Tuesday, March 23, 2010

झोप आणि डुलकी

झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप. डुलकीला त्याची सर नाही. मला तर बस/लोकल मध्ये बसल्या मिनटाला झोप यायला लागते. त्यात जर खिडकीपासली जागा असली तर सोन्याहून पिवळ.

पूर्वी तर मला बस मध्ये अशी जोरदार झोप यायची की खिडकीच्या दांड्यावर डोकं आपटून निदान २-३ वेळा तरी कपाळमोक्ष व्हायचा. बसमधून उतरल्यावर कपाळ हे एका साईडनी टम्म फुगलेलं. पण त्याची फिकीर नाय करायची. झोप सलामत तर कपाळ पचास. बरोबर एखादी पिशवी असली आणी त्यात जाड स्वेटर किंवा त्या टाईप काही असलं की मग ती पिशवी खिडकीच्या दांड्यावर ठेवून त्याचा उशीसारखा वापर करून ताणून देता येते. कंडक्टरपण असला निवांत येतो की त्याला ओरडून सांगावस वाटत, बाबा रे मला झोपायचं, तेव्हा पटकन माझ तिकीट काढ. मी मुद्दाम खिडकीपासली जागा पकडतो, कारण त्या दांड्यावर डोक ठेवून निवांत झोपता येत. चुकून कधी दोन लोकांच्या मध्ये किंवा कडेला बसावं लागलं की खरी बोंब होते. बराच वेळ (म्हणजे १५-२० मिनट) मोठ्या मुश्कीलिनी डोळे बळच ताणू ताणू झोप आवरायचा प्रयत्न करतो खरा पण नाईलाज को क्या इलाज!! शेवटी चष्मा वरच्या खिशात जातो आणी समोरच्या दांड्याला घट्ट पकडून ताठ बसायचा प्रयत्न करत झोपेच्या प्रवासाला सुरुवात होते.

आता शिस्तीत काही झोपण जमत नाही. मग, एका बेसावध क्षणी, पहिल्यांदा डाव्या बाजूला जोरात मान पडते. शेजारचा माणूस पहिल्यांदा नुसताच खांद्यानी आपल्या डोक्याला ढुशी मारतो. मी खाडकन जागा होतो आणि ओशाळ होत, परत सरळ झोपायचा प्रयत्न करतो. डाव्या बाजूनी असा प्रसाद मिळाल्यावर आपसूकच मान किंचित उजवीकडे कलते. आता ढुशी मारण्याची वेळ उजवीकडे बसलेल्यावर येते. दोन्हीकडून टोले खाल्ल्यावर आता मान खाली घेऊन समोरच्या दांड्यावर डोकं ठेवतो. पण छे!! तस झोपण काही जमत नाही. हळूच बाजूच्या दोघांकडे नजर टाकतो, ज्याचा चेहेरा कमी रागीट दिसत असेल, त्या बाजूला हळूच मान कलते. ह्यावेळी मात्र झोप बऱ्यापैकी सावध असते. फार फार तर १ - २ वेळा त्यांच्या खांद्यांवर मान जाते पण ह्यावेळी हुशारीनी, त्यांनी ढुशी द्यायच्या आत, पटकन मान सरळ करतो. मनात पक्क ठरवतो की पुढच्या वेळी काही झालं तरी खिडकीपाशीच बसायचं. मला काही काही लोकांच जाम कौतुक वाटत ते शेवटच्या लांबलचक सीटवर बिनधास्त ताणून देतात. दुसरे प्रवासी येऊन त्यांना उठवायचा प्रयत्न करतात पण हे ढिम्म हलत नाहीत. ही कला मला ह्यांच्याकडून एकदा शिकायचीये.

व्यवस्थित झोप घ्यायला पण पोषक वातावरण हवं. म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून, पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही. (गांधीजीनी बहुदा ही गोष्ट मिस केली :-)) आणि अशा वेळी बेल वाजली की, पुलं म्हणतात त्याप्रमाणे दरवाजाबाहेर कुबेर जरी त्याचा खजिना द्यायला आला असेल ना तरी त्याचे हात कलम करून टाकावेसे वाटतात. जेवल्या जेवल्या झोपू नये, शतपावली घालावी हे जरी बरोबर असलं तरी शतपावली घातल्यावर साली झोपच उडून जाते. आमरसाच जेवण झाल्यावर जे काय डोळे जड झाले असतात ना त्याला झोप हा एकच पर्याय आहे.

रात्रीच्या झोपेच गणितच वेगळ आहे. ९ आणि १० वाजता झोपतात ती काही खरी झोप नाही. ते उगीच काहीतरी नियम किंवा शिस्त लावून घेण्यासारख आहे. तंगड्या वर करून एखाद पुस्तक वाचत किंवा सिनेमा बघत जेव्हा डोळे जड होतील ना तेव्हा झोपायला जाव. आजूबाजूचा माणूस घोरणारा असेल तर मग सालं झोपेचं खोबर होऊन जात. हे एक बर आहे की आपल्याला झोपेत आपलच घोरणं ऐकू येत नाही. नाहीतर झोपणच मुश्कील झालं असतं.

Monday, March 22, 2010

ओर्कुटिंग

ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात.

१. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात?

२. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं?

३. ऑर्कुटमध्ये तुम्ही जर काही डीटेल्स अपडेट केले तर ते तुमच्या मित्र - मैत्रीणीना त्यांच्या होम पेज वर दिसतात. त्यामुळे लोकं चिन्धी चिन्धी गोष्टी अपडेट करत बसतात. उदाहरणार्थ: स्टेटस मध्ये "आयपील इज कमिंग" किंवा काहीतरी अगम्य इंग्लिश कोट टाकतात. काही लोक तर फर्स्ट नेम आणी लास्ट नेम अपडेट करतात आणी तिथे काहीतरी मेसेज टाकून ठेवतात. आता ही काही अपडेट करायची गोष्ट झाली का? जन्मापासून मरेपर्यंत तुमचं नाव काही बदलत नाही (अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा). बर हे नाव अपडेट केल्यावर हा/ही ओरीजनल कोण होता/होती ते जाम कळत नाहीत. मग लोक त्याला/तिला scrap टाकून विचारतात की बाबा/बाई तू नक्की कोण? ह्यावर त्याने/तिनी सरळ सरळ सांगावं की नाही? पण पब्लिक पण जाम वस्ताद असतं. ओळख बर मी कोण आहे? ह्या टाईपचे खेळ सुरु करतात.

४. काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ह्यावर कडी म्हणजे समजा लोक उटीला हनिमूनला गेले असतील तर रोज रात्री तिकडच्या निसर्गदृश्यांचे फोटो अपलोड करतात. ह्या लोकांना एवढा वेळ आणी मुख्य म्हणजे अशा वेळी ही भलतीच इच्छा कशी होत असावी?

५. काही चतुर लोक तर समजा त्यांना १० फोटो अपलोड करायचे असतील तर रोज एक फोटो अपलोड करतात. म्हणजे होत काय की त्यांच्या फ्रेंड सर्कलला रोज ह्यांचे "रिसेंट अपडेट्स" दिसतात.

६. टेस्टीमोनिअलला ऑर्कुट मध्ये जाम महत्व आहे. म्हणजे क्ष व्यक्तीला य व्यक्तीबद्दल जर काही लिहावस वाटल तर तो त्याच्या/तिच्याबद्दल मजेदार गोष्टी लिहितो. खर तर ही गोष्ट ऐच्छिक आहे. पण काही काही पब्लिक जाम माग लागत की माझ्याबद्दल तू काहीतरी लिही. बर त्याच्या/तिच्याबद्दल खर लिहून पण चालत नाही. य ची अशी अपेक्षा असते की असं काहीतरी लिहावं की त्याचं/तिचं फ्रेंड सर्कल जाम फिदा व्हायला हवं. हा एक दबाव ऑर्कुट वर नेहेमी असतो :-)

७. तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत.

८. पब्लिक मध्ये जाम स्पर्धा असते की कोणाचे फ्रेंड्स जास्त आहेत. मग मित्राचे मित्र वगैरे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात. आता ज्या माणसाला आपण कधी पाहिलं नाही त्याची रिक्वेस्ट कशी स्वीकारणार? बर समजा झाले तुमचे १००० फ्रेंड्स, पुढे काय? मला नाही वाटत की ऑर्कुटनी सगळ्यात जास्त फ्रेंड्स असाणार्याला काही बक्षीस वगैरे ठेवल असेल.