Monday, April 5, 2010

मुक्तपीठ आणि कमेंट्स

माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे:

* एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हौन्गकौंगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हौन्गकौंगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत. त्यावर पडलेल्या ह्या कमेंट्स:

१) मुलीचं जाहीर माप काढलेले दिसतंय

२) कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? ज्यांना प्रोब्लेम्स नसतात त्यांना असे प्रोब्लेम्स ओढवून घ्यायची सवय असते. इतके पैसे तिथे उधळलेत त्या पैशात १०० गरीब महिनाभर जेवले असते

३) मुलगी हट्टी आहे हे सांगण्यासाठी लेखन प्रपंच केलेला दिसतोय , तरी या आजीनी एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत.

४) आजीबाई तुमचे जावई बापू डोक्याने जरा कमी दिसतात. स्वताच्या नवजात बाळाला, ओल्या बालांतीन बायकोला आणि पूजनीय सासुमा ला अशा संकटात ढकलण्याच्या आधी नीट सगळी चौकशी करायला नको होती? यांच्या लहरीवर चालायला चीनची वकीलात म्हणजे काय पिताश्रींची जायदाद वाटली का त्यांना? बालिशच आहेत जरा.

५) मराठी मुली मग त्या भारतात असो नाही तर बाहेर (बाहेर जास्तच ) नवर्याला आपल्या तालावर नाचवणारच (ते सुधा स्वभाव माहित असल्यामुळे नाचतात) आणि असले प्रसंग उभे करणार मग ह्या हट्टीपणाला मनाशी ठाम वगैरे शाब्दिक आवरणं चढवून सांगितली तरी फरक पडत नाही

६) या लेखातून आजीबाईना आपण व आपले जावई किती श्रीमंत आहे हे दाखवायचे होते

७) कालपर्यंत USA जावई पुराण सुरु होते , आजपासून नवी मालिका सुरु होत आहे - CHINA जावई पुराण.

८) अ) मुलगी मूर्ख दिसते आहे. ब) जावई स्वताच्या डोक्याचा वापर करताना दिसत नाही तो केला असता तर त्याला अगोदरच कळले असते कि डीलीवरीची ची तारीख आणि नवीन वर्ष एकाचवेळी आहेत आणि गोंधळ होऊ शकतो. क) बाई तुम्ही पण दिव्य आहात जाण्यायेण्याला वेळ लागतो हे माहित असूनही गप्प राहिलात ड) परत असले काही तरी लिहून आमचा वेळ वाया घालवू नका।

९) अरेरे!!! काय हा दैव दुर्विलास! आजी आता जावयांना दुसरा chance घ्याला सांगा आणि या वेळी नीट सगळे प्लान करा.

* एका बाईनी आपल्या मैत्रिणीच गुणगान करणारा लेख लिहिल्यावर त्यावर आलेल्या ह्या कमेंट्स:

१) कहर केला ताई तुम्ही! तुमचा आणि मैत्रीणीचा एक फोटो पाठवून द्या. देवघरात लावतो उद्यापासून

२) मुक्तपीठला आशयघन लेख मिळत नाहीत काय? "साभार परत" योजना करायला हवी.

३) त्या दोन्ही मैत्रिणींच्या एकमेकांबद्दलच्या भावना , मते,अनुभव काहीच न देता फक्त कोण काय शिकले आहे आणि काय काम करते आहे ह्याचेच वर्णन जास्त आहे. मैत्री बद्दल लिहायचे तर त्यात त्यांची मुले, पुतणे, सुना किती कार्यक्षम आहे ह्याची लिस्ट काय कामाची?

४) मला वाटत, ह्यांची मैत्रीण राजकारणात येत आहे आणि त्यांची जाहिरात म्हणून हा लेखनप्रपंच. अन्य कोणताही हेतू या लेखातून दिसून येत नाही

५) पूर्वीची autobiography पुस्तके अशीच लिहिलेली दिसतील. प्रवास वर्णने तर विचारू नका. शिंप्याकडे जाऊन सूट कसा शिवला याचेच ३-४ पाने. त्यावेळी वाचायला दुसरे काहीच नसे. लिहू द्या सगळ्यांना.पण किती माहिती सार्वजनिक करायची हे बघा.

* एकीनी तिच्या वस्तू हरवल्यावर तिला कशी देवमाणस भेटली आणि तिला त्या वस्तू कशा परत मिळाल्या त्यावर लेख लिहिला आणि त्यावरच्या ह्या कमेंट्स:

१) बाकी काही नाही फक्त हे अधोरेखित झाले की तुम्हाला वस्तू सांभाळता येत नाहीत।

२) जगाचा चांगुलपणा जरी असला तरी तुमचा वेन्धळेपणा इथे नक्कीच जाणवतो

३) काकू वस्तू सांभाळायला शिका!!! प्रत्येक वेळी चांगली लोक भेटतीलच असे नाही! नाहीतर पुढच्या वेळेस कश्या वस्तू परत मिळाल्या नाही या साठी लेख लिहावा लागेल.

४) पण तुम्ही तुमच्या गोष्टींची योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा मनस्ताप वाचेल. अनुभव १ आणि अनुभव ३ तर हलगर्जीपणाच दाखवतात. So pls take care. जगातील लोक चांगले आहेत पण आपण आपल्या हलगर्जीपणामुळे त्यांचा वेळ घालवतोय.....

५) जगात चांगुलपणा आहे ते ठीक आहे पण भटकंतीचीच हौस आहे तर स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यायलापण शिका।

६) मला जर तुमची वस्तू मिळाली तर परत देणारच नाही ...लेखाची वाट पाहत बसेल.

७) मावशी सारख्या गोष्टी हरवत जाऊ नकात ...काळजी घ्यावी ...लोकांना काही दुसरी कामे नाहीत काय तुमच्या गोष्टी शोधात बसायला आणि तुम्हाला परत करायला?

८) अहो काकू 'तो' नाही 'ते' म्हणावं अस पतीला एकवचनी संबोधण बर दिसत नाही..

९) लोकांची प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊ नका, कृपा करून...

१०) पुणेरी पाटी - "शनिवार पेठ रहिवासी XXX कुटुंबाला सूचना - इकडे कोणतीही वस्तू विसरू नये, परत केल्याचे पैसे पडतील"

११) अहो जरा काळजी घ्या नाहीतर कधीतरी तुम्हीच हरवाल आणि मग नवरा प्रार्थना करेल (सभ्य गृहस्थ असावेत) की बायकोला कोणी शोधून परत पाठवू नये... ही ही ही ही ही!!!!

१२) तुमच्या स्वताच्या चुकीने हरवलेल्या वस्तू जर परत मिळाल्या म्हणजे जगात चांगुलपणा आहे हे म्हणणे मला पटत नाही, स्वत: काशी करायची आणि मग जगाला नावे ठेवायची (चांगली किंवा वाईट) हे बरोबर नाही.