Friday, August 26, 2016

हजारो ख्वाहिशें ऐसी....

काही महिन्यांपूर्वीच  मी माझा 35 वा बड्डे धुमधडाक्यात साजरा केला. आयुष्याच्या ह्या स्टेजला खरंतर मी (आणि माझे बव्हतांशी समवयस्क मित्र/मैत्रिणी) खुश असायला हवेत..... आर्थिक, सामाजिक, इत्यादी इत्यादी सगळं स्वातंत्र्य कमावलं आहे... आयुष्याच्या जहाजाचं सुकाणू आपल्या हातात आहे..त्याला आपण जिथे पाहिजे तिथे घुमवू शकतो.... आहे कि नाही मजा?

पण दुर्दैवाने माझे काही दोस्त ह्या स्टेजला "आलिया भोगासी असावे सादर", "आता उरलो उपकारापुरता", "आता काय राहिलंय आयुष्यात", "चाळीशी जवळ आलीये' अशा टाईपचा निराशावादी विचार करतात तेव्हा मला आश्चर्यचकित व्हायला होतं...

माझ्यापुरतं म्हणाल तर मी थोडंफार कमावलंय, थोडं फार शिकलोय आणि अजून खूप काही मिळवायचंय असाच विचार येतो.. मुलं किती मोठं झालीयेत, पुढे खर्च किती आहेत, शरीराला काय काय व्याधी जडल्यायेत हे क्षुल्लक विचार आहेत..

आता बघा हां,  अजूनही मला पोहता येत नाही...उगीच चार पाच फुटात डुंबत राहून इतरांनी मारलेले सूर बघत बसण्यात काय हशील आहे??
मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या आम जनतेलासुध्दा समजणाऱ्या भाषांशिवाय कुठली नवीन भाषा शिकलोय?
बाथरूम सिंगर आणि इतरांच्या गाण्याला टेबलावर धरलेल्या ठेक्याशिवाय संगीतातलं काय ज्ञान मी मिळवलंय?
क्रिकेट हा आपला अघोषित राष्ट्रीय खेळ सोडला तर मला इतर खेळांविषयी कितपत माहिती आहे?
स्वयंपाक हा काही फक्त बायकांसाठी राखून ठेवलेला प्रांत नाही.. चहा आणि मॅगीशिवाय दुसरं काय बनवायला शिकलोय?

मारे स्वतःला पट्टीचा वाचक समजतो मी पण विशिष्ट लेखक/लेखिका सोडले तर काय वाचलंय मी?
मराठीत अजूनही नामदेव ढसाळ, दया पवार, इत्यादींचं दलित साहित्य वाचायचंय....संत साहित्यातलं रा.चिं ढेरे, सदानंद मोरेंचं लिखाण अजून वाचायचं बाकी आहे.. समग्र ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव,  रामदास, चोखामेळा, एकनाथांचं लिखाण वाचायचंय...

इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोनी दांडेकरांच्या एकाही पुस्तकाला अजून हात लावलेला नाही...बऱ्याच आधी नेमाडे, श्याम मनोहरांची पुस्तकं वाचायचा, समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता... पण तेव्हा काही केल्या ती झेपली नव्हती... काय हरकत आहे आता पुन्हा वाचून बघायला? कदाचित गेल्या काही वर्षांत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या असतील आणि ती पुस्तकं आता कदाचित नव्याने उमगतीलही...

 मराठी कविता/गझलांमध्ये  कुसुमाग्रज, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, संदीप खरे, थोड्या प्रमाणात केशवसुत, बा.सी. मर्ढेकर, दा.सु. वैद्य, बा.भ. बोरकर, विं.दा., इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट सोडले तर बरेचसे कवी/कवयित्री आणि त्यांच्या कविता मला अनभिज्ञ आहेत....

नाटकांचं म्हणाल तर शांतेचं कार्ट, तरुण तुर्क, यदाकदाचित अशी लोकप्रिय विनोदी नाटकं, प्रशांत दामलेची नाटकं सोडली तर अजूनही मी विजया मेहता, सतीश आळेकर, चेतन दातार, तेंडुलकर, एलकुंचवार, अतुल पेठे, दुबे इत्यादींच्या महासागरात प्रवेश केलेलाच नाही


इंग्रजी साहित्याबद्दल म्हणाल तर चेतन भगत, रॉबिन शर्मा आणि तत्सम व्यवस्थापन किंवा सेल्फ-हेल्प कॅटेगरीतली पुस्तकं, खालीद हुसेनी, फौंटनहेड, शेरलॉक होम्स अशी तुटपुंजी यादी वगळता अजून बरंच काही वाचायचं बाकी आहे...

चित्रपटांचं म्हणाल तर मराठी, हिंदी आणि निवडक लोकप्रिय इंग्लिश चित्रपट वगळता अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं बाकी आहे....जगभरातल्या उत्कृष्ट अशा डॉक्यूमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स अजून बघायच्या बाकी आहेत....

पंढरीची वारी, नर्मदा परिक्रमा, लेह-लडाख मध्ये बाईकवर प्रवास, मनाली ट्रेक, कैलाश-मानसरोवर, महाराष्ट्रातले बहुतांश गड-किल्ले, गिरनार अशा अनेक अनुभूती घ्यायच्या बाकी आहेत.. भारतात मध्य प्रदेश, हिमाचल, गोवा वगळता अनेक प्रदेश पादाक्रांत करायचे बाकी आहेत...तेव्हा  जगप्रवास तर पुढची पायरी आहे...

ही यादी न संपणारी आहे... डन पेक्षा टू डू लिस्ट फार मोठी आहे... ह्यातल्या कितपत गोष्टी साध्य होतील हा भाग अलहीदा पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

ह्या निमित्ताने, मिर्झा गालिबच्या खालील ओळी आठवल्यावाचून रहात नाहीत

"हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"

Saturday, July 2, 2016

मधुसूदन

अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...

किलकिल्या डोळ्यांनी त्यानी रस्त्यावर एक नजर टाकली...  भगभगतं ऊन, रस्त्यावरची गर्दी, लोकांची धावपळ आणि पुन्हा एकदा जाणवलेलं स्वतःचं रिकामपण डोळ्यांत साठवत त्याने डोळे गच्च मिटले... चहा ढोसायला ये अशी आईची हाक आल्यावर त्यानी त्याचे शुष्क डोळे उघडले आणि आत येऊन भिंतीला टेकला...कानतुटका कप आणि टवके उडालेल्या बशीचा दाणकन आवाज आल्यावर त्यानी समोर बघितलं... आईने नेहेमीप्रमाणे जोरात कपबशी पुढ्यात आदळल्याने अर्धाअधिक चहा बशीतच सांडला होता..

नावापुरतं दूध, अर्धा चमचा साखर असलेला तो कडू चहा त्याने दोन घोटात गिळला... "मन्याकाकाच्या कंपनीत सेक्युरिटी गार्डची पोस्ट खाली आहे.. तिकडे जाणारेस की बापाला म्हातारपणात तंगडतोड करायला लावणारेस?" असा कोपऱ्यातून आवाज आल्यावर मधू उठला आणि त्या एका रूमच्या आडोशाला केलेल्या न्हाणीघरात घुसला.. चतकोरच्याही अर्ध्या उरलेल्या साबणाला अंग घासत दोन तांब्यात त्याने आंघोळ उरकली.. कळकट झालेला शर्ट आणि पॅन्ट अंगावर चढवत मधू घराबाहेर पडला

चाळीतल्या लोकांच्या टोचणाऱ्या नजरांकडे दुर्लक्ष करत तो बस स्टॉपपाशी पोहोचला.. "हा मध्याच ना ग? बापाच्या पेन्शनवर आयतं खाणारा"? "हो तोच आहे हा".. ह्या नेहेमीच्या कुजबूजीकडे दुर्लक्ष करत तो बसची वाट पाहू लागला...212 नंबरची बस आल्यावर मधू नेहेमीप्रमाणे दाराशी जाऊन लटकला..कंडक्टर तिकिटाचे पैसे गोळे करत त्याच्या अगदी हातभर अंतरावर आला तेव्हा मधू घाईघाईत 2 स्टॉप अलीकडेच उतरला... फुकटे, चोर साले ह्या कंडक्टरच्या चिरपरिचित आवाजाकडे दुर्लक्ष करत तो झपझप पावले टाकू लागला...ठाकूरदास सांस्कृतिक हॉल ही पाटी दिसताच तो आत घुसला...

तो पोहोचला तेव्हा हॉल बऱ्यापैकी भरला होता... ओल्ड इज गोल्ड ऑर्केस्ट्रा ऑडिशन अशी गिचमीड्या अक्षरात एक पाटी स्टेजवर लावली होती.. सिंथेसाईजरवर वयस्कर अमरदा बसले होते... स्टेजवर माईक घेऊन एक पोरसवदा मुलगा "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू" किंचाळत होता...
तेवढ्यात अमरदांची नजर मधूवर गेली.. सिंथेसाईझर मधेच थांबवत ते मधूकडे गेले आणि त्याला ओढत नरेशभाईंकडे गेले... "नरेशभाई, ये लडके का गाना सुनो, आप बाकी सबको भूल जाओगे" अस म्हणत त्या स्टेजवरच्या पोराकडून माईक हिसकावत त्यांनी मधूकडे दिला...

मधू माईक हातात घेत स्टेजवर चढला... अमरदांना तो कोणतं गाणं गाणारे हे पक्क ठाऊक होतं... मधूनी डोळे मिटले आणि "ओ मांझी रे" सुरु केलं.. क्षणभरात संपूर्ण हॉल चिडीचूप झाला...  "साहिलों पे  बेहेनेवाले"ला जेव्हा त्याने सूर लावला तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला.... गाणं संपल्यावर काही क्षण भयाण शांतता पसरली आणि मग सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला

त्या कडकडाटात नकळतपणे मधुसूदन भूतकाळात गेला.. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी जेव्हा त्याने हेच गाणं गायलं होतं तेव्हा पहिल्या रांगेत बसलेली अवंतिका त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन एकटक पहात राहिली... गाणं संपल्यावर तिनी स्वतःहून त्याच्याशी ओळख करून घेतली... आणि नंतर तर त्याच्या आवाजावर फिदा होत ती त्याच्या प्रेमातच पडली...

चांदण्या रात्री, नदीकाठी हातात हात गुंफून चालत असताना दोघांनी मिळून गायलेलं "ये रातें, ये मौसम नदीका किनारा" आठवलं.. "कहा दो दिलोने के, मिलकर कभी हम ना होंगे जुदा" हे एकसुरात गात अवंतिकानी त्याच्या खांद्यावर हलकेच ठेवलेलं डोकं आठवलं...कॉलेज संपल्यावर ऑडिटोरियमच्या पायऱ्यांवर बसून तिच्यासाठी गायलेलं "छुकर मेरे मनको किया तुने क्या इशारा" आठवलं.... अवंतिकाच्या नजरेतील व्याकुळता आणि तेव्हाच घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका आठवल्या...

तेवढ्यात त्याच्या पाठीवर नरेशभाईंची थाप पडली आणि तो भानावर आला... "हिरा आहे रे तू हिरा, इतके दिवस कुठे लपून बसला होतास रे? अमरदा इसको नवरात्री के लिये फायनल कर दो"....
मग बराच वेळ मधू अमरदांबरोबर गाणी सिलेक्ट करत बसला... रात्री बऱ्याच उशिरा तो घरात शिरला..
बल्बचा अपुरा पडणारा उदासवाणा प्रकाश, त्यात माणसांच्या, वस्तूंच्या पडलेल्या अनावश्यक सावल्या,  स्टोव्हची भगभग ...
मधू येऊन भिंतीला टेकला... बाप तिरिमिरीत येऊन मधूचे दोन्ही खांदे पकडून जोरजोरात हलवत म्हणाला  "नालायका, कुठे तडफडला होतास दिवसभर?? मन्याकाकाच्या कंपनीत का नाही गेलास? अरे बांडगुळा अजून किती दिवस जगशील बापाच्या पैशावर?" संतापाचा उद्रेक होऊन मधूचा बाप हमसून हमसून रडायला लागला.. आईनी नेहेमीसारखं बाप-लेकाकडे हतबल होऊन पाहिलं आणि डॊळ्याला पदर लावला...
बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही आणि मग मधू सावकाशीने उठला आणि पेलाभर पाणी पिऊन गॅलरीत झोपायला गेला. अरे जेवण..... , आईचे शब्द अर्धवटच राहिले...

पुढचे काही दिवस मधू गाण्याच्या सरावाच्या निमित्तानी बाहेरच राहू लागला.. "इशारो, इशारोमें दिल लेनेवाले"च्या वेळी त्याच्या आवाजातल्या हरकती पाहून सीमा आश्चर्यचकित झाली... "वो शाम  कुछ अजीब थी"च्या वेळचा त्याच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून अख्खा ऑर्केस्ट्रा ग्रुप निःशब्द झाला..

मधू सुरांच्या साम्राज्यातला राजा होता.. डोळे बंद करून एकदा गाणं सुरु केलं कि त्याला आयुष्यातलं अपयश, बेकारी, भकास चाळ, तुटका कप, कडवट चहा,  भिंतींचे पोपडे, गॅलरीतलं ते अंग मुडपून झोपणं, बल्बचा पिवळट, उदासवाणा उजेड, हतबल आई, पिचलेला बाप सगळं सगळं विसरायला व्हायचं...

असाच एकदा सराव चालू होता.. "हम खो चलें, चांद है या कोई जादूगर है" म्हणत असतानाच दरवाजा खाडकन उघडला गेला... नरेशभाई घाईघाईने आत आले आणि थेट अमरदांकडे गेले.. "अमरदा, आपला प्रोग्राम थोडा चेंज करावा लागेल... अभी ये नये लोगोंको रफी, लता, मुकेश, किशोर ज्यादा पता नहीं है... तो आधा टाईम ओल्ड इज गोल्ड और बाकीका आधा न्यू इज फन करना पडेगा... मिका, हनी सिंग ह्या लोकांची गाणी सिलेक्ट करून टाका.." अमरदांनी होकारार्थी मान डोलावली.... तो होकार नरेशभाईंच्या प्रपोजलपेक्षाही कितीतरी पटीने अधिक त्यांच्या स्वतःच्या अगतिकतेमुळे होता.. वन रूम किचनचा हप्ता, पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिपायाची नोकरी लावण्यासाठी द्यावे लागणारे पैसे, बायकोचं आजारपण सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं..ह्याच अगतिकतेमुळे त्यांनी आधीही गणपतीतल्या, नवरात्रातल्या आरत्यांना फिल्मी गाण्यांच्या चाली लावल्या होत्या..

तेवढ्यात नरेश भाई मधू कडे वळून म्हणाले, " अरे सुपरस्टार, जरा आता माझी सटकली ऐकव यार..."
हे ऐकताच मधूनी जळजळीत नजरेनी पाहिलं... नरेशभाईना त्याच्या नजरेतला अंगार जाणवला असावा, "क्या प्रॉब्लेम है रे तुझे?"

"असली गल्लाभरू गाणी गाणं शक्य नाही मला... रफी, किशोर मुकेशच्या सुरांवर पोसलोय मी... फक्त गायकच नाही तर संगीतकार, गीतकारही तेवढ्याच ताकदीचे होते.. आरडी, ओपी, एसडी, मदनमोहनसारख्या दिग्गजांच्या चाली ओठावर आहेत आणि साहिर, शैलेंद्र, मजरूह, गुलजारसारख्यांचे शब्द मनात... ही अशी थिल्लर गाणी गाणं शक्य नाही मला"

हे ऐकताच नरेशभाईंचा राग अनावर झाला आणि ते मधूला ओरडून म्हणाले "दिडदमडीचा गायक तू आणि दुसऱ्याच्या गाण्याची लायकी काढतोस?? अरे तुझ्यासारखे पन्नास गायक पडलेत बाजारात, पैसा फेकला तर वाट्टेल ते गातील माझ्यासाठी... आणि काय रे स्वतःच्या बापाच्या पेन्शनवर जगतो तू.. चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मला शहाणपणा शिकवतोस? चल हो बाहेर, परत तोंड नको दाखवूस मला"

…..........

अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...

Monday, June 27, 2016

एक भयाण रात्र

"मे आय कम इन समर?"
"येस प्लीज कामिनी "...

समर आपल्या केबिनमध्ये लॅपटॉप उघडून गंभीर चेहऱ्याने बसला होता... "सीट डाऊन प्लीज कामिनी"...

समर हा इझी सोल्युशन्स कंपनीत टीम लीडर होता.. आज त्याचं कामिनीसोबत अन्युअल अप्रेझल डिस्कशन होतं... कामिनी ज्युनिअर होती आणि तिचं कंपनीतलं हे पहिलं अप्रेझल होतं... त्यामुळे साहजिकच ती नर्व्हस होती...

"कामिनी तू गेल्या वर्षभर चांगलं काम केलंस... पण तीन चार वेळा तुझ्याकडून खूप अक्षम्य चुका झाल्या आणि त्यामुळे कंपनीचं नाव खराब झालंय... त्यामुळे मॅनेजमेन्ट तुझ्यावर नाखूष आहे.. आय एम सॉरी पण आम्हाला तुला काढून टाकावं लागत आहे... तू जर स्वतःहून रिझाईन केलंस तर बरं होईल... तुला आम्ही 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स देऊ आणि मग तुला दुसरी नोकरी शोधायला वेळही मिळेल"...

हे ऐकताच कामिनीचा चेहरा रडवेला झाला आणि क्षणार्धात तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले...
"सर प्लीज मला माफ करा.  मी स्वतःला सुधारेन... हवं तर विकेन्डस लाही काम करेन आणि कॉम्प ऑफ ही घेणार नाही..,  प्लीज सर आय रिअली नीड धिस जॉब".. असं बोलून तिचा बांध फुटला...

तेवढ्यात समर घाईघाईने म्हणाला "अरे मी तर मजा करत होतो... तू खूप छान काम केलं आहेस आणि त्यामुळे तुला टॉप रेटिंग मिळालंय.. रिलॅक्स यार"..हे ऐकताच कामिनीच्या जीवात जीव आला आणि ती "थँक्यू सर" म्हणाली.. मग स्वतःला सावरत ती म्हणाली "सर प्लीज अशी जीवघेणी चेष्टा नका ओ करत जाऊ.. त्रास होतो अशाने"..

त्यावर समर मोठमोठ्यानी हसत म्हणाला, "अरे मी तर नेहेमीच अशी चेष्टा करतो, डोन्च यु नो येट"???

खरोखरच ही काही समरनी केलेली पहिली चेष्टा नव्हती... मागे एकदा लंच ब्रेक मध्ये त्याने एकाच्या सॅकमध्ये रबरी साप टाकला होता...  लंच ब्रेकहून आल्यावर जेव्हा त्या माणसाने डायरी काढण्यासाठी सॅकमध्ये हात घातला तेव्हा डायरीऐवजी त्याच्या हातात रबरी साप आला आणि तो जो मोठ्याने ओरडला की अख्खा फ्लोअर त्याच्या डेस्कपाशी जमा झाला... आणि मग समर त्याचं नेहेमीचं गडगडाटी हास्य करत आला आणि त्याला मजा केल्याबद्दल सॉरी म्हणाला...

अशा अनेक मजा तो आजवर करत आला होता... त्यामुळे लोकांना त्याचा राग येणं स्वाभाविक होतं... तरीही समर लोकांना आवडायचा कारण तो दिलखुलास होता.. तात्पुरती मजा करायचा आणि मग त्या व्यक्तीला सॉरी म्हणून त्या व्यक्तीला कॉफी, स्नॅक्स खायला न्यायचा .. त्यामुळे समोरच्याचा राग लगेच निवळायचा..
कुठल्याही टीम इव्हेंटला तो सगळ्यात आधी दिलदारपणे पैसे द्यायचा.. त्याच्या अंडरच्या लोकांना तो खूप चांगलं रेटिंग द्यायचा त्यामुळे साहजिकच त्याचे ज्युनिअर्स त्याच्यावर खुश होते.. तो स्वतः एक हाय परफॉर्मिंग इंडिव्हिजुल होता.. टेक्निकली तर तो चांगला होताच पण त्याच्या संभाषण चातुर्यामुळे त्याने कंपनीला अनेक क्लाइंट्स मिळवून दिले होते.. साहजिकच मॅनेजमेन्टही त्याच्यावर जाम खुश होतं आणि त्यामुळे  त्याच्या चेष्टेखोर स्वभावाकडे ते आपसूक दुर्लक्ष करायचे

अशातच एक दिवस कंपनीची दिवेआगारला ट्रिप ठरली.... समरची बायको पूर्वा श्रीवर्धनची होती... त्यामुळे तिनी समरला "मला तुमच्यासोबत न्या आणि माहेरी सोडा" अशी गळ घातली.... "नाहीतर तू ट्रीपला नाही जायचं" असं फर्मान तिनी सोडलं.. अखेर हो नाही करत करत समर तयार झाला...

शनिवारी संध्याकाळी सगळे दिवेआगारला पोहोचले... आणि मग समर त्याच्या होंडा सिटीतून पूर्वाला श्रीवर्धनला पोहोचवायला निघाला.. हिवाळा असल्यामुळे बऱ्यापैकी अंधार झाला होता... निम्म्या रस्त्यात येऊस्तोवर रात्र झाली होती.. समरला नेहेमीप्रमाणे मजा करायची हुक्की आली... त्यानी गाडीचे हेडलाईट्स बंद केले, पूर्वा किंचाळली "नको ना समर खूप भीती वाटते रे"... मग त्यानी परत हेडलाईट्स चालू केले... कोकणातल्या अरुंद, निर्जन रस्त्यावरची ही त्याची आवडती चेष्टा होती.  संपूर्ण रस्ताभर पूर्वाला घाबरवत तो अखेर श्रीवर्धनला पोहोचला...

सासुरवाडीला समरचं जंगी स्वागत झालं.. कोकणी जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर समर काही वेळ सासरेबुवांसोबत गप्पा मारत बसला... दिवाणखान्यातल्या घड्याळात 10 चे टोले झाले आणि समर एकदम उठून उभा राहिला...
"काय झालं ओ जावाईबापू"?
"चला मी निघतो आता दिवेआगारला" - इति समर
"काय???? अहो आज अमावस्या आहे, तुम्ही कृपया उद्या पहाटे निघा"...
"नाही नाही... माझी टीम माझी वाट पहातेय... आय नीड टू गो" असं म्हणत समर लगबगिनी निघाला...
कोणाचंही न ऐकता हट्टी समर गाडी स्टार्ट करून श्रीवर्धनहून दिवेआगारकडे निघाला...

त्याच्या गाडीत ब्लौपंकची भारी म्युझिक सिस्टिम होती... त्यावर जगजितच्या गझल ऐकत तो सुसाट निघाला.. काही वेळाने परत तो सुनसान अरुंद रस्ता सुरु झाला.. समरला तो रस्ता आता पाठ झाला होता..त्याला परत एकदा मजा करायची हुक्की आली... त्यानि हेडलाईट्स चालू बंद करायला सुरुवात केली.... बरोबर सहाव्या वेळी जेव्हा त्यानी हेडलाईट्स चालू केले त्यावेळी त्याला समोर एक लाल साडीतली बाई दिसली.. त्यानी करकचून ब्रेक दाबला पण तोवर ती बाई त्याच्या गाडीला धडकून बॉनेटवर येऊन पडली...

तिचे लांबसडक, अस्ताव्यस्त झालेले केस समोरच्या काचेवर पसरले होते... त्यामुळे समरला नीट काही दिसत नव्हतं... एरवी शूर असणाऱ्या समरचे पाय आता, त्याच्या नकळत, लटलट कापत होते... थरथरत्या हातानी त्यानी दरवाजा उघडला...
"हॅलो हॅलो" ओरडत तो गाडीच्या पुढच्या बाजूला गेला... त्या बाईकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही.. समरच्या घशाला आता कोरड पडली.. त्याने उसने अवसान आणत त्या पालथ्या पडलेल्या बाईला सरळ केलं.. गोऱ्यापान चेहऱ्याच्या त्या बाईच कुंकू कपाळभर पसरलं होतं..तिचे डोळे अर्धवट उघडे होते आणि बुबुळ वरती गेल्याने डोळ्यातला नुसताच पांढरा भाग दिसत होता...ते पाहून समरच्या अंगावर सर्रकन काटा आला... तरीही हिम्मत करून समरनी त्या बाईला उचललं आणि मागच्या सीटवर झोपवलं..

टीम मेम्बर्सला कॉल करून हेल्प मागावी म्हणून समरनी मोबाइल हातात घेतला पण दुर्दैवाने मोबाइलला अजिबात रेंज नव्हती... कशीबशी गाडी स्टार्ट करत समर दिवेआगारकडे निघाला... अधून मधून तो मागे झोपलेल्या बाईकडे पहात होता... अमावस्या असल्या कारणाने रस्त्यावर   किर्र काळोख होता... डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं...एक शार्प टर्न घेतल्यावर त्यानि परत मागे बघितलं आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला...
ती बाई उठून सीटवर बसली होती आणि डोळे सताड उघडे ठेवून समरकडेच पहात होती... हे पाहून समरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी डावीकडच्या झाडावर जाऊन आदळली...
समरचं डोकं दाणकन स्टीरिंगवर आदळलं आणि त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले...

काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि त्याने घाबरत घाबरत मागे बघितलं... परत एकदा त्याच्या हृदयाचा ठोका चुकला कारण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं...गाडीचं दार उघडून तो लडखडत्या पावलांनी  बाहेर आला.. ती बाई कुठेच दिसत नव्हती.. तेवढ्यात त्याला डावीकडच्या झाडीतून रडण्याचा आवाज ऐकू आला..

मनाचा हिय्या करत समर झाडीत उतरला... जसजसा तो पुढे जात होता तसतसा त्याला रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला.. समोर आलेलं झुडूप त्यानी हातानी बाजूला केलं आणि त्याला समोर जे दिसलं ते पाहून त्याची जाम टरकली..
ती बाई एका झाडाखाली बसून हुंदके देत होती.. तिची मान खाली होती आणि त्यामुळे तिचे लांबसडक केस जमिनीपर्यंत पसरले होते... उरलीसुरली हिम्मत गोळा करत समर त्या बाईपाशी पोहोचला आणि त्याने तिच्या खांद्याला स्पर्श केला....
तत्क्षणी  त्या बाईने डोके वर उचलले आणि समरकडे पहात भेसूर आवाजात खदखदा हसू लागली....

भर थंडीत समरला दरदरून घाम फुटला आणि मागे वळून तो अडखळत्या पावलांनी धावायला लागला.. तेवढ्यात एक मोठया दगडाला त्याची ठेच लागली आणि तो खाली कोसळला

अचानक रोडवरून गलका ऐकू आला आणि दहा बारा लोक समरकडे धावले... "कशी वाटली आमची गंमत समर/सर?? घाबरलात की नाही"??
ती लाल साडीतली बाईसुद्धा हसत हसत आली आणि बाकीच्यांना टाळी देत म्हणाली "ऐ काय रे कसलं डेंजर नाटक करवलं तुम्ही माझ्याकडून.. परत नाही हां असं करणार कधी"...

एवढा गोंधळ होऊनही समर उठला नाही.. ते पाहून सगळे चिडीचूप झाले ... लगेच एकानी समरला गदागदा हलवलं पण समरनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही... शेवटी त्याने समरच्या छातीपाशी कान नेऊन हृदयाचे ठोके चालू आहेत का ते पाहिलं.. दुर्दैवाने तीव्र धक्क्याने समरचं हृदय बंद पडलं होतं..

पदोपदी सगळ्यांची चेष्टा करणाऱ्या समरच्या टीममेट्सनी केलेली एकमेव चेष्टा त्याच्या जीवावर बेतली होती

Saturday, June 25, 2016

एक काहीच्या काही कथा

काल रात्री भयंकर पाऊस आणि विजा पडल्या असाव्यात..कारण सकाळी जाग आली तेव्हा मी पाण्यावर तरंगत होतो... आजूबाजूला पाच पंचवीस चांदण्या तरंगत होत्या आणि वरती छत कोसळून डायरेक्ट खड्डे पडलेलं आभाळ दिसत होतं..
मी नेम धरून एक एक चांदणी वरती फेकली आणि एकेका खड्डयात त्या व्यवस्थित जाऊन बसल्या...हे करत असताना एक चांदणी चुकून माझ्या मनगटाला घासली गेली.. आणि तेवढा भाग लख्ख गोरा झाला... ताबडतोब मी उरलेल्या चांदण्या संपूर्ण अंगाला घासून घेतल्या आणि आरशापुढे जाऊन उभा राहिलो... पाहतो तर काय,  मी हृतिकपेक्षा साडे बत्तीसपट गोरा दिसत होतो.... मग मी उरलेल्या चांदण्या आकाशात फेकून दिल्या....

वरतून आवाज आला, चंद्र काय तुझा काका फेकणारे?? मी पोहत पोहत हॉल मध्ये गेलो.. पाहतो तर काय टीव्ही चालू होता आणि चंद्र त्यावर चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे गाणं पहात हसत बसला होता..
तेवढ्यात चांद छुपा बादलमें गाणं लागलं आणि घाईघाईत चंद्र पडद्याआड जाऊन लपला...

मी ड्राय बाल्कनीत जाऊन कपडे वाळत घालायची दोरी काढून आणली.... चंद्राला त्या दोरीनी बांधून मी त्याचा झिलबिंडा केला आणी सात आठ वेळा गोल गोल घुमवला.... शेवटी वेग आल्यावर तो आकाशाच्या दिशेनी जोरात फेकला... तो बरोबर सर्वात मोठ्या खड्डयात जाऊन फिट्ट बसला.... अयायाया असं करत चंद्र विव्हळायला लागला... पाठ मोडली रे माझी काहीतरी औषध फेक असा वरून आवाज आला.. मी लगबगीने आयोडेक्स, मूव्ह, झंडू बाम, रेली स्प्रे, टायगर बाम एकत्र करून त्याचा परत झिलबिंडा बनवला आणि चंद्राच्या दिशेनी फेकला.. अर्ध्या मिनिटाच्या आत आह से आहा तक, आयोडेक्स मलीये काम पे चलीये अशा आकाशवाण्या सुरु झाल्या... मी मनात म्हणालो चला मामांची सेटिंग लागली दिसतेय....

तेवढ्यात मला आमच्या दुसऱ्या बेडरूम मधून वाफा येताना दिसल्या.. मी जाऊन पाहिलं तर काय शनी खिडकीतून खालच्या लोकांकडे रागाने बघत होता.. मी हळूच बादलीभर पाणी आणलं आणि 2 डबल साईझ बेडशीट्सची टोकं जोडून एक भली मोठी बेडशीट तयार केली... शनी बेसावध आहे हे पाहून त्याच्यावर भसकन बादलीभर थंड पाणी ओतलं आणि पटकन ती बेडशीट त्याच्याभोवती गुंडाळून पक्की गाठ बांधली....मग मी आमचं डबल बेडचं स्टोअरेज उघडून त्यात शनीला बंद केलं...

अचानक मला बाथरूम मधून शॉवरचा आवाज आला, मी हळूच दार उघडून पाहिलं तर मंगळ मजेत शॉवरखाली आंघोळ करत होता...
तो बेसावध आहे हे हेरून मी लगेच दोन्ही बाथरुमचे शॉवर कर्टन्स एकमेकांना जोडले आणि त्यात मंगळाला बंदिस्त केलं

तेवढ्यात मला बाहेर गलका ऐकू आला, जाऊन पाहातो तर काय सगळे मीडियावाले हॉल मध्ये जमा झालेले.. त्यांनी मला सांगितलं की चंद्र आणि चांदण्यांनी एकमताने व्होटिंग केल्यामुळे माझी आंतरराष्ट्रीय गॅलिलियो आणि कोपर्निकस पुरस्कारासाठी निवड झाली आहे...
हे कमी होते म्हणून की काय मला राष्ट्रीय ज्योतिष आणि आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला होता 

Thursday, April 21, 2016

पावनखिंड - एक अविस्मरणीय अनुभव

तसा मी लहरी महंमद आहे.. कधी कुठलं खुळ डोक्यात शिरेल त्याचा नेम नाही.. हल्ली पायाला भिंगरी(आणि गाडीला चाकं) लागलीये त्यामुळे फिरायच खुळ डोक्यात शिरलंय...

गेल्या विकांतालाच फॅमिलीसोबत पावनखिंडीला जायचं ठरलं.. शनवार, रविवार पुरले नसते म्हणून  (माझ्या बॉसच्या भाषेत स्वतःचा कॉन्शस मारून :-))शुक्रवारची सुट्टी टाकली.. गुरुवारी निदान दहा वेळा तरी मला म्हणाला की अरे एन्जॉय कर वेकेशन, बस तेरा कॉन्शस तुझे अलाऊ कर रहा है ना, फिर ठीक है.. हे असं बोलून बोलून उगाचच मनात अपराधिपणाची भावना निर्माण केली त्यानी... "हृषी फ्रायडेसे छुट्टीपे जा रहा है" असं सारखं बोलून दाखवायला लागल्याने "अरे भाई सिर्फ फ्रायडेकोही छूट्टीपे हूँ" हे कैलेंडर त्याच्यासमोर नाचवत सांगावं लागलं.. असो....

आम्ही पावनखिंड रिसॉर्टच आधीच ऑनलाइन बुकिंग केलं होतं... (2100/- पर हेड, पर डे - इन्क्लूडिंग लंच, डिनर, ब्रेकफास्ट इत्यादि.. लहान मुलांच साधारण 845/- पर हेड 【सहा वर्षाखालील】) त्यांच्या वेबसाईटवर अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यानी सगळी माहिती दिली आहे.. ते पाहून, आपलं रिक्वायरमेंट किंवा टेक्नीकल डोक्युमेंट पण इतकं व्यवस्थित नसतं असा एक विचार उगाचच मनात येवून गेला (परत एक हकनाक अपराधिपणाची भावना)

डे 1:
-------
मुलांचं (आणि माझं) उठून आवरेस्तोवर निघायला पार साडेदहा वाजले आणि सगळ्यांच्या (मी)शिव्या खात पावनखिंडीकडे कूच केलं...

आता गाडीला इंधन लागो न लागो मला मात्र प्रवासात सारखं काहीतरी खायला नाहीतर प्यायला (चहा/कॉफी) लागतं... त्यामुळे कोल्हापूर हायवेचा पहिला टोलानाका क्रॉस केला आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला.. मग मजल दरमजल करत कऱ्हाडपर्यन्त पोचलो आणि तिथे जेवण केलं...  कऱ्हाडपासून साधारण सहा किलोमीटरवर (हॉटेल पंकजच्या पुढे) सर्विस रोडनी उजवीकडे एक कळे ( म्हसोलि/येवती) फाटा लागतो .. तिकडे वळालो आणि मग सिंगल लेन रस्ता लागला (नाशिक हायवेसारखा गजबजलेला अजिबात नाहिये तो) रस्ता अतिशय उत्तम आहे.. पुण्या(वाकड)पासून साधारणपणे अडिचशे किलोमीटरवर पावनखिंड रिसॉर्ट आलं...

पार्किंग अतिशय मोठं आहे... एखाद्या सराईत ड्रायवरसारखं लगेच मी झाडाखाली सावली बघून गाडी पार्क केली... रिसॉर्टवाल्यांकडे एक ढकलगाडी आहे, त्यात सामान भरून आम्ही रूमकडे रवाना झालो...

रूम्स (आणि मुख्यतः वॉशरूम्स) कमालीच्या स्वच्छ होत्या... पुणेरी मैनेजमेंट असल्याने प्रत्येक ठिकाणी सूचना (पक्षी:पाट्या) दिसल्या (टू बी ऑनेस्ट, त्या अतिशय हेल्पफुल ठरल्या) जाळीच्या दरवाजावर "हा दरवाजा नेहेमी बंद ठेवा", वॉशरूमच्या बेसिनवर "इथले पाणी अतिमृदु आहे, त्यामुळे थोडासाच् साबण पुरतो.. एक्सट्रा साबण बेसिनला चिकटून राहील आणि तो जाणार नाही" अशा प्रकारच्या मार्मिक सूचना लिहिल्या होत्या...

पुण्याच्या शिरगांवकर दांपत्याने (नवरा इंजीनियर आणि बायको आर्किटेक्ट) 94 साली हे रिसॉर्ट सुरु केलं... ठायी ठायी त्यांची कल्पकता दिसून येते... पाली, सरडे, इतर कीडे आत घुसू नयेत म्हणून दरवाजाला आणि खिडक्याना केलेल्या जाळ्या (माझ्या घराच्या जाळ्या 2 वर्षातच फाटायला सुरुवात झालिये), रूम्समधे आणि बाहेरही रिसॉर्टमधे वापरलेले (मोस्टली सोलर एनर्जीवर चालणारे) छोटे छोटे दिवे, चहा/कॉफीचे कप वापरून झाल्यावर ते टाकून द्यायला केलेल्या दंडगोलाच्या आकाराच्या लोखंडी नळ्या आणि अशा अनेक गोष्टी (ज्या लेखात पुढे ओघानि येतीलच)

फ्रेश झालो आणि लगेचच रिसॉर्टवाल्यानी आम्हाला जवळच्याच एका धरणावर नेलं... ह्यांनी टेम्पो किंवा जीपला वरती अजुन एक मजला तयार केलाय... ज्यायोगे तुम्हाला आजुबाजुचं जंगल एका वेगळ्याच अँगलनी बघता येतं... मला तर मुंबईच्या डबलडेकरमधे वरती बसल्याचा फील आला, रियली टू गुड़....

डैमच्या बैकवॉटर पाशी गेल्यावर रिसॉर्टच्या ड्रायवर कम गाईड काकांनी आम्हाला बाजूच्या घनदाट जंगलातून पायी एक लांब टूर घडवली  (इंग्लिश पिक्चर बघायची सवय असल्यानी, इथे एनाकॉन्डा तर येणार नाहीना अशी सारखी भीती वाटत होती).... काही लोक त्या पाण्यातून ट्यूबने (किंवा ज्यांना पोहता येतं ते पोहत) दुसऱ्या टोकाला पोहोचले... इथे महाराष्ट्रात सगळीकडे पाण्याची वानवा असताना ते भरपूर पाणी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं...(लातूरला जसं ट्रेननी पाणी पोहोचवलं तसच इथलं मुबलक पाणी मराठवाड्यात घेवून जावं का असा एक समाजोपयोगी विचार मनात आला)  साधारण पाच सहा किलोमीटर तंगडतोड करून गाडिपाशी परत आल्यावर त्यांनी कूलर मधलं गारेगार पाणी देवून सगळ्यांची तहान भागवली...

रिसॉर्टवर (डबलडेकर मधून) परत आल्यावर त्यांनी लगेच चहा/कॉफी सेंटरकड़े नेलं... इथे रिसॉर्टच्या साधारण मध्यभागी त्यांनी ते बनवलय... चहा आणि कॉफीचे थर्मास भरून ते वेळोवेळी रिफिल करतात... ह्या कौलारू सेंटरच्या प्रत्येक दिशेचं एक कौल त्यांनी काढून ठेवलय, ज्यायोगे दिवसा तिथे मुबलक प्रकाश येईल आणि लाईटची गरज भासणार नाही.... तसेच, रूम्समधे इंटरकॉम दिलेला नाही, रूम सर्विससाठी तुम्हाला डायनिंग हॉल पर्यन्त जावं लागतं (आणि त्याच्या आधीच हे टी/कॉफी सेंटर लागतं)
त्यामुळे कमितकमी मनुष्यबळामधे हे लोकं एवढं मोठं रिसॉर्ट मैनेज करतात ..

नंतर आम्ही रिसॉर्टच्या एंटरटेनमेंट सेक्शनला गेलो... तिथे कराओके होतं, शंभरच्या वर गाणी आणि आपला भसाडा आवाज ऐकायला कोणी नाही ह्या संधिचा फ़ायदा उठवून रोमॅंटिक, दर्दभरे, किशोर/मुकेश/रफ़ी/महम्मद अझीज/नितीन मुकेश/उदित/सोनू/कुमार सानू असे वाट्टेल त्या कॉंबिनाशनचे गाणे गाऊन घेतले... इतर लोक आल्यावर मग टेबल टेनिस, सापशिडी आणि कैरम खेळलो...

नंतर "चला जेवायला" ह्या अत्यंत उत्साहवर्धक ( आणि खुप वेळापासून वाट पहात असलेल्या) हाकेला ओ देत डायनिंग सेक्शनकड़े पळालो...भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, लोणी, ताक, भात, वरण असा दमदार मेनू (नॉनव्हेज वाल्यांसाठी तांबड़ा/पांढरा रस्सा, मटन) होता... तुडुंब जेवल्यावर हात धुवायला बम्बाच पाणी आणि खाली घंगाळं असा राजेशाही थाट होता(इथे उष्टे पेले, वाट्या, ताट, चमचे आणि ताटातलं उरलं सुरलं टाकायला वेगळे सेक्शन आहेत.)

दिवसभराच्या प्रवासाने आणि संध्याकाळच्या पायपीटीने दमल्यामुळे अंथरूणाला पाठ टेकताच झोप लागली (बाय द वे, इथे एसी, नॉन-एसी, डीलक्स, सुपर डीलक्स अशा रूम्स नाहीत... उन्हाळ्यात, एप्रिल
मधेहि, पंख्याचं वारं पुरत.. कारण इथे अजिबात उकाडा जाणवत नाही)

डे 2
-----
सकाळी उठून पहिले चहा/कॉफी प्यायला गेलो (त्याची वेळ त्यांनी 6.30 ते 8.30 अशी ठेवलिये.. स्वभावधर्माला अनुसरून मी शार्प 8. 25 ला तिथे पोहोचलो :-))
त्यानंतर ब्रेकफास्टची वेळ 8.30 ते 10.30... ह्यावेळी मात्र मी स्वतःत कमालीची इम्प्रूवमेंट घडवून शार्प 10 ला तिथे पोहोचलो... तरीही ब्रेकफास्ट करणारा मी रिसॉर्टचा शेवटचा मेंबर होतो  (मी काही फारसं मनाला लावून नाही घेतलं म्हणा ते पण रिसॉर्ट स्टाफ च्या कपाळावरच्या आठया मात्र मी उत्सुकतेनि मोजून घेतल्या)  लुसलुशित आलू पराठे लोण्यासोबत चापून , परत एक कॉफी ओरपून घरच्यांसोबत डबलडेकरमधे पावनखिंडीकडे कूच केलं

पक्का डांबरी रस्ता आणि दुतर्फा घनदाट जंगल अशा निसर्गरम्य प्रवासाला आमची सुरुवात झाली...इथे गवा, साळीन्दर, सांबार असे विविध प्राणी दिसतात असं आमचा ड्रायवर कम गाईड सांगत होता.. आम्हाला मात्र चार्ल्स डार्विन काकांचा आवडता प्राणी माकडच ठिकठिकाणी दिसत होता.. एके ठिकाणी सगळ्या गाड्या अचानक थांबल्या.. आमचे गाईड म्हणाले, "वरती बघा जांभळं".. खरोखरच जांभळानी लगडलेल्या अनेक फांद्या आमच्या हातात आल्या... आपण नेहेमी खातो त्यापेक्षा लहान (साधारण बोराच्या आकाराची) जांभळं आम्ही तोडून खाल्ली... सरप्राइजिंगलि, अतिशय गोड होती ती...

पुढे विशाळगडाकडे जाणाऱ्या घाटात गाड्या पुन्हा थांबल्या... आमच्या गाडीत एक मोठा स्पीकर होता, त्यावरून रिसॉर्ट ओनरच्या आवाजात पावनखिंडीची माहिती देणारी कैसेट सुरू झाली...ती थोडक्यात सांगतो

एका दिशेला दूरवर पन्हाळा किल्ला आहे... शिवाजी महाराजांच्या काळात त्याला एकदा सिद्दी जौहरचा वेढा पडला... बऱ्याच दिवसानंतर किल्ल्यातली धान्यसामुग्री संपल्यावर महाराजांनी रात्रीत 600 मोजक्या मावळ्यांसोबत विशाळगड़ाकडे कूच करायचं ठरवलं... घोड्यांच्या टापांचा आवाज टाळण्यासाठी सगळे भर पावसात पायी निघाले (महाराज पालखीत होते)... शत्रूसैन्याची दिशाभूल करण्यासाठी महाराजांचा वेश परिधान करून शिवा न्हावी काशिद दुसऱ्या रस्त्यानि मोजक्या मावळ्यांसोबत निघाला... काही वेळानी सिद्दीच्या लोकांना महाराज पळाल्याची खबर लागली आणि त्यांनी घोड्यावरून पाठलाग करत शिवाला गाठलं... अंधारात नीट न समजल्याने ते शिवाला महाराज समजून सिद्दिकडे घेवून आले... उजेडात नीट पाहिल्यावर सिद्दीला खरा प्रकार समजला आणि त्याने तिथल्या तिथे शिवाची गर्दन छाटायचा हुकूम दिला...(इथे अंगावर पहिल्यांदा शहारा आला आणि नकळत डोळे पाणावले.. मनोमन शिवाला वंदन करून आतापर्यंत ऐकलेल्यातली सगळ्यात घाणेरडी शिवी सिद्दीला दिली)

मग सिद्दीच् सैन्य खऱ्या महाराजांच्या मागे लागलं... विशाळगडाच्या अलीकडे एका गावात महाराज आणि त्यांच्या मावळ्याना त्यांनी गाठलच.. घमासान युद्ध सुरू झालं... शत्रूसैन्य खुप जास्त असल्यानं बाजीप्रभू देशपांडे ह्या महाराजांच्या सरदारानी "मी इथे 300 मावळ्यांसोबत ह्यांचा मुकाबला करतो तुम्ही विशाळगड़ाकडे  कूच करा... गडावर पोचले की तोफांची सलामी दया म्हणजे आम्हाला तुम्ही सुखरूप पोहोचल्याचं समजेल.. तोवर आम्ही ह्यांना अडवून धरतो" असा हट्ट धरत महाराजांना बळेच जायला भाग पाडलं...(लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे वाक्य आठवले) महाराज नाखुशीनेच तिथून निघाले.. सिद्दिचे हजाराच्यावर सैनिक विरुद्ध बाजींचे केवळ 300 मावळे असं अशक्यप्राय युद्ध सुरू झालं...

इथे मराठ्यांचा गनीमी कावा (परत एकदा) उपयोगी पडला... बाजीच्या सैन्यानी मोठ्या हुशारीनि सिद्दीच्या सैन्याला अरूंद अशा पावनखिंडीत यायला भाग पडलं..बाजींचा जो अंदाज होता त्यापेक्षा बराच जास्त वेळ महाराजांना गडावर पोहोचायला लागला.. पावसामुळे त्यांना वेळ लागला  आणि नंतर विशाळगडाला दुसऱ्या एका शत्रूसैन्याचा वेढा पडला होता.. त्यांच्याशी लढायला प्रत्यक्ष महाराज पालखीतून उतरले असं सांगतात... गडावर पोहोचल्यावर त्वरेने महाराजांनी तोफा डागण्याचा आदेश दिला.. पण पावसाळा असल्या कारणाने सगळ्या तोफा मेण भरून आतमधे ठेवल्या होत्या... त्यांना तयार करून तोफा डागूस्तोवर अजुन वेळ गेला...

साधारण दहा, साडेदहाला लढायला सुरू केलेल्या बाजीच्या सैन्याला तोफांचा आवाज ऐकू यायला संध्याकाळाचा पहिला प्रहर (साधारण चार साडेचार वाजले असावेत) उजाडला...तोवर बाजींच्या अंगाचा असा एकही भाग शिल्लक राहला नव्हता जिथे जखमा झाल्या नसतील... तोफांचा आवाज ऐकून बाजीप्रभू, त्यांचे बंधू फुलाजी ह्यांनी समाधानानी प्राण सोडले.... बाजीप्रभूंसोबतचे तसेच महाराजांसोबतचे किती मावळे ह्या मोहिमेत धारातीर्थी पडले ह्याची आपल्या इतिहासात (दुर्दैवाने)नोंद नाही...(हे सगळं ऐकून डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या होत्या) धन्य ते महाराज !!! धन्य ते बाजीप्रभू!!! आणि धन्य ते स्वामिनिष्ठ मावळे!!!!

पावनखिंडीला जायच्या रस्त्यावर साधारण सहा किलोमीटरचा पैच अतिशय खराब आहे... ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या वाहनातून सावकाश जाणे श्रेयस्कर...
(कारण ह्यांच्या डबलडेकरला सस्पेंशन नावाचा प्रकार जवळपास नाही म्हंटले तरी चालेल).....पावनखिंडीत उतरायला एक अरूंद अशी लोखंडी शिडी बनवलिये... आम्ही लहान मुलांना घेवून न जाण्याचा निर्णय घेतला होता पण आम्ही खाली उतरल्यावर आमच्या गाईड लोकांनी मुलांना कडेवर घेवून यायला सुरुवात केली.. ते पाहून माझी जाम टरकली... मी लगेच मनात रामरक्षा/भीमरूपी म्हणायला सुरुवात केली..(मला बाकीचं काही येतं नाही, नाहीतर गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, पुरूषसूक्त, स्त्रीसूक्त असे सगळे श्लोक नक्कीच म्हंटले असते)

त्या खिंडीत पुढे पुढे जाताना आम्हाला त्रास होत होता तर बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे इथे तासनतास कसे लढले असतील ह्या विचाराने अंगावर सर्रकन काटा आला...   भारावलेल्या अवस्थेत आम्ही सगळे खिंडीतून वर आलो आणि रिसॉर्टवाल्यानी सगळ्यांना कूलरमधून आणलेलं गारेगार, सुमधुर कोकम सरबत दिलं... सगळ्यानी निदान 4, 5 ग्लास तरी सरबत पिलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...

 येताना मधे आमच्या गाड्या थांबल्या आणि जंगलात थोडंसं आत बार्बेक्यूची मेजवानी मिळाली.. व्हेज वाल्यांसाठी भाजलेले बटाटे, वांगी, स्वीट कॉर्न, ढोबळी मिर्ची तर नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन असा जंगी मेन्यू होता... मग जेवायला साग्रसंगीत स्वैपाक आणि वामकुक्षी घेवून झाल्यावर गरमागरम चहाची मेजवानी होती...

रिसॉर्टवर आल्यावर आम्ही स्विमिंगपूल मधे दोन तीन तास डुंबलो आणि मग (भसाड्या आवाजात) कराओके, सापशिडी, कैरम खेळून रात्रीचं जेवण घेतलं...रिसॉर्ट मधे झोके, झोपाळे, मोठ्ठी घसरगुंडी असल्यामुळे मुलांनी खुप एन्जॉय केलं... तुम्ही जर ब्रश, पेस्ट, दाढीचं सामान, बर्मूडा, इत्यादि गोष्टी आणायला विसरला असाल तर रिसॉर्टचं नो सेल्समन वालं एक दूकान आहे... जिथे तुम्ही हव्या त्या वस्तू विकत घेवून त्यांच्या कॅश बॉक्समधे पैसे ठेवू शकता ..

डे 3
------

ब्रेकफास्ट घेवून एडीशनल पैसे देवून (अडवांस पेमेंटव्यतिरिक्त डैमच्या आणि पावनखिंडीच्या सफारीचे फक्त 1750/- द्यावे लागले)...जड अंतःकरणानि आम्ही साधारण साडेदहाला पुण्याकडे प्रस्थान ठेवलं... खाली काही फोटोज शेयर करतोय..


सामान ने-आण करण्यासाठीची ढकल गाडी

रिसॉर्ट

हात धुवायला असलेला बंब 
     
                     

स्विमिंग पूल

घसरगुंडी


चहा/कॉफी सेंटर

पावनखिंड स्मारक


प्रत्यक्ष पावनखिंड


खाली उतरायला केलेला लोखंडी जिना


गावातल्या लोकांनी बाजींच्या स्मरणार्थ लावालेला फ्लेक्स



पावनखिंड लढाईची माहिती


रिसॉर्टची डबलडेकर


जंगलातलं बार्बेक्यू



पावनखिंड



डैमचं बैकवॉटर


Sunday, March 20, 2016

कॉलेज रियूनियन

माझ्या एका मैत्रिणीला कॉलेज रियूनियनसाठी एक राईट-अप लिहून हवं होतं.. कॉलेज लाईफ आठवून मग हे लिहिलं -

एक नेहेमीसारखीच संध्याकाळ.... दिवसभराच्या कामानी तुम्हाला जाम शीण आलाय.. तेवढ्यात बाहेर अंधारून येतं, ढग कडाडू लागतात, विजा चमकू लागतात आणि पाऊस सुरू होतो.. ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध तुम्ही डोळे बंद करून, मोठ्ठा श्वास घेत, छातीभर भरून घेता..  आणि अचानक तुम्हाला कॉलेजच्या ग्रुप सोबत धो धो पावसात खाल्लेली कांदा/मिर्ची-भजी आणि  सोबतीने फुंकर मारत पिलेला गरमागरम, वाफाळलेला आल्याचा चहा आठवतो.. आठवतो ना?

ऑफिसमधे नेहमीसारखीच कंटाळवाणी मीटिंग चालु आहे.. बॉसच्या समोरच बसल्याने तुम्हाला मोबाईलवर पण टाईमपास करता येत नाहिये. जांभया देत, कशीबशी झोप आवरत तुम्ही बळच माना डोलवत बसलाय आणि अचानक तुम्हाला कॉलेजमधलं लेक्चर आठवतं. सर/मैडम फळ्यावर लिहायला वळाले की एकमेकांना खाणा-खुणा, इशारे करायचे...कागदाचे, खडुचे छोटे तुकडे हळूच आपल्या मित्र/मैत्रीणीला  फेकून मारायचे...बाजूच्याशी नोटबुकमधे '0'आणि 'X' चा गेम खेळायचा आणि सर/मैडमची पाठ वळाली की हसू दाबत गंभीर चेहरा करायचा.. बरोबर ना?

तुम्हाला एक दिवसाची सुट्टी हवी आहे.. तुम्ही बॉसकड़े जाता.. मार्च-एंड आहे, प्रोजेक्ट डेडलाइन आहे इथपासून तर थेट अशी कशी एकदम सुट्टी मागता रे तुम्ही लोकं, प्रि-प्लांड लीव असेल तरच मी अप्रूव करणार अशी उत्तरं मिळतात.. तुमचा हिरमोड होतो आणि डेस्ककड़े परत जाताना एकदम तुम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात... मैटिनी शो बघण्यासाठी सगळ्या ग्रुपनी ठरवून केलेला मास बंक आठवतो आणि प्रोफेसर्सला घाबरणाऱ्या मित्र/मैत्रिणिना - घाबरू नका रे, एक दिवस लेक्चर्स नाही केले तर काही फरक पडत नाही असा दिलेला दिलासा आठवतो... आठवतो ना?

तुम्ही तुमच्या गाडीतून घरी येत असताना तुमचा गाणी ऐकण्याचा मूड बनतो... मग तुम्ही रेडियो लावता तर (as usual) झाडून सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर  एकाच वेळी जाहिराती लागलेल्या...  अस्वस्थ होऊन तुम्ही दोन चारदा सगळे स्टेशन्स बदलून बघता पण नो लक.. वैतागून तुम्ही रेडियो बंद करणार तेवढ्यात एका स्टेशनवर 'पुरानी जीन्स और गिटार' गाणं लागतं.. तुम्ही गाड़ी स्लो करता... गाणं जसजसं पुढे जात राहातं तसतसं तुम्ही कॉलेजच्या आठवणीत गुंग होत जाता... विशेषत: "पहुचना कॉलेज हमेशा लेट, वो केहेना सर का गेट आऊट फ्रॉम द क्लास... वो बाहर जाके हमेशा केहेना यहाँ का सिस्टम ही है ख़राब" ह्यावर तुम्ही स्वतःशीच हसता...हसता ना?

ऑफिसची पार्टी चालू आहे.... सूप, सैलड, पापड, रायत्यापासून तर डेझर्टपर्यन्त मुबलक पदार्थांची रेलचेल आहे.. तुम्ही सगळं थोडं थोडं घेत खायला बसता... अचानक तुम्हाला कॉलेजच्या कैंटीनमधे गैंग सोबत चार पाच फ्रेंड्समधे प्रत्येकी एखाद दोन चमचे खाल्लेली मिसळ किंवा सात आठ फ्रैंडसमधे खाल्लेले 4 वडापाव आठवतात आणि मग तुम्हाला समोरचं, एकसे एक पदार्थानी भरलेलं, ताट - मिसळ आणि वडापावपुढं फिकं वाटू लागतं...खरंय ना?

👆🏽 कॉलेज लाईफच्या ह्या आणि अशा अनेक आठवणी येऊन तुम्ही नक्कीच नॉस्टॅल्जिक होत असणार..

चला तर मग, ह्या आठवणीना ऊजाळा देऊ या... खुप हसू या, धमाल करुया आणि कॉलेज लाइफ पुन्हा एकदा एन्जॉय करू या

Wednesday, January 27, 2016

केळशी

26 जानेवारीला मंगळवार आलेला पाहुन एखाद्या सराईत सुट्टीटाक्यासारखी मी पटकन 25 ची लिव्ह रिक्वेस्ट टाकली. चीते की चाल, बाझ की नजर और हृषी के लीव्ह प्लानिंग का कोई मुकाबला नहीं असा उगीचच आत्मप्रौढीचा एक टुकार डायलॉग सुचला :-)

असो, 4 दिवस तंगड्या वर करुन लोळत पडण्याच्या आळशी महत्वाकांक्षेला बायकोनी पहिला सुरुंग लावला.  ऑफिसात जाणार नसशील तर ट्रिप ला जायच असा एक क्रूर फतवा निघाला.  26 जानेवारीला सोसायटीत झेंडावंदन,राष्ट्रगीत असतं असा मी तत्परतेनी युक्तीवाद केला. त्यावर, इतर वेळी महत्वाची कामं हमखास विसरणाऱ्या बायकोनी, स्मरणशक्तीला जराही ताण न देता, गेले 3 वर्ष मी 26 जानेवारीची सकाळ अंथरुणात लोळत काढत आलो आहे अशी (न विचारता) माहिती पुरवली. आता चारीमुंडया चित झाल्यामुळे ट्रिप च ठिकाण शोधणं क्रमप्राप्त झालं.

एकंदरीतच मला गजबजलेल्या ठिकाणी ट्रिप ला जायचा तिटकारा. त्यामुळे फार लांब नाही आणि तुरळक गर्दीचं ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातलं केळशी फायनल केलं.
 (आणि तिसरं सर्वात महत्वाचं पण सीक्रेट कारण म्हणजे समुद्रकिनारी ट्रिप ला गेल्यावर फार काही धावपळ करावी लागत नाही.. सकाळ, संध्याकाळ बीचवर निवांत जाऊन बसलं की झालं :-)) आमचे एक नातेवाईक नुकतेच केळशीला जाऊन आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून तिथल्या मुक्कामाचा पत्ता घेऊन चटदिशी बुकिंगपण करून  टाकलं. आता ह्या फास्टट्रैक कामगिरीवर खुश होईल ती बायको कसची. (नेहमीसारखच ह्याही वेळी)नेट वर सर्च न करता (आळशासारखं) आयतं बुकिंग पदरात पाडून घेतलं हे ऐकावं लागलं.

अखेर केळशीला जायचा तो डी-डे उगवला. कोकण म्हणजे खराब रस्ते ही खूणगाठ मी आधीच मनाशी बांधली होती, त्यामुळे प्रवासाचा काही त्रास जाणवला नाही. आणि तसपण मला मुक्कामी पोहोचण्यापेक्षा जातानाचा प्रवास जास्त आवडतो. एखाद्या ठिकाणी चहा, मिसळ हादडावी, पुढं जाऊन मग उसाचा रस प्यावा आणि मग ड्राईवर ला झोप येते ह्या सबबीखाली परत एक दोन चारदा चहा मारावा ह्या माझ्या सुखकर प्रवासाच्या कल्पना :-) बायकोनी किंवा आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर बघा तुमच्यासाठी एवढी ट्रिप काढतोय मग स्वतःसाठी एवढं पण करू नको का? हे नेहमीचं यशस्वी इमोशनल ब्लैकमेलिंग कामी येतं :-)

माणगाव, मंडणगड ही मोठी गावं सोडली आणि मग खरा कोकण सुरु झाला. लाल मातीचा धुराळा आणि ती माती अंगावर पडल्यामुळे कुस्ती खेळून आल्यासारखी दिसणारी रस्त्यालगतची झाडे,झुडपे.. अधुन मधून दिसणारी ऊंच, शिडशिडीत नारळ, सुपारीची झाडं आणि अर्थातच  खरवडून काढल्यासारखे दिसणारे (आणि जाणवणारे) बैलगाडीतून जायच्या योग्यतेचे रस्ते..

रस्त्यावर इतके भयंकर खाचखळगे की शोले मधल्या बसंतीच्या टांग्यासारखं आपल्याही गाडीचं चाक निखळून पडतं की काय अशी धास्ती वाटायला लागली..

केळशीच्या फाट्यावर एका मच्छी विकणाऱ्या आजीबाईनी लिफ्ट मागितली. गाडीत बसल्यावर त्यांनी विचारलं कुठून आला पावनं? पुण्याहून अस सांगितल्यावर त्या म्हणाल्या बऱ्याच लांबनं आलात की. ह्यावर मी बायकोकडे विजयी मुद्रेनी एक कटाक्ष टाकला की बघ किती लांबचं ड्राइविंग करत आलोय आणि त्याचं ह्या परक्या आजीबाईनाही कौतुक आहे.  पण पुढच्या क्षणी, पुण्याचं काय घेऊन बसलाय पार  लांब लांबनं लोक येतात इथे अस बोलून त्या आजीबाईनी माझं विमान लगेच खाली उतरवलं. आता ह्या आजीना इथेच उतरवुन द्यावं आणि म्हणावं की ते लांब लांबचे लोक सोडवतील तुम्हाला इथून घरी असा एक असुरी विचार मनात आला पण माझ्यातल्या सहृदयी माणसानी तो लगेच झटकुनही टाकला.

असो, त्या आजींना त्यांच्या घरापाशी सोडल्यावर त्यांनी लगेच मला 20 रुपये देऊ केले.  त्यांना नकार देत पुढं आलो तर बायको म्हणाली तरी सांगत होते दाढी करून ये, जरा बरे कपडे घाल. ती तुला सिक्स सीटर वाली समजली. आणि मग स्वतःच्या जोकवर एकटीच जोराजोरात हसली. नशीब माझा मुलगा झोपला होता नाहीतर पुण्यात परतल्यावर आमच्या बाबांना तिकडे सिक्स सीटर वाले समजले असं सगळ्यांना सांगितलं असतं. आजीना मधेच न उतरवु दिलेल्या माझ्यातल्या त्या सहृदयी माणसावर चरफडत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो.

ते घरगुती रिसॉर्ट अगदी बीच ला लागुनच होतं. पण आमची रूम आणि वॉशरूम पाहिल्यावर मला एकदम आम्ही लहानपणी वाड्यात राहायचो त्याची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ओला नारळ किसून, कोथिंबीर भुरभुरून घातलेले चविष्ट कांदा-पोहे खाऊन आम्ही बीचवर गेलो.  इथली वाळू अतिशय मऊ आणि चमकदार. बीच बऱ्यापैकी निर्जन. तो भलामोठ्ठा किनारा पाहून माझ्या मुलानी चपला भिरकावून दिल्या आणि पळत सुटला. मी बायकोचं लक्ष नाही अस पाहून तिथल्या एकमेव झोपडीवजा हॉटेलात चहा ऑर्डर केला (ऑलरेडी दोन कप पीऊन झाला होता :-))

चहा पिऊन मग मुलासोबत खेळायला बीचवर गेलो. मधल्या ओलसर पट्टयात छोट्या किड्यांनी/खेकडयानी छिद्र पाडून घरं बनवली होती. ते तुरुतुरु पळायचे तेव्हा त्यांच्या पायामुळे ठिकठिकाणी टिंबांचे सुबकसे डिजाईन तयार व्हायचे. बरेचसे डिजाईन मला नारळाच्या झाडासारखे वाटले.

बायकोनी मुलाला एक छोटीशी बादली दिली आणि मग आम्ही तिघे शंख शिंपले गोळा करायच्या मोहिमेवर रवाना झालो.  पांढरे शुभ्र, गुलाबी, जांभळे, ऑरेंज कलरच्या अनेक शिंपल्यानी त्याची बादली भरून गेली.  गंमत म्हणजे आम्हाला एकही शंख सापडला नाही. नवीन शिंपला सापडल्यावर प्रत्येक वेळी मुलगा आनंदानी जल्लोष करत होता. गाडया, चॉकलेटं, मोबाईल/टॅब वरचे गेम्स हे मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आणि वेगळा आनंद त्याच्या निरागस डोळ्यात आम्हाला त्यावेळी दिसला. तीच गोष्ट वाळुचा किल्ला बनवताना.  त्याच्यासोबत आम्हीही आमचं बालपण एन्जॉय केलं. सर्वात सुंदर आणि कायमस्वरूपी आनंद देणाऱ्या गोष्टी निसर्गात मोफत उपलब्ध असतात अशा काहीशा आशयाचा एक सुविचार आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. शेवटी कडक ऊन व्हायला लागल्यावर मुलाला नाईलाजानी बळजबरी बीचवरून ओढून न्यावं लागलं.

 पुढच्या दोन दिवसात आम्ही आजुबाजुची ठिकाणं बघितली.  केळशीतच एक याकूब बाबा दर्गा आहे. ते शिवाजी महाराजांचे सातवे गुरु म्हणून ओळखले जातात. तिथे जाताना परत एक आज्जी भेटल्या आणि त्यांना घरी सोडल्यावर त्यांनी पण 20 रुपये देऊ केले. ह्यावेळी, मागल्या वेळेपेक्षा, दाढी  जास्त वाढली होती त्यामुळे त्या आज्जीना मी बेनिफिट ऑफ़ डाउट दिला :-)

नंतर आम्ही अंजर्ले आणि हर्णे (किंवा हरणाई) ही सुंदर गावं/समुद्रकिनारे पाहिले.  अंजरल्याहुन हर्णेला जाताना घाटात अगदी मोक्याच्या ठिकाणी व्हिला 270 म्हणून एक पॉश हॉटेल दिसलं. त्या स्पॉट वरून खाली दिसणारा देखावा अतिशय निसर्गरम्य होता. अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र, त्याला लागून असलेला सुंदरसा किनारा, छानशी कौलारु घरं आणि आजुबाजुला नारळाची झाडं. त्या हॉटेल च ऑनलाइन बुकिंग करता येतं अस समजल आणि मग एक दिवस इथे नक्की रहायला यायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली.

एक दिवस आम्ही वेळासला गेलो. इथला समुद्रकिनारा तुलनेनी छोटा पण अगदी सुनसान. इथे हजारो कासवं फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान  अंडी घालायला येतात आणि चिपळूणची एक संस्था, वेळास ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्या अंडयांच संरक्षण करते. ते पहायला खूप पर्यटक येतात. नाना फडणवीस सुद्धा ह्याच गावचे. त्यांचा जुना वाडा पडून तिथे फक्त एक चौथरा शिल्लक आहे. त्यावर नानांचा एक अर्धाकृती पुतळा उभारला आहे. ह्या भागात हॉटेलं जवळपास नाहीच. मग तिथल्याच् एका घरगुती खानावळीत जेवून केळशीला परतलो.

शेवटच्या दिवशी निघायच खर तर अगदी जीवावर आलेलं.  उसनं अवसान आणून 9 ते 6 च्या रूटीन मधे अडकायला पुण्याकडे परत निघालो. बायको आणि मुलगा जाम खुश दिसले आणि मीही आता पुढचे सात आठ वीकेंड तरी तंगड्या वर करत  आराम करायला मोकळा ह्या आनंदात गाड़ी स्टार्ट केली :-)

Saturday, January 23, 2016

सूर्या....

उठलोय भल्या पहाटे जाब विचारायला त्या लालभडक गोळ्याला, सूर्य नावाच्या पक्षाला...

हेच की रोज पूर्वेकडच्या भांडवलशाही   स्वार्थानी पिचपिचलेल्या प्रदेशातूनच उगवायचा तू ठेका घेतला आहेस का?

अरे तू स्वयंभू आहेस की नाक्यावरल्या शेटजींच्या कोळशाच्या फैक्ट्री चा मुकादम???

तू जोवर येतोस ना तुझ्या आवडीच्या प्रदेशांना प्रकाश बहाल करत आमच्याकडे, तोवर गारठुन गेलेली असतात आमची शरीरे आणि मनेही

एकदा तरी आमच्या इकडून उगवुन बघ जरा, डोक्यावर घेऊन नाचू तुला, भले तुझ्या आगीत आम्ही ख़ाक झालो तरीही

जीवाच्या आकांतानी एवढा आक्रोश करूनही मला पूर्ण खात्री आहे की तू उद्या परत त्याच सुखवस्तु, साखरझोपेत असणाऱ्या श्रीमंत लोकांच्या बंद भिंतींवर ईमान इतबारे प्रकाश फेकत, सवडीने, तुझी चातकासारखी वाट पाहणाऱ्या आमच्याकडे येणार

चूक तुझी नाहिये रे कारण तू आहेस दिलेलं काम निमुटपणे, शुष्कपणे करणारा थंड रक्ताचा एक भावनाविरहीत लालबुंद गोळा........

एक विद्रोही व्हॉट्सऍप कविता

डिस्क्लेमर: ही एक काल्पनिक कविता असून तिचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी/वृत्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा

****************************

मेसेज वाचून ढिम्म पणे आपल्या सुखवस्तु आयुष्यात परतणारी मतलबी गिधाडं,

फक्त मोजक्या उच्चभ्रूनाच छान म्हणणारे  कोत्या वृत्तीचे कावळे,

गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करुन गपगार पडणारे थंड रक्ताचे अजगर

लांबलचक मेसेज कुरतडल्यासारखा वाचून लगेच वाह वाह करणारे अल्पसंतुष्टी उंदीर,

नविन मेसेज आला की लगेच अधाशासारखा वाचणारे वखवखलेले भुकेले कुत्रे,

ग्रुपवर आलेल्या नविन माणसाचे लचके तोडायला हपापलेला लांडग्यांचा कळप,

दिवसभर नेट बंद ठेवून रात्री सगळे मेसेज वाचणारी वटवाघळं,

ग्रुपवर शांत असण्याचं ढोंग करुन पर्सनल ला हळूच मेसेज करणारे धूर्त कोल्हे,

असे बूर्ज्वा लोक इथे असताना मी का रहावं या वाॅटस्अॅप च्या जंगलात??
...