्या कामानी तुम्हाला जाम शीण आलाय.. तेवढ्यात बाहेर अंधारून येतं, ढग कडाडू लागतात, विजा चमकू लागतात आणि पाऊस सुरू होतो.. ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध तुम्ही डोळे बंद करून, मोठ्ठा श्वास घेत, छातीभर भरून घेता.. आणि अचानक तुम्हाला कॉलेजच्या ग्रुप सोबत धो धो पावसात खाल्लेली कांदा/मिर्ची-भजी आणि सोबतीने फुंकर मारत पिलेला गरमागरम, वाफाळलेला आल्याचा चहा आठवतो.. आठवतो ना?<br />
<br />
ऑफिसमधे नेहमीसारखीच कंटाळवाणी मीटिंग चालु आहे.. बॉसच्या समोरच बसल्याने तुम्हाला मोबाईलवर पण टाईमपास करता येत नाहिये. जांभया देत, कशीबशी झोप आवरत तुम्ही बळच माना डोलवत बसलाय आणि अचानक तुम्हाला कॉलेजमधलं लेक्चर आठवतं. सर/मैडम फळ्यावर लिहायला वळाले की एकमेकांना खाणा-खुणा, इशारे करायचे...कागदाचे, खडुचे छोटे तुकडे हळूच आपल्या मित्र/मैत्रीणीला फेकून मारायचे...बाजूच्याशी नोटबुकमधे '0'आणि 'X' चा गेम खेळायचा आणि सर/मैडमची पाठ वळाली की हसू दाबत गंभीर चेहरा करायचा.. बरोबर ना?<br />
<br />
तुम्हाला एक दिवसाची सुट्टी हवी आहे.. तुम्ही बॉसकड़े जाता.. मार्च-एंड आहे, प्रोजेक्ट डेडलाइन आहे इथपासून तर थेट अशी कशी एकदम सुट्टी मागता रे तुम्ही लोकं, प्रि-प्लांड लीव असेल तरच मी अप्रूव करणार अशी उत्तरं मिळतात.. तुमचा हिरमोड होतो आणि डेस्ककड़े परत जाताना एकदम तुम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात... मैटिनी शो बघण्यासाठी सगळ्या ग्रुपनी ठरवून केलेला मास बंक आठवतो आणि प्रोफेसर्सला घाबरणाऱ्या मित्र/मैत्रिणिना - घाबरू नका रे, एक दिवस लेक्चर्स नाही केले तर काही फरक पडत नाही असा दिलेला दिलासा आठवतो... आठवतो ना?<br />
<br />
तुम्ही तुमच्या गाडीतून घरी येत असताना तुमचा गाणी ऐकण्याचा मूड बनतो... मग तुम्ही रेडियो लावता तर (as usual) झाडून सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर एकाच वेळी जाहिराती लागलेल्या... अस्वस्थ होऊन तुम्ही दोन चारदा सगळे स्टेशन्स बदलून बघता पण नो लक.. वैतागून तुम्ही रेडियो बंद करणार तेवढ्यात एका स्टेशनवर 'पुरानी जीन्स और गिटार' गाणं लागतं.. तुम्ही गाड़ी स्लो करता... गाणं जसजसं पुढे जात राहातं तसतसं तुम्ही कॉलेजच्या आठवणीत गुंग होत जाता... विशेषत: "पहुचना कॉलेज हमेशा लेट, वो केहेना सर का गेट आऊट फ्रॉम द क्लास... वो बाहर जाके हमेशा केहेना यहाँ का सिस्टम ही है ख़राब" ह्यावर तुम्ही स्वतःशीच हसता...हसता ना?<br />
<br />
ऑफिसची पार्टी चालू आहे.... सूप, सैलड, पापड, रायत्यापासून तर डेझर्टपर्यन्त मुबलक पदार्थांची रेलचेल आहे.. तुम्ही सगळं थोडं थोडं घेत खायला बसता... अचानक तुम्हाला कॉलेजच्या कैंटीनमधे गैंग सोबत चार पाच फ्रेंड्समधे प्रत्येकी एखाद दोन चमचे खाल्लेली मिसळ किंवा सात आठ फ्रैंडसमधे खाल्लेले 4 वडापाव आठवतात आणि मग तुम्हाला समोरचं, एकसे एक पदार्थानी भरलेलं, ताट - मिसळ आणि वडापावपुढं फिकं वाटू लागतं...खरंय ना?<br />
<br />
👆🏽 कॉलेज लाईफच्या ह्या आणि अशा अनेक आठवणी येऊन तुम्ही नक्कीच नॉस्टॅल्जिक होत असणार..<br />
<br />
चला तर मग, ह्या आठवणीना ऊजाळा देऊ या... खुप हसू या, धमाल करुया आणि कॉलेज लाइफ पुन्हा एकदा एन्जॉय करू या</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-17777703148071992462016-01-27T04:07:00.001+05:302016-01-27T04:24:06.210+05:30केळशी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
26 जानेवारीला मंगळवार आलेला पाहुन एखाद्या सराईत सुट्टीटाक्यासारखी मी पटकन 25 ची लिव्ह रिक्वेस्ट टाकली. चीते की चाल, बाझ की नजर और हृषी के लीव्ह प्लानिंग का कोई मुकाबला नहीं असा उगीचच आत्मप्रौढीचा एक टुकार डायलॉग सुचला :-)<br />
<br />
असो, 4 दिवस तंगड्या वर करुन लोळत पडण्याच्या आळशी महत्वाकांक्षेला बायकोनी पहिला सुरुंग लावला. ऑफिसात जाणार नसशील तर ट्रिप ला जायच असा एक क्रूर फतवा निघाला. 26 जानेवारीला सोसायटीत झेंडावंदन,राष्ट्रगीत असतं असा मी तत्परतेनी युक्तीवाद केला. त्यावर, इतर वेळी महत्वाची कामं हमखास विसरणाऱ्या बायकोनी, स्मरणशक्तीला जराही ताण न देता, गेले 3 वर्ष मी 26 जानेवारीची सकाळ अंथरुणात लोळत काढत आलो आहे अशी (न विचारता) माहिती पुरवली. आता चारीमुंडया चित झाल्यामुळे ट्रिप च ठिकाण शोधणं क्रमप्राप्त झालं.<br />
<br />
एकंदरीतच मला गजबजलेल्या ठिकाणी ट्रिप ला जायचा तिटकारा. त्यामुळे फार लांब नाही आणि तुरळक गर्दीचं ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातलं केळशी फायनल केलं.<br />
(आणि तिसरं सर्वात महत्वाचं पण सीक्रेट कारण म्हणजे समुद्रकिनारी ट्रिप ला गेल्यावर फार काही धावपळ करावी लागत नाही.. सकाळ, संध्याकाळ बीचवर निवांत जाऊन बसलं की झालं :-)) आमचे एक नातेवाईक नुकतेच केळशीला जाऊन आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून तिथल्या मुक्कामाचा पत्ता घेऊन चटदिशी बुकिंगपण करून टाकलं. आता ह्या फास्टट्रैक कामगिरीवर खुश होईल ती बायको कसची. (नेहमीसारखच ह्याही वेळी)नेट वर सर्च न करता (आळशासारखं) आयतं बुकिंग पदरात पाडून घेतलं हे ऐकावं लागलं.<br />
<br />
अखेर केळशीला जायचा तो डी-डे उगवला. कोकण म्हणजे खराब रस्ते ही खूणगाठ मी आधीच मनाशी बांधली होती, त्यामुळे प्रवासाचा काही त्रास जाणवला नाही. आणि तसपण मला मुक्कामी पोहोचण्यापेक्षा जातानाचा प्रवास जास्त आवडतो. एखाद्या ठिकाणी चहा, मिसळ हादडावी, पुढं जाऊन मग उसाचा रस प्यावा आणि मग ड्राईवर ला झोप येते ह्या सबबीखाली परत एक दोन चारदा चहा मारावा ह्या माझ्या सुखकर प्रवासाच्या कल्पना :-) बायकोनी किंवा आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर बघा तुमच्यासाठी एवढी ट्रिप काढतोय मग स्वतःसाठी एवढं पण करू नको का? हे नेहमीचं यशस्वी इमोशनल ब्लैकमेलिंग कामी येतं :-)<br />
<br />
माणगाव, मंडणगड ही मोठी गावं सोडली आणि मग खरा कोकण सुरु झाला. लाल मातीचा धुराळा आणि ती माती अंगावर पडल्यामुळे कुस्ती खेळून आल्यासारखी दिसणारी रस्त्यालगतची झाडे,झुडपे.. अधुन मधून दिसणारी ऊंच, शिडशिडीत नारळ, सुपारीची झाडं आणि अर्थातच खरवडून काढल्यासारखे दिसणारे (आणि जाणवणारे) बैलगाडीतून जायच्या योग्यतेचे रस्ते..<br />
<br />
रस्त्यावर इतके भयंकर खाचखळगे की शोले मधल्या बसंतीच्या टांग्यासारखं आपल्याही गाडीचं चाक निखळून पडतं की काय अशी धास्ती वाटायला लागली..<br />
<br />
केळशीच्या फाट्यावर एका मच्छी विकणाऱ्या आजीबाईनी लिफ्ट मागितली. गाडीत बसल्यावर त्यांनी विचारलं कुठून आला पावनं? पुण्याहून अस सांगितल्यावर त्या म्हणाल्या बऱ्याच लांबनं आलात की. ह्यावर मी बायकोकडे विजयी मुद्रेनी एक कटाक्ष टाकला की बघ किती लांबचं ड्राइविंग करत आलोय आणि त्याचं ह्या परक्या आजीबाईनाही कौतुक आहे. पण पुढच्या क्षणी, पुण्याचं काय घेऊन बसलाय पार लांब लांबनं लोक येतात इथे अस बोलून त्या आजीबाईनी माझं विमान लगेच खाली उतरवलं. आता ह्या आजीना इथेच उतरवुन द्यावं आणि म्हणावं की ते लांब लांबचे लोक सोडवतील तुम्हाला इथून घरी असा एक असुरी विचार मनात आला पण माझ्यातल्या सहृदयी माणसानी तो लगेच झटकुनही टाकला.<br />
<br />
असो, त्या आजींना त्यांच्या घरापाशी सोडल्यावर त्यांनी लगेच मला 20 रुपये देऊ केले. त्यांना नकार देत पुढं आलो तर बायको म्हणाली तरी सांगत होते दाढी करून ये, जरा बरे कपडे घाल. ती तुला सिक्स सीटर वाली समजली. आणि मग स्वतःच्या जोकवर एकटीच जोराजोरात हसली. नशीब माझा मुलगा झोपला होता नाहीतर पुण्यात परतल्यावर आमच्या बाबांना तिकडे सिक्स सीटर वाले समजले असं सगळ्यांना सांगितलं असतं. आजीना मधेच न उतरवु दिलेल्या माझ्यातल्या त्या सहृदयी माणसावर चरफडत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो.<br />
<br />
ते घरगुती रिसॉर्ट अगदी बीच ला लागुनच होतं. पण आमची रूम आणि वॉशरूम पाहिल्यावर मला एकदम आम्ही लहानपणी वाड्यात राहायचो त्याची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ओला नारळ किसून, कोथिंबीर भुरभुरून घातलेले चविष्ट कांदा-पोहे खाऊन आम्ही बीचवर गेलो. इथली वाळू अतिशय मऊ आणि चमकदार. बीच बऱ्यापैकी निर्जन. तो भलामोठ्ठा किनारा पाहून माझ्या मुलानी चपला भिरकावून दिल्या आणि पळत सुटला. मी बायकोचं लक्ष नाही अस पाहून तिथल्या एकमेव झोपडीवजा हॉटेलात चहा ऑर्डर केला (ऑलरेडी दोन कप पीऊन झाला होता :-))<br />
<br />
चहा पिऊन मग मुलासोबत खेळायला बीचवर गेलो. मधल्या ओलसर पट्टयात छोट्या किड्यांनी/खेकडयानी छिद्र पाडून घरं बनवली होती. ते तुरुतुरु पळायचे तेव्हा त्यांच्या पायामुळे ठिकठिकाणी टिंबांचे सुबकसे डिजाईन तयार व्हायचे. बरेचसे डिजाईन मला नारळाच्या झाडासारखे वाटले.<br />
<br />
बायकोनी मुलाला एक छोटीशी बादली दिली आणि मग आम्ही तिघे शंख शिंपले गोळा करायच्या मोहिमेवर रवाना झालो. पांढरे शुभ्र, गुलाबी, जांभळे, ऑरेंज कलरच्या अनेक शिंपल्यानी त्याची बादली भरून गेली. गंमत म्हणजे आम्हाला एकही शंख सापडला नाही. नवीन शिंपला सापडल्यावर प्रत्येक वेळी मुलगा आनंदानी जल्लोष करत होता. गाडया, चॉकलेटं, मोबाईल/टॅब वरचे गेम्स हे मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आणि वेगळा आनंद त्याच्या निरागस डोळ्यात आम्हाला त्यावेळी दिसला. तीच गोष्ट वाळुचा किल्ला बनवताना. त्याच्यासोबत आम्हीही आमचं बालपण एन्जॉय केलं. सर्वात सुंदर आणि कायमस्वरूपी आनंद देणाऱ्या गोष्टी निसर्गात मोफत उपलब्ध असतात अशा काहीशा आशयाचा एक सुविचार आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. शेवटी कडक ऊन व्हायला लागल्यावर मुलाला नाईलाजानी बळजबरी बीचवरून ओढून न्यावं लागलं.<br />
<br />
पुढच्या दोन दिवसात आम्ही आजुबाजुची ठिकाणं बघितली. केळशीतच एक याकूब बाबा दर्गा आहे. ते शिवाजी महाराजांचे सातवे गुरु म्हणून ओळखले जातात. तिथे जाताना परत एक आज्जी भेटल्या आणि त्यांना घरी सोडल्यावर त्यांनी पण 20 रुपये देऊ केले. ह्यावेळी, मागल्या वेळेपेक्षा, दाढी जास्त वाढली होती त्यामुळे त्या आज्जीना मी बेनिफिट ऑफ़ डाउट दिला :-)<br />
<br />
नंतर आम्ही अंजर्ले आणि हर्णे (किंवा हरणाई) ही सुंदर गावं/समुद्रकिनारे पाहिले. अंजरल्याहुन हर्णेला जाताना घाटात अगदी मोक्याच्या ठिकाणी व्हिला 270 म्हणून एक पॉश हॉटेल दिसलं. त्या स्पॉट वरून खाली दिसणारा देखावा अतिशय निसर्गरम्य होता. अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र, त्याला लागून असलेला सुंदरसा किनारा, छानशी कौलारु घरं आणि आजुबाजुला नारळाची झाडं. त्या हॉटेल च ऑनलाइन बुकिंग करता येतं अस समजल आणि मग एक दिवस इथे नक्की रहायला यायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली.<br />
<br />
एक दिवस आम्ही वेळासला गेलो. इथला समुद्रकिनारा तुलनेनी छोटा पण अगदी सुनसान. इथे हजारो कासवं फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान अंडी घालायला येतात आणि चिपळूणची एक संस्था, वेळास ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्या अंडयांच संरक्षण करते. ते पहायला खूप पर्यटक येतात. नाना फडणवीस सुद्धा ह्याच गावचे. त्यांचा जुना वाडा पडून तिथे फक्त एक चौथरा शिल्लक आहे. त्यावर नानांचा एक अर्धाकृती पुतळा उभारला आहे. ह्या भागात हॉटेलं जवळपास नाहीच. मग तिथल्याच् एका घरगुती खानावळीत जेवून केळशीला परतलो.<br />
<br />
शेवटच्या दिवशी निघायच खर तर अगदी जीवावर आलेलं. उसनं अवसान आणून 9 ते 6 च्या रूटीन मधे अडकायला पुण्याकडे परत निघालो. बायको आणि मुलगा जाम खुश दिसले आणि मीही आता पुढचे सात आठ वीकेंड तरी तंगड्या वर करत आराम करायला मोकळा ह्या आनंदात गाड़ी स्टार्ट केली :-)</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-76174064219117487342016-01-23T14:10:00.000+05:302016-01-23T14:10:03.586+05:30सूर्या....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
उठलोय भल्या पहाटे जाब विचारायला त्या लालभडक गोळ्याला, सूर्य नावाच्या पक्षाला...<br />
<br />
हेच की रोज पूर्वेकडच्या भांडवलशाही स्वार्थानी पिचपिचलेल्या प्रदेशातूनच उगवायचा तू ठेका घेतला आहेस का? <br />
<br />
अरे तू स्वयंभू आहेस की नाक्यावरल्या शेटजींच्या कोळशाच्या फैक्ट्री चा मुकादम???<br />
<br />
तू जोवर येतोस ना तुझ्या आवडीच्या प्रदेशांना प्रकाश बहाल करत आमच्याकडे, तोवर गारठुन गेलेली असतात आमची शरीरे आणि मनेही<br />
<br />
एकदा तरी आमच्या इकडून उगवुन बघ जरा, डोक्यावर घेऊन नाचू तुला, भले तुझ्या आगीत आम्ही ख़ाक झालो तरीही<br />
<br />
जीवाच्या आकांतानी एवढा आक्रोश करूनही मला पूर्ण खात्री आहे की तू उद्या परत त्याच सुखवस्तु, साखरझोपेत असणाऱ्या श्रीमंत लोकांच्या बंद भिंतींवर ईमान इतबारे प्रकाश फेकत, सवडीने, तुझी चातकासारखी वाट पाहणाऱ्या आमच्याकडे येणार<br />
<br />
चूक तुझी नाहिये रे कारण तू आहेस दिलेलं काम निमुटपणे, शुष्कपणे करणारा थंड रक्ताचा एक भावनाविरहीत लालबुंद गोळा........</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-42707741449505146402016-01-23T01:33:00.002+05:302016-01-23T01:42:40.945+05:30एक विद्रोही व्हॉट्सऍप कविता<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
डिस्क्लेमर: ही एक काल्पनिक कविता असून तिचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी/वृत्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा<br />
<br />
****************************<br />
<br />
मेसेज वाचून ढिम्म पणे आपल्या सुखवस्तु आयुष्यात परतणारी मतलबी गिधाडं,<br />
<br />
फक्त मोजक्या उच्चभ्रूनाच छान म्हणणारे कोत्या वृत्तीचे कावळे,<br />
<br />
गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करुन गपगार पडणारे थंड रक्ताचे अजगर<br />
<br />
लांबलचक मेसेज कुरतडल्यासारखा वाचून लगेच वाह वाह करणारे अल्पसंतुष्टी उंदीर,<br />
<br />
नविन मेसेज आला की लगेच अधाशासारखा वाचणारे वखवखलेले भुकेले कुत्रे,<br />
<br />
ग्रुपवर आलेल्या नविन माणसाचे लचके तोडायला हपापलेला लांडग्यांचा कळप,<br />
<br />
दिवसभर नेट बंद ठेवून रात्री सगळे मेसेज वाचणारी वटवाघळं,<br />
<br />
ग्रुपवर शांत असण्याचं ढोंग करुन पर्सनल ला हळूच मेसेज करणारे धूर्त कोल्हे,<br />
<br />
असे बूर्ज्वा लोक इथे असताना मी का रहावं या वाॅटस्अॅप च्या जंगलात??<br />
...</div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-84194855445224726282013-03-26T04:00:00.000+05:302013-03-26T04:00:45.165+05:30रात <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhEf76v2zdmNdUi5OeYGtOVxYln-P4BBTAss3S0j9iXHBA6aTzq_YjUHNHhFtuIdpG-9Pgb4w5ZkOeM3G6GZ3aMgBwHzYDio6xvS38vZjtkF5sT96WxIpEkP26GlflU78rrWQwWDqvBQho/s1600/raat.png" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhEf76v2zdmNdUi5OeYGtOVxYln-P4BBTAss3S0j9iXHBA6aTzq_YjUHNHhFtuIdpG-9Pgb4w5ZkOeM3G6GZ3aMgBwHzYDio6xvS38vZjtkF5sT96WxIpEkP26GlflU78rrWQwWDqvBQho/s1600/raat.png" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8SveK8SpjJmQ9kWLILlGh8JgASDWo4J8LHtbNC2Z3OXAzTZ1mra40o4gG1RjJu1K7gddOULhpk7-akQvyyJ9Yl3N2Xv6f7W5ijaSR5sid-7XxCdIGhWlfBIEVHaO5DAa_AHradsYXJCQ/s1600/raat1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"></a></div>
<br />
<br />
<br />
परवा परत एकदा रात बघितला आणि जाणवलं की नव्वदच्या दशकात जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा जेवढा भारावून (इथे घाबरून असं वाचा) गेलो होतो तेवढाच प्रभाव आज १५-२० वर्षांनीही जाणवला. आपण नेहेमी म्हणतो की हिंदी हॉरर मूव्हीज हॉरर कमी आणि कॉमेडी जास्त वाटतात (रामसे बंधूचे चित्रपट आठवून बघा). खरं आहे ते म्हणा.. चित्रविचित्र चेहेरे, टोमॅटो सॉसनी आंघोळ केल्यासारखं भूत/हडळ, लहानपणापासून फक्त कॅल्शियम खाल्लंय की काय असं दाखवून देणारे लांबलचक दात/सुळे, टूथपेस्ट/टूथब्रशचा शोध अजून लागायचा आहे असं वाटणारे आणि कायम राख/मिश्रीसारख्या पदार्थांनी घासत असल्यासारखे ते काळे़क्कुट्ट दात, एकाचवेळी साधारण १० लाख धूप पेटवल्यासारखा तो धूर आणि त्यातून प्रकट होणारं भूत/हडळ. हेच पहायची सवय लागली होती आपल्याला. <br />
<br />
भूताचं फक्त अस्तित्व जाणवून देणं आणि वरती सांगितल्यासारखी रंगरंगोटी न करता सुद्धा हॉरर चित्रपट बनू शकतो हेच आपण विसरलो होतो. अशातच ९२ साली राम गोपाल वर्माचा रात आला. चित्रपटाच्या पोस्टरवर जरी रामसे बंधूंटाईप लाल डोळ्यावाली, निळ्या तोंडावाली हडळ असली तरी चित्रपटात ते अगदी शेवटी दाखवतात. <br />
<br />
चित्रपट सुरु होतो तो एका सुनसान गावापासून. एक बस थांबते आणि रेवती बसमधून उतरते. तिला गावात कोणीच दिसत नाही. इकडे तिकडे भटकून ती एका कारपाशी येते आणि तिला कारमधे काहीतरी दिसतं (काय ते दाखवत नाहीत, फक्त रेवतीच्या घाबरलेल्या चेहेर्याकडे बघून आपल्याला जाणीव होते) आणि ती सैरावैरा पळत सुटते. अनेक घरांची दारं ठोठावते पण कोणीच उघडत नाही. शेवटी एक घर तिला उघडं दिसतं आणि ती आत शिरते. आतल्या खोल्यांची दारं बंद असतात आणि तेवढ्यात आत कोणीतरी येतं (फक्त अस्तित्व) आणि रेवती त्याला/तिला पाहून किंचाळत झोपेतून उठते. अर्थातच ते तिचं स्वप्न असतं. <br />
<br />
आकाश खुराणा, त्याची बायको रोहिणी हट्टंगडी, मुलगी रेवती, एक नातू (ज्याचे आईवडील अॅक्सिडेंट मधे गेलेले असतात) आणि एक नोकर असे एका बंगल्यात रहायला येतात. शेजारच्या बंगल्याची एक खिडकी दाखवतात जिथून कोणाच्यातरी श्वासांचा आवाज येत रहातो (एका आजींच्या ज्यांच्या हातात कायम जपमाळ असते). रेवती आणि शेजारच्या बंगल्यातली तिची मैत्रीण कॉलेजमधे शिकत असतात. ह्या बंगल्याला एक तळघर असतं जिथं अडगळीचं सामान असतं. रोहिणी हट्टंगडीला तिथे काहीतरी आहे अशी सामान हलवताना शंका येते पण तिला काही दिसत नाही. तिच्या नातवाला मात्र तिथे एकदा मांजराचं पिल्लू दिसतं आणि मग ते मांजरांचं पिल्लू कायम त्या मुलाबरोबरच रहायला लागतं. <br />
एकदा आकाश खुराणा ऑफिसला जात असताना त्याच्या गाडीच्या चाकाखाली ते मांजर येऊन मरतं. नोकर लगेच त्या मांजराला पुरतो पण आता त्या मुलाला काय सांगायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो. एक दिवस अचानक ते पिल्लू त्या मुलाच्या रूममधे येतं आणि मुलगा आनंदी होतो. तेवढ्यात रोहिणी त्याच्या रूममधे येते आणि त्या पिल्लाला पाहून प्रचंड घाबरते. ती आरडाओरडा करते आणि मग रेवती, तिचे वडील काय झालं ते पहायला येतात. ते तिची अशी समजूत काढतात की ते दुसरं मांजर पण असू शकतं. <br />
<br />
रेवती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवर पिकनिकला जाते. परत येत असताना त्यांची गाडी पंक्चर होते. तो बॉयफ्रेंड एका माणसाकडे लिफ्ट मागून त्याच्यासोबत बदली टायर आणायला जातो आणि रेवतीला तिथेच थांबायला सांगतो. ती रस्त्याच्या कडेला बसली असतानाच आतून झाडीमधून काहीतरी येताना दाखवतात आणि रेवतीच्या शेजारी आल्यावर तिचे केस वार्याने उडतात. ती नजर वळवते आणि त्या गोष्टीकडे बघते. त्यानंतर डायरे़क्ट तिचा बॉयफ्रेंड टायर घेऊन परत येताना दाखवला. त्याला रेवती कुठे दिसत नाही. तिला शोधत शोधत तो झाडीत घुसतो. एका तळ्याच्या काठाशी ती मान खाली घालून बसलेली दिसते. हा तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारतो, ती डोकं वर उचलते आणि तिचे डोळे घारे झालेले दाखवतात. ते पाहून बॉयफ्रेंड जाम टरकतो आणि तोल जाऊन पाण्यात पडतो. पुढच्याच क्षणाला ती नॉर्मल होते आणि त्याला म्हणते की तू पाण्यात कसा पडला. ते घरी परत येतात पण ती त्याच्याकडे न बघता, बाय न म्हणता तरातरा चालत घरात जाते आणि तिच्या रूममधे जाऊन झोपते. रात्री उशिरा तिचे आई-वडील येतात आणि नोकर त्यांना सांगतो की रेवती न जेवता झोपली. तिची आई तिला बोलवायला जाते. रेवती झोपलली असते आणि दरवाज्याकडे तिची पाठ असते. रोहिणी नाईट लँप लावते आणि रेवती डोळे उघडते. तिचे डोळे परत घारे झालेले दाखवतात. रोहिणी तिच्या जवळ येते (आपल्याला वाटतं की आता काहीतरी होईल) आणि ती झोपली आहे असं समजून नाईट लॅंप बंद करून जाते. <br />
<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8SveK8SpjJmQ9kWLILlGh8JgASDWo4J8LHtbNC2Z3OXAzTZ1mra40o4gG1RjJu1K7gddOULhpk7-akQvyyJ9Yl3N2Xv6f7W5ijaSR5sid-7XxCdIGhWlfBIEVHaO5DAa_AHradsYXJCQ/s1600/raat1.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8SveK8SpjJmQ9kWLILlGh8JgASDWo4J8LHtbNC2Z3OXAzTZ1mra40o4gG1RjJu1K7gddOULhpk7-akQvyyJ9Yl3N2Xv6f7W5ijaSR5sid-7XxCdIGhWlfBIEVHaO5DAa_AHradsYXJCQ/s1600/raat1.png" /></a><br />
<br />
रेवती, तिचा बॉयफ्रेंड आणि तिची मैत्रीण एका लग्नाला जातात. तिची मैत्रीण ज्या मुलीचं लग्न असतं तिच्या रूममधे जाते. रेवती आणि तिचा बॉयफ्रेंड खालीच बसलेले असतात. थोड्या वेळानी तिच्या बॉयफ्रेंडशेजारी त्याचा एक मित्र येतो आणि ते दोघं गप्पा मारायला जातात. अचानक रेवती उठते आणि एका धुंदीत चालायला लागते. जिना चढून ती टेरेसमधे जाते. तिथेच शेजारी तिची मैत्रीण आणि बाकीच्या मुली असतात. रेवतीची मैत्रीण तिला पाहते आणि टेरेसमधे जाते. रेवती पाठमोरी असते.. ही तिला आवाज देत तिच्या जवळ जाते. रेवती वळते आणि तिचे डोळे परत घारे झालेले असतात. ती हसते आणि तिच्या मैत्रीणीच्या जवळ जाते. काही कळायच्या आत रेवती तिच्या मैत्रीणीची मान मुरगाळून टाकते. त्याच ट्रान्स मधे ती खाली येऊन तिच्या बॉयफ्रेंडशेजारी येऊन बसते. थोड्या वेळानी एका बाईला ती जेव्हा टेरेसमधे जाते तेव्हा रेवतीची मैत्रीण मान मुरगळल्याच्या स्थितीत मेलेली आढळते आणि मग ती आरडाओरडा करते. <br />
<br />
आकाश खुराणाला एकदा मध्यरात्री तहान लागते. तो स्वयंपाकघरात येऊन फ्रिजमधलं पाणी पितो. तेवढ्यात त्याला वरच्या खोलीतून कोणीतरी भेसूर आवाजात रडताना ऐकू येतं. तो वरती रेवतीच्या रूममधे पहायला जातो. त्याला रूममधे, अॅटॅच्ड बाथरूम मधे कोणीच दिसत नाही. त्याला बाल्कनी उघडी दिसते, तिथे तो जातो. तिथेही त्याला रेवती दिसत नाही. तो पाठमोरा वळतो आणि रेवती समोर उभी असते - घारे डोळे आणि तीच भेदक नजर. रेवती त्याचा गळा पकडते आणि त्याला जोरात ढकलून देते. आरडाओरडा ऐकून रोहिणी वरती येते आणि मुलीला पाहून ती पण घाबरते. दुसर्या दिवशी ते डॉक्टरांना बोलावतात आणि एकंदर प्रसंग ऐकून ते एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात आणि तो तिची ट्रीटमेंट चालू करतो. <br />
<br />
इकडे नोकर रोहिणीला सांगतो की तुम्ही शेजारच्या आजींना भेटा त्यांना माहितीये की ह्या बंगल्यात काय झालंय आधी ते. त्या आजींच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एका बाईचा तिच्या नवर्यानी गळा दाबून खून केला होता आणि मग काही दिवसांनी त्या माणसाचा पण गळा दाबूनच खून होतो जो कोणी केला ते कधीच कळत नाही. त्या बाईचं भूत अजूनही त्या घरात आहे आणि रेवतीच्या अंगात शिरून तिला त्रास देतंय. आजीबाई त्यांना एका मांत्रिकाला भेटायला सांगतात (ओम पुरी). <br />
<br />
ओम पुरी त्यांना पाहिल्या पाहिल्या म्हणतो की मला माहितीये तुम्ही माझ्याकडे का आला आहात ते. तो त्यांच्यासोबत बंगल्यात येतो आणि त्याला जाणवतं की इथल्या तळघरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो रेवतीच्या बॉयफ्रेंडला ते तळघर खणायला सांगतो. एक-दोन फरशा उकरून काढल्यावर एक मोठ्ठं भुयार दिसतं. हे दोघं खाली उतरतात. थोडंसं पुढं आल्यावर एक किंचित वळण येतं आणि लगेच उजव्या बाजूला एक बाई लाल साडी मधे बसलेली असते (इथे खरंच भिती वाटते). ओम पुरी लगेच ओळखतो की हीच ती हडळ. मग तिनी रेवतीचं रूप घेणं आणि मग त्या बॉयफ्रेंडला फसवणं हे सगळं होतं. शेवटी ओम पुरी तिच्या कपाळाला भस्म लावून तिला मुक्त करतो. इथं मात्र मान्य केलं पाहिजे की ते काळे दात, त्या हडळीचं भस्म लावल्यावर विरघळून जाणं हे थोडं रामसे स्टाईल झालंय खरं.. पण ते अगदी ५ मिनिटांसाठी. <br />
<br />
शेवटी रोहिणी ओम पुरीला विचारते की हे सगळं काय आहे? त्यावर ओम पुरी त्याच्या खास आवाजात सांगतो की "जब रात का अंधेरा होता है तो हम दीप जलाते है. लेकीन इससे अंधेरा मिट नही जाता. बल्की एक सीमित दायरे के अंदर रौशनी हो जाती है. पर हम ये भूल जते है की इस रौशनी के दायरे के बाहर जिस अनंत अंधेरेने हमे घेर रखा है न जाने कुदरतने उसमे क्या क्या छुपाके रखा है. ये एक अनोखी बात है के हम उसीको संसार मानते है जिसे हम समझ सकते है. लेकिन उस अंधेरे से हमे सचेत रहेना है जो अभी तक इन्सानी रौशनी के दायरे मे नही आया. हो सकता है की एक दिन इन्सान उस अंधेरे का रहस्य भी जान ले."<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhEf76v2zdmNdUi5OeYGtOVxYln-P4BBTAss3S0j9iXHBA6aTzq_YjUHNHhFtuIdpG-9Pgb4w5ZkOeM3G6GZ3aMgBwHzYDio6xvS38vZjtkF5sT96WxIpEkP26GlflU78rrWQwWDqvBQho/s1600/raat.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"></a><br /></div>
त्या छोट्या मुलाकडे परत मांजर दाखवून चित्रपट संपवला आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग सांगणं अशक्य आहे. जेवढे महत्वाचे वाटले तेवढे सांगितले. कलाकारांचा अभिनय (विशेषतः रेवतीचा), बॅकग्राऊंड म्युझिक, दिग्दर्शन ह्या सगळ्या जमेच्या बाजू. राम गोपाल वर्माचा अगदी सुरुवातीचा पिक्चर होता हा. त्यामुळे मन लावून दिग्दर्शित केल्यासारखा वाटतो. (जसं नोकरीमधे माणूस प्रोबेशन पिरीअड मधे खूप चांगलं काम करतो आणि एकदा पर्मनंट झाला की पाट्या टाकायला सुरुवात करतो तसं). </div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-78710777214512940622013-01-08T02:47:00.000+05:302013-01-08T02:47:02.660+05:30माझे ह्या वर्षीचे संकल्प<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की <br />
<br />
अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते <br />
ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं <br />
क] संकल्प केले जातात.<br />
<br />
संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो. जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात. अर्थात संकल्प करण्यात जी मजा आहे ती त्याच्या अंमलबजावणीत नक्कीच नाही हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो. उदाहरणार्थ, ह्या वर्षी व्यायाम सुरु करणार ह्याचा चारचौघात, घरच्यांसमोर गाजावाजा करण्यात जी मजा आहे ती वर्षभर नियमितपणे तो करण्यात नाही. संकल्प सिद्धिस नेला की एकतर पुढच्या वर्षी नवीन संकल्प शोधावा लागतो आणि "ह्या वर्षी तरी हा संकल्प पुरा करणार का?" ही भोवतालच्यांची उत्सुकता पहायला मिळत नाही. जशी काही प्रकारची दारू जेवढी जुनी होत जाते तेवढी त्याची किंमत वाढत जाते तसंच काहीसं संकल्पाबाबत असावं. संकल्प जेवढा जुना (म्हणजे आजपर्यंत तडीस न नेता आलेला) तेवढी त्यातली रंगत वाढत जाते.<br />
<br />
ह्या वर्षी म्हटलं ते काही नाही. ह्यावेळी संकल्प पूर्ण करूनच दाखवणार. खरंतर आपण जे संकल्प करतो ते बर्याचदा आवाक्याबाहेरचे असतात. ह्या वर्षी ठरवलं की सहज साध्य होणारेच संकल्प करूयात. <br />
<br />
१. १२ च्या आधी झोपणार नाही. १०.३०-११ ला झोपलं की उगीचच पेन्शनर असल्यासारखं किंवा म्हातारं झाल्याचा फील येतो. <br />
<br />
२. घरी कपड्यांना इस्त्री करून स्वावलंबी होण्याऐवजी कपडे इस्त्रीवाल्याकडेच देईन. चांगला आहे बिचारा.. प्रामाणिक आहे. वेळेत कपडे इस्त्री करुन देतो आणि २-५ रुपये सुट्टे नसतील तर पुढच्या वेळी अॅडजस्ट पण करतो. मागे तर एका कार्यक्रमासाठी झब्बा अर्जंट इस्त्री करून दे म्हटलं तर बाकीच्यांचे कपडे बाजूला ठेवून अर्ध्या तासात दिला. अजून काय पाहिजे. <br />
<br />
३. गाडी स्वतः पुसायच्या/धुवायच्या फंदात पडणार नाही. एक दोनदा प्रयत्न केला, नाही असं नाही. पण काचा धुऱकट होतात, त्या फडक्याचे धागे काचेला लागून काचही खराब आणि फडकंही लवकर खराब. आणि नेहेमी गाडी धुणार्यापेक्षा जास्त पाणी लागतं स्वत: धुवायला गेलं की. आधीच पाण्याची बोंब आहे. नेमकं ज्यावेळी आपण गाडी धुवायला जातो त्याचवेळी गाडी धुणारा शेजारच्याची गाडी धूत असतो. मग उगीचच तो आपल्याकडे रागाने पाहतोय असं वाटायला लागतं. त्यापेक्षा नकोच ते गाडी धुणं. <br />
<br />
४. आज आत्तापर्यंत किती कप चहा झाला ते मोजत बसणार नाही. काय होतं की उगीचच गिल्टी फिल करून घेऊन चहा पिण्यातली मजा घालवण्यात अर्थ नाही. बाकीच्यांना काय काय व्यसनं असतात त्यापेक्षा चहाचं निरूपद्रवी व्यसनं बरं. बरं चहा एकदम बंद केला की बाकीच्यांची पंचाईत होते. घरी सारखा चहा प्यायला लागलो की घरचे ओरडतात - अरे किती चहा पितो.. चांगला नाही बरं एवढा चहा पिणं. माझ्या प्रत्येक चहाबरोबर घरचेही अर्धा कप घेतात. तुम्ही का घेता विचारलं की अरे उगीच आता तुला करायचाच होता म्हणून घोटभर माझाही टाकला. मग म्हटलं आपण चहा बंद केला की ह्यांचा घोटभर चहाही बंद होईल. बरं कोणाकडे गेलं की ते पहिला प्रश्न विचारतात - चहा घेणार का? आता नाही म्हटलं की समोरच्याची पंचाईत होऊन जाते. मग लिंबू सरबत तरी घ्या. चालेल म्हटलं की नेमकी घरातली लिंबं संपलेली. दूध घ्यावं म्हटलं की बर्याचदा चहापुरतंच दूध शिल्लक असतं. मग उगीचच समोरच्याला ओशाळल्यासारखं होतं. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावण्यापेक्षा कपभर चहा घेतलेला बरा. <br />
<br />
५. रोज सकाळी लवकरच उठलं पाहिजे असं स्वतःवर बंधन घालून घेणार नाही. ३-४ वेळा पहाटेच वीज गेली आणि पंखा बंद झाल्यामुळे जाग आली. ऑफिससाठी निघायला चिक्कार वेळ होता. काय करावं असा प्रश्न पडला. बाकीचे कोणीच न उठल्यामुळे स्वतःच चहा करून घ्यावा लागला. पहाटे पहाटे अगदी छोटासा आवाज पण फार मोठा वाटतो आणि त्यामुळे बाकीचे डिस्टर्ब होतील की काय अशी भिती वाटत राहते. त्यामुळे उगीचच स्वत:च्याच घरात दबकत फिरावं लागतं. फिरायला जावं म्हटलं तर परवाच एकाच्या मागे कुत्री लागून त्यातलं एक त्याला चावलं होतं हे कळल्यामुळे तोही विचार सोडून दिला. फिरायला जायच्या निदान ४-८ दिवस आधी कॉर्पोरेशनला सांगून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. बरं टीव्ही लावला तर सगळीकडे आध्यात्मिक प्रवचनं, सत्संग चालू. एकदा तासभर पाहिलं ते आणि त्याच्या प्रभावामुळे अ] जीवन हे मिथ्थ्या आहे ब] पैशाचा मोह फार वाईट आणि त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही हे पटलं आणि तो क्षुद्र पैसा कमवायला ऑफिसला तरी कशाला जायचं असा विचार करून दांडी मारली. दुसर्या दिवशी नॉर्मल झालो पण हकनाक एक कॅज्युअल लिव्ह वाया गेली. तात्पर्य, लवकर उठून नुकसानच जास्त होतं. त्यापेक्षा ऑफिसला जायच्या थोडंसं आधी उठून भराभरा आवरून गेलेलं बरं. <br />
<br />असो.. सध्या तरी हे ५ संकल्प केले आहेत. २०१३ मधे हे विनासायास पूर्ण होतील अशी खात्री वाटते. </div>
Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-11876579142737581242011-11-10T01:26:00.016+05:302011-11-10T03:49:53.798+05:30टंकलेखन(हा लेख मी एक टंकलेखनाचा माजी विद्यार्थी ह्या भूमिकेतून लिहित आहे.)<br /><br />मला आठवत, टंकलेखन शिकण्याची माझी सुरवात "ऐ एस डी एफ, सेमीकोलन एल के जे" ह्या आठ अक्षरांपासून झाली. पहिले काही दिवस तर माझे दोन्ही हात अजिबात उचलले जायचे नाहीत आणि मग अक्षर कागदावर नीट उमटायचीच नाहीत. हात उचलून टंकायला गेल की थोड्याच वेळात हात जाम दुखायला लागायचे. अर्थात काही दिवसातच उचलून टंकायची सवय झाली. स्वत:चा अनुभव आणि इतरांकडे पाहून मला हे लक्षात आल की सर्वाना कधी एकदा वेगात टंकलेखन करतो ह्याची घाई झालेली असती. आमच्या संस्थेत "accuracy first then speed" चे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लावलेले असायचे. त्याचा खरा अर्थ परीक्षेलाच लक्षात यायचा. लेटर आणि स्टेटमेंटला विशेष अड़चण नाही यायची पण जेव्हा शेवटचा ७ मिनिटांचा स्पीडचा भाग यायचा तेव्हा खरं टंकलेखनाच कौशल्य पणाला लागायच. एक वेळ संपूर्ण उतारा ७ मिनिटांच्या आत टंकुन संपेल पण त्यामधे किती शब्द बिनचूक आहेत हे तपासायला गेल की मग "accuracy first then speed" ची प्रकर्षाने आठवण यायची. एक तर ज्या क्षणाला परिक्षक मनगटावरचं घड्याळ काढून हातात घ्यायचे तेव्हापासूनच हात कापायला लागायचे. मग उगीचच तळहात एकमेकांवर घासून त्याना स्पीड साठी तयार करणं किंवा बोटं कडाकडा मोडून त्याना सैल करणं सुरु व्हायचं. परिक्षक स्टार्ट म्हंटले की मग खरी मजा यायची. एकाच वेळी परीक्षागृहातले सगळे टाईपरायटर त्या सात मिनिटांच्या स्पर्धेत धावायला लागायचे. बोटं दुखायला लागली म्हणून एक क्षण जरी थांबलो तरी बाकीच्या टाईपरायटरचा आवाज पाहून आपण मागे पडतो की काय अशी भीती वाटायची. लेटर, स्टेटमेंटमधे जास्तीत जास्त आणि स्पीड मधे पासिंग पुरते मार्क असच सर्वसामान्य विद्यार्थ्याच ध्येय असायच.<br /><span style="font-size:0;"></span><br />तुलनेने मराठी आणि हिन्दी टंकलेखन शिकायला कमी विद्यार्थी असायचे. एकतर ते इंग्लिशपेक्षा अवघड आणि त्यात आपल्या देशी भाषा असल्याने त्याचं लोकाना आकर्षण कमी असाव. संगणक युगाची सुरवात झाल्यावर तर विद्यार्थी संगणकाचा की-बोर्ड टाईपरायटरसारखाच असल्याने इंग्लिश टंकलेखन शिकायला यायला लागले. मी इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवरसुद्धा काम केलय. एखादा शब्द जर इरेझ करायचा असेल तर फार छान आवाज करत तो इरेझ व्ह्यायचा.<br /><br />पेजरची जागा मोबाईलनी, सायकलची मोटरसायकलनी तशीच टाईपरायटरची संगणकाने घेतली. आज आयटी क्षेत्रात काम करताना मला टंकलेखन शिक्षणाचा खूप फ़ायदा होतो. इमेल लिहिताना, कोडिंग करताना इतरांपेक्षा फार लवकर लिहून होतं. मी जेव्हा वेगात काही टाईप करत असलो की लोक मी एखादा जादूचा प्रयोग करतोय अशा नजरेनी पहात राहतात. दुर्दैवानी टंकलेखन शिकून आलेले फार कमी लोकं आजूबाजूला दिसतात. त्याना जर टंकलेखन आलं तर त्यांचा कामाचा बराचसा वेळ वाचेल. टायपिंग टयूटरसारखी सॉफ्टवेअर असतात पण क्वचितच ते शिकण्यासाठी वापरलं जातं. मला खरोखर असं वाटत की कंप्यूटर इंजिनियरला एखाद्या सेमिस्टरसाठी तरी टंकलेखन हा विषय ठेवला पाहिजे. कारण भविष्यात त्याला ह्याचा नक्कीच फायदा होइल.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-60726970259433869232011-05-15T01:36:00.001+05:302011-05-15T01:38:09.263+05:30गुलमोहोरमे महिन्यातील दुपार.. लांबलचक हायवे... एसी फुल स्पीडमध्ये चालू तरीही मानेवरून घामाचे २-३ थेंब ओघळतायेत.. खरं तर त्या थेंबांचा मानेवर होणारा गार स्पर्शही बरा वाटतोय. नेमकी गाडीत पाण्याची बाटलीही नाही. सकाळीच २ अंडी आणि वर २-३ कप चहा घेतलेला. त्यामुळे शरीराच्या आतली उष्णता बाहेरच्या तापमानाशी स्पर्धा करत होती. बाहेर इतकं कडक ऊन की त्यात क्षणभरही उभं राहीलं तरी जळून खाक होऊ की काय अशी भिती वाटली. आधीच जास्त असलेलं अंतर उन्हामुळे आणखीनच लांब वाटायला लागलं. <br /><br />इतक्यात दूरवर एक लाल ठिपका दिसला. जसजसं त्या ठिपक्याच्या जवळ जात होतो तसं लक्षात येत गेलं की तो नुसता लाल नाही तर लालभडक ठिपका आहे. बाहेर आग ओतत असलेल्या सूर्यकिरणांपेक्षा लाल. आता तो लाल ठिपका पूर्ण विस्तारला गेला आणि लक्षात आलं की हा तर गुलमोहोर. नकळत गाडीचा वेग कमी झाला. लालभडक फुलांनी डवरलेला गुलमोहोर डोळयात मनसोक्त साठवून घेतला. थोड्या थोड्या अंतरावर असेच गुलमोहर दिसत गेले आणि तो मनमोहक लाल रंग डोळ्यांवाटे शरीरात उतरत गेला. <br /><br />मनात विचार आला की लाल रंग खरं तर आक्रमकतेचं प्रतीक. मनाला अशांत करणारा रंग. लालभडक रक्त पाहीलं की काही जणांना चक्कर येते. पण हाच रंग जेव्हा धगधगत्या उन्हात गुलमोहरावर पाहिला तेव्हा डोळे निवल्यासारखे वाटले. मित्र म्हटला काय त्या चेरी ब्लॉसमचं कौतुक करायचं.. आपला गुलमोहोर किती सुंदर दिसतो त्यापुढे. अगदी खरं. पुढचे काही दिवस मी येता जाता रस्त्यांवर गुलमोहोर शोधत होतो आणि त्या देखण्या झाडाच्या दर्शनानी सुखावण्याचा पुन:प्रत्यय येत राहीला.<br /><br />लहानपणी ह्याच गुलमोहराला लटकणा-या तलवारीच्या आकारासारख्या त्याच्या फळानी आम्ही लढाई करायचो. समोरच्याचा वार जर चुकवता आला नाही तर ती बारकी काठीपण जाम लागायची. कधी कधी झाडावर चढून त्याची लालचुटूक फुले खायचो. एकदा असंच चढत असताना सरकन एक सरडा शेजारून निघून गेला. खोडाच्या काळपट रंगात त्याचा रंग मिसळून गेल्याने तो दिसलाच नाही. अजूनही ते आठवलं की अंगावर काटा येतो. <br /><br />ऑफिसला जायला घराबाहेर पडलो आणि वळणावरच गुलमोहोर दिसला. अरेच्चा!!! कधी लक्षचं नाही गेलं की ह्याच्याकडे. पुन्हा दुसऱ्या वळणावर एक गुलमोहोर. दहा किलोमीटरच्या अंतरात किमान दहा दिसले. काही पूर्ण लाल फुलांनी बहरलेले तर काही अर्धे लाल आणि अर्धे हिरवट. ऑफिसला किंवा कामासाठी शहरातल्या रस्त्यातून जाताना गडबडीत ह्या सुंदर गुलमोहराकडे लक्षचं जात नसावं. त्या दिवशी हायवे वरून जाताना दुसरं काहीच पाहण्यासारखं नसल्यामुळे कदाचित गुलमोहरानी लक्ष वेधलं असावं. <br /><br />गुलमोहराबाबत अतिपरिचयात अवज्ञI तर होत नसेल ना? पुष्पगुच्छात फुलवाले गुलमोहराची फुले का बरं मिसळत नसावीत? किंवा आपणसुद्धा घरातल्या फुलदाणीत कृत्रिम फुलांऐवजी मुबलक उपलबद्ध असणारी गुलमोहराची फुले का बरं वापरत नाही? १४ फेब्रुवारीला लोक गुलाबाच्या फुलाला दहा-वीस रुपये देण्यापेक्षा छानपैकी गुलमोहराच्या फुलांचा गुच्छ का नाही देत? हा पर्याय अगदीच काही वाईट नाही. नीट पाहिलं नाही कधी पण कदाचित ती फुलं झाडावर लांबूनच छान दिसत असावीत. नाहीतर हा सरळ सोपा उपाय लोकांनी नक्कीच सोडला नसता. <br /><br />घराला, हॉटेलला गुलमोहोर नाव पाहिलंय. भारी वाटतं एकदम. पण कोणा मुलाचं नाव गुलमोहोर नाही ऐकलं. गुलाब, जाई, जुई, शेवंती (शेवंता) आहे पण गुलमोहोर नाही. कदाचित ते फारचं मोठ वाटेल. त्याचा अपभ्रंश तर अगदीच भुक्कड होईल. गुलमोहरावर कविता पण ऐकल्याचं आठवत नाही. <br /><br />“शहरसे जा रहा था दोपहर इतनेमे दिखा खुबसुरत गुलमोहर<br />हटा नही पाया उससे नजर मनमे दौड गयी खुशी की लेहर”<br /><br />अशा टाईपची कविता गुलजार वगैरेना सुचली नसेल का कधी?Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-77770586098489456442010-05-21T06:43:00.005+05:302010-05-21T06:46:43.834+05:30काही छंदबायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. <br /><br />मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार. आम्हाला आमचा खजिना हमखास बस स्टँडच्या भव्य कचराकुंडीत सापडायचा. म्युन्सिपाल्टीचे लोक पहात नसतील एवढ्या बारकाईने आम्ही एक एक कचर्याचा थर काडीने किंवा तत्सम अवजाराने बाजूला करायचो. एखादा नवीन टिक्का मिळाला की हिरा मिळाल्याएवढा आनंद व्ह्यायचा. नेमकं एक दिवस एका ओळखीच्यांनी आम्हाला संशोधन करताना पकडलं. इमान-इतबारे त्यांनी घरी वार्ता पोहोचवली. घरचे तसे उदार मनाचे असल्याने काही बोलले नाहीत फक्त गमतीनी विचारलं की रिकाम्या काडेपेट्याच गोळा करता ना रे बाबांनो? माझे काही मित्र सिगरेटच्या पा़किटाच्या आतला चंदेरी कागद जमा करायचे. मला ते अगदीच भुक्कड वाटायचं. सगळ्याच सिगरेटच्या पा़कीटातील चंदेरी कागद सारखाच असणार. आणि मुळात (रिकाम्या) काडेपेट्या गोळा करतानाच एवढी अपराधीपणाची भावना होती की सिगरेटच्या पाकीटाला हात लावायची पण हिंमत नाही झाली (तेव्हा :-) ). मग डेली कलेक्शन घेऊन घरी आलं की काडेपेट्यांचं मुखपृष्ठ धुऊन, व्यवस्थित पुसून, कापून ते एका खास वहीत चिकटवून टाकायचो. भावाचं नशीब नेहमीचं जोरात असायचं. त्याच्याकडे रोज माझ्यापेक्षा निदान ३-४ तरी नवीन टिक्के निघायचे. मग मी मनातून थोडा खट्टू व्ह्यायचो. झोपताना उद्या त्याच्यापेक्षा नक्की जास्त टिक्के मिळवीन असं स्वप्नं रंगवायचो. <br /><br />अशा तर्हेने बरीच वर्षं संशोधनात घातल्यावर कालपरत्वे ती वही हरवून गेली. आज वाटतं की ती वही जपून ठेवायला हवी होती. असो, हा छंद अगदी परवडेबल होता त्यामुळे बरीच वर्षं टिकला. काही लोक देशोदेशीची नाणी गोळा करत. तेव्हा आमच्या दूरदूरच्या नात्यातसुद्धा कोणी परदेशी नव्हतं, त्यामुळे हा छंद काही जवळपास फिरकला नाही. खरा छंद माणसाला पार वेडं लावतो, बेचैन करून टाकतो. असाच एक दुसरा छंद म्हणजे वर्तमानपत्रात, क्रिडा साप्ताहिकात आलेले क्रिकेटर्सचे फोटो जमा करणं (आणि अर्थातच एका खास वहीत ते चिकटवणं) पण लवकरच त्यातला रस संपला. सकाळमधे चिंटू किंवा लोकसत्तात काहीतरी शौर्यगाथा का यशोगाथा असं काहीतरी यायचं पण तिकडे काही वळायची कधी इच्छा झाली नाही. <br /><br />मधेच काही दिवस प्रसिद्ध लोकांच्या स्वाक्षर्या गोळा करायचं खूळ डोक्यात आलं. मला आठवतंय त्याप्रमाणे पहिली सही अरूण दातेंची घेतली. एकूण सह्यांचा आकडा काही दहाच्या वर गेला नाही. कारण एक तर मी अहमदनगरमधे रहात असल्याने साहित्यिक,कलावंत, खेळाडू मंडळी काही विशेष फिरकायची नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम संपल्यावर किंवा मध्यंतरात ह्या लोकांच्या मेकअप-रूम मधे जाऊन सही घ्यायला जाम संकोच वाटायचा. एकदा आमच्या नगर वाचनालयात व.पु. आले असं कळल्यावर धावतपळत गेलो. मी कधी वपुंचा फोटो पाहिला नव्हता पण दारातच मु़ख्य ग्रंथपालांसोबत एक पाहुणा दिसला. ग्रंथपालांनी विचारलं - काय रे कोण पाहिजे? मी म्हटंलं की इथे वपु आले होते असं ऐकलं. त्यांची सही घ्यायची होती. ग्रंथपाल म्हणाले की ते मगाशीच गेले पुण्याला. तेवढ्यात ते पाहुणे म्हणाले की माझी सही चालेल का? मी तेवढा प्रसिद्ध नाहीये पण करतो सही तुझ्या वहीत. सही पाहिल्यावर लक्षात आलं की हे तर रमेश मंत्री. अर्थात, तेव्हा मला ह्या नावाचे कोणी लेखक आहेत हेदेखील माहित नव्हतं. <br /><br />अर्थात हे सगळं इंटरनेटची क्रांती होण्यापूर्वीचं. आजच्या काळात जर कोणी काडेपेट्याचे टिक्के शोधताना दिसलं तर मला भयानक आश्चर्य वाटेल. पण त्या छोट्या दोस्तासोबत कदाचित टिक्के शोधत परत बालपणाची सफरही करेन. इंटरनेट आल्यावर तर वेड छंद लागले. सगळ्यात आधी चॅटिंगचा. "ए एस एल प्लीज" हे तर चॅटिंगचं ब्रीदवाक्य होतं. प्रत्येक सायबर कॅफेमधे MIRC नावाचं सॉफ्टवेअर असायचं. त्यावर चॅटिंगचा अक्षरशः धुमाकूळ चालायचा. नंतर याहू, हॉटमेल मेसेंजर लोकप्रिय झाले. माझे काही मित्र तर रोज १०-११ तास चॅटिंग करायचे. एक दिवस तर एकानी कहर केला. सलग वीस तास चॅटिंग केलं पठ्ठ्यानी. सगळ्यांनी फक्त त्याचा सत्कार करायचंच बाकी राहिलं होतं. तेव्हा इंटरनेट बरंच महाग होतं. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य जनतेला हे लाड परवडायचे नाहीत. मित्रांनी, मी कधी नावही ऐकलं नव्हतं अशा, देशाच्या मुलींसोबत प्रेमाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या :-). मला काही चॅटिंगमधे (सुरूवातीचा थोडा काळ सोडला तर) फारसा इंटरेस्ट वाटला नाही. (इथे कोणाला कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी म्हण आठवत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो :-) )<br /><br />नंतर मग आयएमडीबीवर जाऊन इंग्लिश चित्रपटाची माहिती वाचत बसणं, विकीपिडीयावर जाऊन जे नाव आठवेल त्याची माहिती वाचणं, टोरंटची क्रांती झाल्यावर धपाधप पिक्चर डाऊनलोड करणं असे जे छंद लागले ते आजपर्यंत कायम आहेत.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-65275138822361832872010-05-09T02:43:00.003+05:302010-05-09T03:03:28.152+05:30ऑफिसमधे वेळ कसा घालवावा?१. मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही) . दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूचं उगीचच प्रोफाईल पहात बसणं. <br /><br />२. थोड्या थोड्या वेळानी ईसकाळवर जाऊन एखाद्या लेखावर आपण दिलेली कमेंट प्रसिद्ध झाली की नाही ते पहाणं. (खवचट कमेंट असेल तर ईसकाळवाले लवकर प्रसिद्धपण करत नाहीत)<br /><br />३. रोज सगळे बँक अकाऊंट्स, लोन अकाऊंट चेक करत बसणं.. फारच बोअर होत असेल तर १०० रुपये सेविंग अकाऊंट मधून करंट मधे आणि परत करंटमधून सेविंगमधे ट्रान्सफर करणं. <br /><br />४. वीकीपीडियात जाऊन ज्याचं नाव डोक्यात येईल त्याची माहिती सर्च करून वाचत बसणं.. त्या लेखात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर टिचकी मारुन उगीचच त्याची माहिती वाचत बसणं...<br /><br />५. आयएमडीबीवर जाऊन जे डोक्यात येईल त्या चित्रपटाची माहिती वाचत बसणं.. मग त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खाजगी माहिती, आत्तापर्यंतचे चित्रपट ह्यांची माहिती वाचत बसणं. <br /><br />६. मटावर जाऊन जेवढं काही वाचणं हापिसात शक्य आहे तेवढं वाचणं आणि उरलेलं घरी जाऊन पहाणं. <br /><br />७. मायक्रोसॉफ्ट वर्डमधे जाऊन एखाद्या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द बघत बसणं (शिफ्ट + एफ७ दाबून).. एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.<br /><br />८. आणि महत्त्वाचं म्हणजे - उरलेल्या वेळात हापिसचं काम करणं..Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-32852946477527650602010-04-05T04:51:00.009+05:302010-04-05T05:23:53.468+05:30मुक्तपीठ आणि कमेंट्समाझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे:<br /><br />* एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हौन्गकौंगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हौन्गकौंगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत. त्यावर पडलेल्या ह्या कमेंट्स:<br /><span style="font-size:0;"></span><br />१) मुलीचं जाहीर माप काढलेले दिसतंय<br /><br />२) कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? ज्यांना प्रोब्लेम्स नसतात त्यांना असे प्रोब्लेम्स ओढवून घ्यायची सवय असते. इतके पैसे तिथे उधळलेत त्या पैशात १०० गरीब महिनाभर जेवले असते<br /><br />३) मुलगी हट्टी आहे हे सांगण्यासाठी लेखन प्रपंच केलेला दिसतोय , तरी या आजीनी एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत.<br /><span style="font-size:0;"></span><br />४) आजीबाई तुमचे जावई बापू डोक्याने जरा कमी दिसतात. स्वताच्या नवजात बाळाला, ओल्या बालांतीन बायकोला आणि पूजनीय सासुमा ला अशा संकटात ढकलण्याच्या आधी नीट सगळी चौकशी करायला नको होती? यांच्या लहरीवर चालायला चीनची वकीलात म्हणजे काय पिताश्रींची जायदाद वाटली का त्यांना? बालिशच आहेत जरा.<br /><span style="font-size:0;"></span><br />५) मराठी मुली मग त्या भारतात असो नाही तर बाहेर (बाहेर जास्तच ) नवर्याला आपल्या तालावर नाचवणारच (ते सुधा स्वभाव माहित असल्यामुळे नाचतात) आणि असले प्रसंग उभे करणार मग ह्या हट्टीपणाला मनाशी ठाम वगैरे शाब्दिक आवरणं चढवून सांगितली तरी फरक पडत नाही<br /><br />६) या लेखातून आजीबाईना आपण व आपले जावई किती श्रीमंत आहे हे दाखवायचे होते<br /><span style="font-size:0;"></span><br />७) कालपर्यंत USA जावई पुराण सुरु होते , आजपासून नवी मालिका सुरु होत आहे - CHINA जावई पुराण.<br /><span style="font-size:0;"></span><br />८) अ) मुलगी मूर्ख दिसते आहे. ब) जावई स्वताच्या डोक्याचा वापर करताना दिसत नाही तो केला असता तर त्याला अगोदरच कळले असते कि डीलीवरीची ची तारीख आणि नवीन वर्ष एकाचवेळी आहेत आणि गोंधळ होऊ शकतो. क) बाई तुम्ही पण दिव्य आहात जाण्यायेण्याला वेळ लागतो हे माहित असूनही गप्प राहिलात ड) परत असले काही तरी लिहून आमचा वेळ वाया घालवू नका।<br /><br />९) अरेरे!!! काय हा दैव दुर्विलास! आजी आता जावयांना दुसरा chance घ्याला सांगा आणि या वेळी नीट सगळे प्लान करा.<br /><br />* एका बाईनी आपल्या मैत्रिणीच गुणगान करणारा लेख लिहिल्यावर त्यावर आलेल्या ह्या कमेंट्स:<br /><br />१) कहर केला ताई तुम्ही! तुमचा आणि मैत्रीणीचा एक फोटो पाठवून द्या. देवघरात लावतो उद्यापासून<br /><br />२) मुक्तपीठला आशयघन लेख मिळत नाहीत काय? "साभार परत" योजना करायला हवी.<br /><br />३) त्या दोन्ही मैत्रिणींच्या एकमेकांबद्दलच्या भावना , मते,अनुभव काहीच न देता फक्त कोण काय शिकले आहे आणि काय काम करते आहे ह्याचेच वर्णन जास्त आहे. मैत्री बद्दल लिहायचे तर त्यात त्यांची मुले, पुतणे, सुना किती कार्यक्षम आहे ह्याची लिस्ट काय कामाची?<br /><br />४) मला वाटत, ह्यांची मैत्रीण राजकारणात येत आहे आणि त्यांची जाहिरात म्हणून हा लेखनप्रपंच. अन्य कोणताही हेतू या लेखातून दिसून येत नाही<br /><br />५) पूर्वीची autobiography पुस्तके अशीच लिहिलेली दिसतील. प्रवास वर्णने तर विचारू नका. शिंप्याकडे जाऊन सूट कसा शिवला याचेच ३-४ पाने. त्यावेळी वाचायला दुसरे काहीच नसे. लिहू द्या सगळ्यांना.पण किती माहिती सार्वजनिक करायची हे बघा.<br /><br />* एकीनी तिच्या वस्तू हरवल्यावर तिला कशी देवमाणस भेटली आणि तिला त्या वस्तू कशा परत मिळाल्या त्यावर लेख लिहिला आणि त्यावरच्या ह्या कमेंट्स:<br /><br />१) बाकी काही नाही फक्त हे अधोरेखित झाले की तुम्हाला वस्तू सांभाळता येत नाहीत।<br /><br />२) जगाचा चांगुलपणा जरी असला तरी तुमचा वेन्धळेपणा इथे नक्कीच जाणवतो<br /><br />३) काकू वस्तू सांभाळायला शिका!!! प्रत्येक वेळी चांगली लोक भेटतीलच असे नाही! नाहीतर पुढच्या वेळेस कश्या वस्तू परत मिळाल्या नाही या साठी लेख लिहावा लागेल.<br /><span style="font-size:0;"></span><br />४) पण तुम्ही तुमच्या गोष्टींची योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा मनस्ताप वाचेल. अनुभव १ आणि अनुभव ३ तर हलगर्जीपणाच दाखवतात. So pls take care. जगातील लोक चांगले आहेत पण आपण आपल्या हलगर्जीपणामुळे त्यांचा वेळ घालवतोय.....<br /><br />५) जगात चांगुलपणा आहे ते ठीक आहे पण भटकंतीचीच हौस आहे तर स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यायलापण शिका।<br /><br />६) मला जर तुमची वस्तू मिळाली तर परत देणारच नाही ...लेखाची वाट पाहत बसेल.<br /><span style="font-size:0;"></span><br />७) मावशी सारख्या गोष्टी हरवत जाऊ नकात ...काळजी घ्यावी ...लोकांना काही दुसरी कामे नाहीत काय तुमच्या गोष्टी शोधात बसायला आणि तुम्हाला परत करायला?<br /><br />८) अहो काकू 'तो' नाही 'ते' म्हणावं अस पतीला एकवचनी संबोधण बर दिसत नाही..<br /><span style="font-size:0;"></span><br />९) लोकांची प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊ नका, कृपा करून...<br /><span style="font-size:0;"></span><br />१०) पुणेरी पाटी - "शनिवार पेठ रहिवासी XXX कुटुंबाला सूचना - इकडे कोणतीही वस्तू विसरू नये, परत केल्याचे पैसे पडतील"<br /><br />११) अहो जरा काळजी घ्या नाहीतर कधीतरी तुम्हीच हरवाल आणि मग नवरा प्रार्थना करेल (सभ्य गृहस्थ असावेत) की बायकोला कोणी शोधून परत पाठवू नये... ही ही ही ही ही!!!!<br /><br />१२) तुमच्या स्वताच्या चुकीने हरवलेल्या वस्तू जर परत मिळाल्या म्हणजे जगात चांगुलपणा आहे हे म्हणणे मला पटत नाही, स्वत: काशी करायची आणि मग जगाला नावे ठेवायची (चांगली किंवा वाईट) हे बरोबर नाही.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-47211541634227557452010-03-23T06:47:00.002+05:302010-03-23T06:49:45.218+05:30झोप आणि डुलकीझोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप. डुलकीला त्याची सर नाही. मला तर बस/लोकल मध्ये बसल्या मिनटाला झोप यायला लागते. त्यात जर खिडकीपासली जागा असली तर सोन्याहून पिवळ. <br /><br />पूर्वी तर मला बस मध्ये अशी जोरदार झोप यायची की खिडकीच्या दांड्यावर डोकं आपटून निदान २-३ वेळा तरी कपाळमोक्ष व्हायचा. बसमधून उतरल्यावर कपाळ हे एका साईडनी टम्म फुगलेलं. पण त्याची फिकीर नाय करायची. झोप सलामत तर कपाळ पचास. बरोबर एखादी पिशवी असली आणी त्यात जाड स्वेटर किंवा त्या टाईप काही असलं की मग ती पिशवी खिडकीच्या दांड्यावर ठेवून त्याचा उशीसारखा वापर करून ताणून देता येते. कंडक्टरपण असला निवांत येतो की त्याला ओरडून सांगावस वाटत, बाबा रे मला झोपायचं, तेव्हा पटकन माझ तिकीट काढ. मी मुद्दाम खिडकीपासली जागा पकडतो, कारण त्या दांड्यावर डोक ठेवून निवांत झोपता येत. चुकून कधी दोन लोकांच्या मध्ये किंवा कडेला बसावं लागलं की खरी बोंब होते. बराच वेळ (म्हणजे १५-२० मिनट) मोठ्या मुश्कीलिनी डोळे बळच ताणू ताणू झोप आवरायचा प्रयत्न करतो खरा पण नाईलाज को क्या इलाज!! शेवटी चष्मा वरच्या खिशात जातो आणी समोरच्या दांड्याला घट्ट पकडून ताठ बसायचा प्रयत्न करत झोपेच्या प्रवासाला सुरुवात होते. <br /> <br />आता शिस्तीत काही झोपण जमत नाही. मग, एका बेसावध क्षणी, पहिल्यांदा डाव्या बाजूला जोरात मान पडते. शेजारचा माणूस पहिल्यांदा नुसताच खांद्यानी आपल्या डोक्याला ढुशी मारतो. मी खाडकन जागा होतो आणि ओशाळ होत, परत सरळ झोपायचा प्रयत्न करतो. डाव्या बाजूनी असा प्रसाद मिळाल्यावर आपसूकच मान किंचित उजवीकडे कलते. आता ढुशी मारण्याची वेळ उजवीकडे बसलेल्यावर येते. दोन्हीकडून टोले खाल्ल्यावर आता मान खाली घेऊन समोरच्या दांड्यावर डोकं ठेवतो. पण छे!! तस झोपण काही जमत नाही. हळूच बाजूच्या दोघांकडे नजर टाकतो, ज्याचा चेहेरा कमी रागीट दिसत असेल, त्या बाजूला हळूच मान कलते. ह्यावेळी मात्र झोप बऱ्यापैकी सावध असते. फार फार तर १ - २ वेळा त्यांच्या खांद्यांवर मान जाते पण ह्यावेळी हुशारीनी, त्यांनी ढुशी द्यायच्या आत, पटकन मान सरळ करतो. मनात पक्क ठरवतो की पुढच्या वेळी काही झालं तरी खिडकीपाशीच बसायचं. मला काही काही लोकांच जाम कौतुक वाटत ते शेवटच्या लांबलचक सीटवर बिनधास्त ताणून देतात. दुसरे प्रवासी येऊन त्यांना उठवायचा प्रयत्न करतात पण हे ढिम्म हलत नाहीत. ही कला मला ह्यांच्याकडून एकदा शिकायचीये. <br /><br />व्यवस्थित झोप घ्यायला पण पोषक वातावरण हवं. म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून, पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही. (गांधीजीनी बहुदा ही गोष्ट मिस केली :-)) आणि अशा वेळी बेल वाजली की, पुलं म्हणतात त्याप्रमाणे दरवाजाबाहेर कुबेर जरी त्याचा खजिना द्यायला आला असेल ना तरी त्याचे हात कलम करून टाकावेसे वाटतात. जेवल्या जेवल्या झोपू नये, शतपावली घालावी हे जरी बरोबर असलं तरी शतपावली घातल्यावर साली झोपच उडून जाते. आमरसाच जेवण झाल्यावर जे काय डोळे जड झाले असतात ना त्याला झोप हा एकच पर्याय आहे. <br /><br />रात्रीच्या झोपेच गणितच वेगळ आहे. ९ आणि १० वाजता झोपतात ती काही खरी झोप नाही. ते उगीच काहीतरी नियम किंवा शिस्त लावून घेण्यासारख आहे. तंगड्या वर करून एखाद पुस्तक वाचत किंवा सिनेमा बघत जेव्हा डोळे जड होतील ना तेव्हा झोपायला जाव. आजूबाजूचा माणूस घोरणारा असेल तर मग सालं झोपेचं खोबर होऊन जात. हे एक बर आहे की आपल्याला झोपेत आपलच घोरणं ऐकू येत नाही. नाहीतर झोपणच मुश्कील झालं असतं.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-286865274509072022010-03-22T06:25:00.005+05:302010-03-22T06:30:19.921+05:30ओर्कुटिंगऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात. <br /><br />१. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात? <br /><br />२. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं? <br /><br />३. ऑर्कुटमध्ये तुम्ही जर काही डीटेल्स अपडेट केले तर ते तुमच्या मित्र - मैत्रीणीना त्यांच्या होम पेज वर दिसतात. त्यामुळे लोकं चिन्धी चिन्धी गोष्टी अपडेट करत बसतात. उदाहरणार्थ: स्टेटस मध्ये "आयपील इज कमिंग" किंवा काहीतरी अगम्य इंग्लिश कोट टाकतात. काही लोक तर फर्स्ट नेम आणी लास्ट नेम अपडेट करतात आणी तिथे काहीतरी मेसेज टाकून ठेवतात. आता ही काही अपडेट करायची गोष्ट झाली का? जन्मापासून मरेपर्यंत तुमचं नाव काही बदलत नाही (अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा). बर हे नाव अपडेट केल्यावर हा/ही ओरीजनल कोण होता/होती ते जाम कळत नाहीत. मग लोक त्याला/तिला scrap टाकून विचारतात की बाबा/बाई तू नक्की कोण? ह्यावर त्याने/तिनी सरळ सरळ सांगावं की नाही? पण पब्लिक पण जाम वस्ताद असतं. ओळख बर मी कोण आहे? ह्या टाईपचे खेळ सुरु करतात.<br /><br />४. काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ह्यावर कडी म्हणजे समजा लोक उटीला हनिमूनला गेले असतील तर रोज रात्री तिकडच्या निसर्गदृश्यांचे फोटो अपलोड करतात. ह्या लोकांना एवढा वेळ आणी मुख्य म्हणजे अशा वेळी ही भलतीच इच्छा कशी होत असावी? <br /><br />५. काही चतुर लोक तर समजा त्यांना १० फोटो अपलोड करायचे असतील तर रोज एक फोटो अपलोड करतात. म्हणजे होत काय की त्यांच्या फ्रेंड सर्कलला रोज ह्यांचे "रिसेंट अपडेट्स" दिसतात. <br /><br />६. टेस्टीमोनिअलला ऑर्कुट मध्ये जाम महत्व आहे. म्हणजे क्ष व्यक्तीला य व्यक्तीबद्दल जर काही लिहावस वाटल तर तो त्याच्या/तिच्याबद्दल मजेदार गोष्टी लिहितो. खर तर ही गोष्ट ऐच्छिक आहे. पण काही काही पब्लिक जाम माग लागत की माझ्याबद्दल तू काहीतरी लिही. बर त्याच्या/तिच्याबद्दल खर लिहून पण चालत नाही. य ची अशी अपेक्षा असते की असं काहीतरी लिहावं की त्याचं/तिचं फ्रेंड सर्कल जाम फिदा व्हायला हवं. हा एक दबाव ऑर्कुट वर नेहेमी असतो :-) <br /><br />७. तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत. <br /><br />८. पब्लिक मध्ये जाम स्पर्धा असते की कोणाचे फ्रेंड्स जास्त आहेत. मग मित्राचे मित्र वगैरे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात. आता ज्या माणसाला आपण कधी पाहिलं नाही त्याची रिक्वेस्ट कशी स्वीकारणार? बर समजा झाले तुमचे १००० फ्रेंड्स, पुढे काय? मला नाही वाटत की ऑर्कुटनी सगळ्यात जास्त फ्रेंड्स असाणार्याला काही बक्षीस वगैरे ठेवल असेल.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-72650320073625769162009-07-26T00:30:00.001+05:302009-07-26T00:34:57.507+05:30पुस्तक परिचय (तेलाविषयक)नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे. <br /><br />१. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि त्यांना ह्या कंपनीवर अंकुश ठेवण्यासाठी काही कायदे निर्माण करावे लागले. <br /><br />पुस्तकाच्या पूर्वार्धात रॉकफेलर आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑईल कंपनीची वाटचाल ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. जगाची तेलाची भूक वाढल्यावर इतर देशांमधे तेल उत्खननाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरीका, इंग्लंड सारख्या मोठमोठ्या देशांतील तेलकंपन्यांमध्ये जिथे जिथे तेलाचे साठे मिळण्याची शक्यता आहे अशा भूभागांसाठी तीव्र चुरस निर्माण झाली. रशियामधे तेलाचे प्रचंड साठे सापडले पण अमेरीकेबरोबर वैर असल्यामुळे पर्यायी तेलसाठ्यांचा शोध सुरु झाला. <br /><br />इब्न सौद हा पश्चिम आशियातील एका भूभागाच्या (सौदी अरेबिया) टोळीचा म्होरक्या होता. मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांसाठीची अतिशय पवित्र ठिकाणं त्याच्या ताब्यात होती. हज यात्रेसाठी येण्यार्या भाविकांकडून करापोटी जी रक्कम मिळायची तेच त्यांच्या राज्याचं उत्पन्नाचं मुख्य साधन होतं. पण जागतिक महायुद्धामुळे भाविकांचं प्रमाण कमी झालं आणि इब्न राजाला चांगलाच फटका बसला. असं म्हणतात की त्यावेळी राज्याचा खजिना एका ऊंटाच्या पाठीवर मावेल एवढाच राहिला होता. अशा हलाखीच्या परिस्थितीत, भूगर्भ शास्त्रज्ञांनी सौदीच्या भूमीत तेलाचे प्रचंड साठे आहेत असा निर्वाळा दिला. अमेरीकन तेल कंपन्यांनी इब्न सौदशी पुढील ६० वर्षांचा करार केला (तो २००३ मधे संपला). इथे एक मजेदार किस्सा सांगितला आहे. इंग्लंड आणि अमेरीका दोघेही ह्या इब्न सौदला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरीकेनी<br />एका मोठ्या जहाजावर त्यांच्यासाठी पार्टी ठेवली आणि इंग्लंडने रत्नजडीत रोल्स रॉईस त्यांच्या भेटीसाठी पाठवली. इंग्लंडमधल्या गाड्यांचं स्टिअरिंग उजव्या बाजूला असतं आणि इब्न सौद हे नेहेमी ड्रायवरच्या शेजारीच बसत, मागे नाही. ड्रायवरच्या डाव्या बाजूला बसणं त्यांना अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी ती गाडी तशीच त्यांच्या भावाला देऊन टाकली. गाडी भेट (लाच) देताना ही साधी गोष्ट इंग्लंडच्या लक्षात आली नाही. <br /><br />नंतर ह्या पुस्तकात, तेल असण्यार्या देशांच्या दोन महत्वाच्या संघटनांची (ओपेक आणि आओपेक) माहिती देण्यात आली आहे. तेलकंपन्यांची मनमानी आणि भाववाढ/घट करताना जिथून तेल उपसत आहे त्या देशांना कसलीही किंमत न देणं ह्याला आळा बसावा ह्या हेतूनं ह्या संघटनांची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला जरी तेलकंपन्यांनी ह्या संघटनांना महत्त्व दिलं नाही तरी काही वर्षातच ओपेकने त्यांच्या नाकी दम आणला. सद्दाम हुसेननी कुवेतवर आक्रमण करुन ते तेलसाठे बळकावयचा सतत प्रयत्न केला त्याचंही वर्णन केलं आहे. सद्दाम जरी अमेरिकेसाठी वाईट असला तरी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्याने कायम भारताची बाजू घेतली होती हेही लेखकाने नमूद केलं आहे. <br /><br />पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात भारताच्या ओएनजीसी ह्या पेट्रोलियम कंपनीचा आढावा घेण्यात आला आहे. के.डी.मालवीय ह्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आज ओएनजीसी उभी आहे. स्वकीयांचा तसेच अमेरिकेसारख्या देशांचा विरोध पत्करून त्यांनी उत्खनन चालू ठेवले त्याचं उत्तम वर्णन लेखकानं केलं आहे. भारत आणि इराणदरम्यान (पाकिस्तानमधून) तेलवाहक पाईपलाईन टाकायचं काम सुरु होणार होतं. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडून मोठ्या मुश्किलीनी आपण परवानगी मिळवली होती पण केवळ अमेरिकेच्या दबावामुळे आपण ते काम थांबवलं. <br /><br />तेलाचा शोध, त्याची उपलब्धता आणि त्यावरुन खेळलं जाणारं जागतिक राजकारण ह्याचा सुंदर आढावा ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे. <br /><br />२. एका तेलियाने: गिरीश कुबेर ह्यांचं पुढचं पुस्तक म्हणजे एका तेलियाने. ह्या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे - शेख अहमद झाकी यामानी . हा माणूस सौदी अरेबियाचा तेलमंत्री होता. उच्चविद्याविभूषित आणि तेलाच्या राजकारणातले बारकावे समजणारा. पुस्तकाच्या मागील बाजूस त्याची सुंदर ओळख करुन देण्यात आली आहे.<br />" हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची. हा प्रसन्न झाला तर अनेक देशांमधे दिवाळी साजरी व्हायची. ह्याच्या भेटीसाठी अनेक देशांचे प्रमुख तासन् तास ताटकळत बसायचे." <br /><br />अमेरिकेने पश्चिम आशियातील तेलउत्पादक देशांना नेहेमी कमी लेखलं. त्यांना अविकसित समजून त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे ह्या देशांमधे अमेरिकेच्या विरोधात प्रचंड द्वेष निर्माण झाला. ह्या महासत्तेला शह देण्याचं काम लिबियाचे सर्वेसर्वा कर्नल गडाफी आणि यामानी ह्यांनी पद्धतशीरपणे केलं. यामानींचा जन्म १९३० मधे मक्केत झाला. राजे फैजल (इब्न सौद ह्यांचे पुत्र) ह्यांनी त्यांची तेलमंत्री म्हणून निवड केली. ती यामानी ह्यांनी अगदी सार्थ ठरवली. राजे फैझल ह्यांचं यामानींवर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम होतं. यामानी ओपेक आणि सौदी अरेबिया सरकारचे २५ वर्षं मंत्री होते (१९६२-१९८६). ह्या काळात त्यांनी तेलखात्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला. <br /><br />राजे फैझल ह्यांच्याबद्दलही लिहीलं आहे. टेलिफोन, रेडीओ, टीव्ही, स्त्री-शिक्षण अशा अनेक सुधारणा त्यांनी सौदी अरेबियात आणल्या. अर्थातच त्यांना मुल्ला-मौलवींकडून प्रचंड विरोध झाला. मुलींच्या शाळेची जबाबदारी तर त्यांनी आपल्या पत्नीवरच टाकली होती. यामानी ह्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. दोघांमधे गैरसमज नसल्यामुळे राजे फैझल ह्यांचे यामानींविरुद्ध कान कोणीही भरवू शकले नाही. १९७३ मधे झालेल्या तेलसंकटामुळे यामानी सगळ्या जगाला माहिती झाले. <br /><br />अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुखांनी इब्न सौद ह्यांना शब्द दिला होता की ते इस्त्राईलची बाजू घेणार नाहीत. तो शद्ब मोडून अरब-इस्त्राईल युद्धात अमेरिकेने इस्त्राईलला मदत केली आणि अरब राष्ट्रांमधे अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली. लिबियाचे कर्नल गडाफी ह्यांनी सगळ्या तेल कंपन्यांचं राष्ट्रियीकरण करुन टाकलं. ते फारच आक्रमक आणि अमेरिका-विरोधी होते. तेलाचे भाव एकदम दुप्पट करण्याची मागणी त्यांनी ओपेकच्या मिटींगमधे केली. एकदा तर ओपेकची मिटींग लिबियात भरलेली असताना त्यांनी सगळ्या देशाच्या मंत्र्यांचं अपहरण करण्याची योजना आखली होती. पण यामानींना ह्याचा सुगावा लागला आणि त्यांनी शिताफिने तिथून ग्रीसमधे पलायन केल्याने पुढचा प्रसंग टळला. पण काही दिवसांनी ओपेकच्या सर्व मंत्र्यांचं कार्लोस द जॅकल ह्या कुख्यात दहशतवाद्यानं अपहरण केलं त्याला फक्त यामानी आणि इराणच्या तेल मंत्र्यांना मारायचं होतं. पण परत एकदा यामानींनी शिताफीनी सुटका करुन घेतली. <br /><br />ह्या पुस्तकात सौदी अरेबिया बरोबरच इराणमधलं सत्ता-स्थित्यंत्तर, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत आणि जॉर्डनचे राजे हुसेन आणि इस्त्राईल) ह्यांच्यातल्या संघर्षाचं वर्णन आहे. पॅलेस्टिनी बंडखोरांनी जॉर्डनमधे घुसखोरी केली होती आणि तिथून ते इस्त्राईलवर हमला करायचे. ह्या दोघांमधे जॉर्डनची जनता पुरती कावून गेली होती. ह्या पॅलेस्टिनी बंडखोरांची एवढी दहशत होती की एकदा जॉर्डनमधल्या एका पोलिसाची त्यांनी हत्या केली, त्यांचं मुंडकं कापलं आणि त्याचा फुटबॉल करुन खेळले. यामागे जॉर्डनच्या लोकांवर दहशत बसवायचा त्यांचा हेतू होता. शेवटी राजे हुसेन एवढे वैतागले की त्यांनी जोरदार हमला करून जवळपास ५००० बंडखोरांना मारलं. असं म्हणतात की तेव्हा इस्त्राईलनी जेवढे पॅलेस्टिनी बंडखोर मारले नसतील तेवढे राजे हुसेन ह्यांच्या सैन्याने मारले. <br /><br />ओपेक असो किंवा अमेरिका असो, सगळ्यात जास्त महत्त्व सौदी अरेबियाला. कारण तिथे निघणारं तेल हे इतर ओपेक देशांच्या एकत्र तेलापेक्षा जास्त होतं. त्यामुळं सौदी अरेबियाची पश्चिम आशियातल्या राजकारणात नेहेमी मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. यामानींनी लिबिया, सिरीया सारख्या माथेफिरू अरब देशांना जवळपास २५ वर्ष कुशलतेने हाताळलं आणि ओपेकला सामर्थ्यवान बनवत गेले. १९७३ च्या ऑईल क्रायसिमधे ओपेक देशांनी उत्पादन कपात २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आणि पाश्चिमात्य देशांना जेरीस आणले. अमेरीकन लोकांना कधी माहित नसलेल्या तेल-टंचाईला सामोरं जावं लागलं. तेव्हा अमेरिकन गाड्या लिटरला ४-५ किमी धावायच्या. (हॅमर सारखी गाडी तर लिटरला १ किमी देखील धावत नसे) तेल संकटामुळे फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवणं त्यांना भाग पडलं. (जपान आधीपासूनच अशा फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवत होता.) ह्या काळात पेट्रोल-पंपावर लांबलचक रांगा लागत होत्या. त्यात परत अमेरिकन लोक रांगेत असताना एक क्षणसुद्धा गाडी बंद करत नव्हते. शेवटी सरकारला एक दिवसाआड पेट्रोल देण्याची सक्ती करावी लागली. (म्हणजे सम आकडा असलेल्या गाड्या एका दिवशी तर विषम नंबर असलेल्या पुढच्या दिवशी). इंग्लंडमधे तर तीनच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला. घड्याळ दोन तास पुढे करण्यात आलं. त्यामुळे मुलांना सकाळी ७ च्या ऐवजी पहाटे पाचलाच शाळेसाठी निघावं लागे. त्यामुळे अपघात वाढले आणि पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचंच बंद केलं. ह्या काळात यामानींनी प्रमुख देशांचा दौरा केला (फ्रान्स, जपान, इंग्लंड, इत्यादी.) आणि त्यांना विश्वासात घेऊन तुमचा तेल पुरवठा पूर्ववत चालू राहिल असं आश्वासन दिलं. अखेर ओपेक (म्हणजे यामानी) पुढे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. <br /><br />यामानींनी नेहेमी तेलउत्पादक आणि तेल कंपन्या/ग्राहक देश ह्यांच्यात समन्वय साधला. इराण, लिबिया तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल अशी प्रचंड भाववाढ मागत असताना त्यांना शांत ठेवायचं काम यामानींनी केलं. १९७५ मधे राजे फैझल ह्यांची हत्या झाल्यावर (ह्यामागे अमेरिका असल्याचा संशय आहे) सौदीला परत त्यांच्यासारखा दुरद्रुष्टि असणारा राजा लाभला नाही. नव्या राजाचा अर्थातच यामानींवर आकस होता. १९८६ मधे त्यांना टीव्हीवर कळाले की त्यांना तेलमंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सौदीचा र्हास सुरु झाला. <br /><br />तेलातून मिळणारा पैसा किती असावा? असं म्हणायचे की सौदी राजपुत्र एवढे माजले होते की गाडीतला अॅश ट्रे भरला की ते नवीन गाडी घ्यायचे. पैसा अक्षरशः नाकातोंडात जायला लागला होता. एका सौदी बँकरने सांगितले की त्याच्या स्वतःच्या घरात ५ माणसं आहेत. त्यांच्यासाठी ६ नोकर आणि ९ गाड्या. त्याच्या म्हणण्यानुसार हा अतिपैसा आहे. ह्याची इतकी सवय झाली आहे की उद्या तो नसेल तेव्हा काय करणार? <br /><br />सध्या यामानी लंडनमधे राहतात आणि तेलाच्या राजकारणापासून दूर झाले आहेत. सौदीच्या नवीन राजाने त्यांना तेलमंत्रीपद स्विकारण्यासाठी आमंत्रण पाठवलं पण त्यांनी नकार कळवला. <br /><br />जगाच्या राजकारणाचं मध्यबिंदू असणारं हे तेल आणि त्याचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. विषय किचकट असूनही गिरीश कुबेरांनी तो सोपा आणि सहज समजेल असा मांडला आहे. इतिहास आणि जागतिक राजकारणाची आवड असणार्यांनी ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावी.Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-54441151622632358112009-07-26T00:23:00.000+05:302009-07-26T00:28:53.871+05:30चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. <br /><br />भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात. सूर्य हा प्रकाशाचा स्त्रोत असल्यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन तो उगवल्यानंतरच सुरु व्हायचं. झाडं, शेतातील पिकं सूर्यप्रकाश मिळाल्यावरच वाढायची. अर्थातच, त्यामुळे सूर्याला (म्हणजे प्रकाशाला) चांगल्या गोष्टींचं/प्रवृतींचं प्रतीक तर अंधाराला वाईट मानायला सुरुवात झाली. त्यामुळे हळूहळू सूर्याला देवत्व बहाल केले गेलं. अतिप्राचीन इजिप्त संस्कृतीमधे होरसला सूर्यरुपी देव मानत. ह्या होरसशी प्रचंड साधर्म्य असणारे कित्येक देव नंतर इतर संस्कृतींमधे उदयाला आले. अटिस, डायनिसस, मित्रा, येशू, इत्यादि ( ह्यामधे कृष्णाचापण संदर्भ देण्यात आला आहे). ह्या सर्वांमधे साधर्म्य आहे ते म्हणजे - ह्या सर्वांचा जन्म कुमारी मातेपासून २५ डिसेंबरला झाला . ह्या सर्वांना १२ भक्त होते, मेल्यानंतर ३ दिवस पुरण्यात आलं आणि नंतर संजीवनी (resurrection) मिळाली. तसेच ह्या देवांनी केलेल्या चमत्कारांमधे सुद्धा विलक्षण समानता आहे. प्रश्न असा पडतो की २५ डिसेंबरच का? तर २१ आणि २२ डिसेंबरच्या दरम्यान दिवस सगळ्यात छोटा असतो (winter solstice). त्यानंतर साधारण तीन दिवसांनी म्हणजे २५ डिसेंबरपासून दिवस वाढायला सुरुवात होते. म्हणजे (सूर्य देवाचा) प्रकाश वाढायला सुरुवात होण्याचा हा दिवस. त्यामुळेच ह्या सर्व देवांचा जन्म २५ डिसेंबरला दाखवला गेला. ह्या मुद्याप्रमाणेच ओरियन पट्टयामधलया आकाशातल्या तीन तारकांना तीन राजांची उपमा देणे, १२ राशी (म्हणजेच १२ फॉलोअर्स), काही वर्षांनंतर जग संपणार अशी जी ख्रिश्चन धर्मियांमधे धारणा आहे ( तशी ती हिंदूमधेही आहे म्हणा... कलियुगात जगबुडी होणार वगैरे) ते खरं पाहता साधारणपणे प्रत्येक २१५० वर्षांनंतर पृथ्वी एक घर सोडून मागील राशीत जाते अशी संकल्पना आहे. त्यानुसार सध्या मीन राशीत असलेली पृथ्वी काही वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. ह्या स्थित्यंतरालाच लोक जगबुडी मानत आहेत. अशा अनेक फसव्या धार्मिक कल्पनांवर ह्या फिल्ममधे कडाडून हल्ला चढविण्यात आला आहे. येशू होऊन गेला ही तद्दन खोटी गोष्ट असून केवळ मूठभर लोकांनी समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला बनाव आहे आणि येशू ही सरळसरळ होरसची कॉपी आहे असं दाखवण्यात आलं आहे. <br /><br />भाग २. ११ सप्टेंबर (९/११) चं रहस्य: : ११ सप्टेंबर, २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर जो हल्ला झाला तो ओसामा बिन लादेन आणि अल कायदानी केला असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या समजाला छेद देणारं सत्य ह्या भागात मांडलं गेलं आहे. अमेरीकन सरकारला ह्या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. त्यांनी जाणीवपूर्वक विमानं घुसू दिली. पेंटागॉनवर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्याला तर नीट विमान चालवताच येत नव्हतं. ७ नंबरच्या बिल्डींगवर विमान हल्ला झाला नसूनही ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळली. हल्ला झालेल्या तीन जागांपैकी दोन जागांवर कुठेही विमानाचे अवशेष सापडले नाहीत. एका फुटेजमधे तर विमान बिल्डींगच्या अगदी जवळ येतंय आणि ते धडकायच्या आतच खालच्या एका मजल्यावर स्फोट होताना दाखविला आहे. लादेनचं फुटेज - ज्यात त्यानी ह्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली - त्यातला लादेन हा बहुरूपी असून त्याच्या आणि खर्या लादेनमधले ठळक फरक सांगितले आहेत. ह्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी जी समिती बसवण्यात आली तिचा अध्यक्ष बुशच्या मर्जीतलाच होता. चौकशी समितीला बुशनी उडवाउडवीचीच उत्तरं दिली. ह्या सगळ्याचं चित्रीकरण करायला प्रसारमाध्यमांना बंदी घातली गेली. ९/११ चौकशी समितीच्या अहवालाची प्रत पहायची परवानगी नाकारण्यात आली. <br /><br />प्रश्न असा पडतो की अमेरिकेला असं करुन काय मिळालं? तर अमेरिकेला अफगाणिस्तानमधे शिरकाव करता आला. त्यायोगे ह्या तेलपिपासू राष्ट्राला सिरीया आणि इराण ही तेलसंपन्न राष्ट्रे ताब्यात घेता येतील (इराक वर तर अगोदरच कब्जा झाला आहे). <br /><br />भाग ३. पडद्यामागचे खरे सूत्रधार: ह्या भागात अमेरीकेचा थोडासा इतिहास - इंग्लंड मधून कॉलनीज वेगळं व्हायचं कारण - सांगितला आहे. (इंग्लंडच्या राजाने जेव्हा ह्या कॉलनीजचं चालू चलन रद्द करुन स्वतःचं चलन व्याज आकारुन देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा असंतोष पसरुन ह्या कॉलनीजनी बंड केलं.) फेडरल रिझर्व बँक ही अमेरीकेतील मुख्य बँक आहे (जशी आपली रिझर्व बँक ऑफ इंडिया). ही बँक पूर्णपणे खाजगी असून सरकारचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नाही. ही बँक सरकारला चलन पुरवते. प्रत्येक चलनामागे ती विशिष्ट व्याज आकारते. ह्याचा अर्थ जेव्हा सरकार बँकेकडून पैसे घेते तेव्हाच ते कर्जबाजारी झालेलं असतं. मग हे कर्ज फेडणार कसं? तर त्यासाठी परत बँकेकडूनच पैसे घ्यायचे. अशा रितीने सरकार बँकेच्या कर्जाच्या विळख्यात अडकत जाते. मग बँक पैसा कुठुन मिळवते? युद्ध हा बँकेसाठी कमाईचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. पहिले आणि दुसरे महायुद्ध, व्हिएतनामचे युद्ध ह्यामधे भाग घ्यायला सरकारला सरकारला भाग पाडलं. गंमत म्हणजे बँक दोन्ही पक्षांना शस्त्रे वगैरे खरेदी करायला पैसे (उदा: जर्मनी आणि अमेरीका) उधार देत असे. व्हिएतनामचे युद्ध तर मुद्दामच लांबवलं गेलं आणि त्यायोगे बँक पैसा कमवत गेली. बँकेच्या धोरणांना विरोध करणारे काँग्रेसमन लुईस मॅकफेडन ह्यांची हत्या झाली. फिल्ममेकरच्या मते बँक लोकांकडून आकारत असलेला उत्पन्नावरचा करसुद्धा बेकायदेशीर आहे. <br /><br />शेवटी असं दाखवलं आहे की ह्या लोकांचा जगभरात एकछ्त्री सरकार स्थापन करण्याचा इरादा आहे. उत्त्तर अमेरीका, युरोप, आफ्रिका आणि एशिया अशा चारही खंडाना एकत्र करुन सगळ्या जगावर सत्ता गाजवण्याचं ह्यांचं स्वप्न आहे. सगळीकडे एकच चलन असेल (कॅनडा, मेक्सिको आणि अमेरीकेनी २००५ मधे एक गुप्त ठराव करून त्याद्वारे अमेरो नावाचं एक कॉमन चलन काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणालाही विशेष माहिती नाही. ) आणि प्रत्येकाच्या शरीरात आरएफआयडी चिप बसवण्यात येईल आणि त्यायोगे कोण कुठे केव्हा काय करत असेल हे सगळं ट्रॅक करता येईल. जो विरोधात जाईल त्याची ही चिप बंद करण्यात येईल आणि त्यायोगे त्याचा जगाशी संपर्कच तुटेल. धर्म, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली हे लोक सगळ्यांमधे फूट पाडून त्यांच्यावर अंमल गाजवत आहेत. <br /><br />अतिशय स्फोटक अशी ही डॉक्युमेंटरी फिल्म असं सांगून जाते की एखादी (खोटी) गोष्ट तुमच्या मनावर सतत बिंबवली की तुम्हाला ती खरी वाटायला लागते. शिक्षणाचा दर्जा सुधारावा असं सरकारला अजिबात वाटत नाही कारण जर लोक सुजाण झाले तर ते ह्या सगळ्याला विरोध करतील. त्यामुळे सगळा भर हा मनोरंजन उद्योगाकडे देण्यात येत आहे. <br /><br />झेटागिस्ट अॅडेंडम अशी पुढचा भाग निघाली आहे. पण मी तो अजून पाहिली नाही. कोणी पाहिली असल्यास त्याबद्दल जरूर माहिती द्यावी. <br /><br />(ह्या लेखातील विचार माझे नसून फिल्ममधे काय मांडलं आहे ते येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.)Hrushikesh Thitehttp://www.blogger.com/profile/00898208420087355737noreply@blogger.com0