Tuesday, March 26, 2013

रात




परवा परत एकदा रात बघितला आणि जाणवलं की नव्वदच्या दशकात जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा जेवढा भारावून (इथे घाबरून असं वाचा) गेलो होतो तेवढाच प्रभाव आज १५-२० वर्षांनीही जाणवला.  आपण नेहेमी म्हणतो की हिंदी हॉरर मूव्हीज हॉरर कमी आणि कॉमेडी जास्त वाटतात (रामसे बंधूचे चित्रपट आठवून बघा). खरं आहे ते म्हणा.. चित्रविचित्र चेहेरे, टोमॅटो सॉसनी आंघोळ केल्यासारखं भूत/हडळ, लहानपणापासून फक्त कॅल्शियम खाल्लंय की काय असं दाखवून देणारे लांबलचक दात/सुळे, टूथपेस्ट/टूथब्रशचा शोध अजून लागायचा आहे असं वाटणारे आणि कायम राख/मिश्रीसारख्या पदार्थांनी घासत असल्यासारखे ते काळे़क्कुट्ट दात, एकाचवेळी साधारण १० लाख धूप पेटवल्यासारखा तो धूर आणि त्यातून प्रकट होणारं भूत/हडळ. हेच पहायची सवय लागली होती आपल्याला.

भूताचं फक्त अस्तित्व जाणवून देणं आणि वरती सांगितल्यासारखी रंगरंगोटी न करता सुद्धा हॉरर चित्रपट बनू शकतो हेच आपण विसरलो होतो. अशातच ९२ साली राम गोपाल वर्माचा रात आला.  चित्रपटाच्या पोस्टरवर जरी रामसे बंधूंटाईप लाल डोळ्यावाली, निळ्या तोंडावाली हडळ असली तरी चित्रपटात ते अगदी शेवटी दाखवतात. 

चित्रपट सुरु होतो तो एका सुनसान गावापासून.  एक बस थांबते आणि रेवती बसमधून उतरते. तिला गावात कोणीच दिसत नाही.  इकडे तिकडे भटकून ती एका कारपाशी येते  आणि तिला कारमधे काहीतरी दिसतं (काय ते दाखवत नाहीत, फक्त रेवतीच्या घाबरलेल्या चेहेर्‍याकडे बघून आपल्याला जाणीव होते) आणि ती सैरावैरा पळत सुटते.  अनेक घरांची दारं ठोठावते पण कोणीच उघडत नाही.  शेवटी एक घर तिला उघडं दिसतं आणि ती आत शिरते.  आतल्या खोल्यांची दारं बंद असतात आणि तेवढ्यात आत कोणीतरी येतं (फक्त अस्तित्व) आणि रेवती त्याला/तिला पाहून किंचाळत झोपेतून उठते.  अर्थातच ते तिचं स्वप्न असतं.  

आकाश खुराणा, त्याची बायको रोहिणी हट्टंगडी, मुलगी रेवती, एक नातू (ज्याचे आईवडील अॅक्सिडेंट मधे गेलेले असतात) आणि एक नोकर असे एका बंगल्यात रहायला येतात.  शेजारच्या बंगल्याची एक खिडकी दाखवतात जिथून कोणाच्यातरी श्वासांचा आवाज येत रहातो (एका आजींच्या ज्यांच्या हातात कायम जपमाळ असते). रेवती आणि शेजारच्या बंगल्यातली तिची मैत्रीण कॉलेजमधे शिकत असतात.  ह्या बंगल्याला एक तळघर असतं जिथं अडगळीचं सामान असतं.  रोहिणी हट्टंगडीला तिथे काहीतरी आहे अशी सामान हलवताना शंका येते पण तिला काही दिसत नाही.  तिच्या नातवाला मात्र तिथे एकदा मांजराचं पिल्लू दिसतं आणि मग ते मांजरांचं पिल्लू कायम त्या मुलाबरोबरच रहायला लागतं. 
एकदा आकाश खुराणा ऑफिसला जात असताना त्याच्या गाडीच्या चाकाखाली ते मांजर येऊन मरतं. नोकर लगेच त्या मांजराला पुरतो पण आता त्या मुलाला काय सांगायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो.  एक दिवस अचानक ते पिल्लू त्या मुलाच्या रूममधे येतं आणि मुलगा आनंदी होतो.  तेवढ्यात रोहिणी त्याच्या रूममधे येते आणि त्या पिल्लाला पाहून प्रचंड घाबरते.  ती आरडाओरडा करते आणि मग रेवती, तिचे वडील काय झालं ते पहायला येतात. ते तिची अशी समजूत काढतात की ते दुसरं मांजर पण असू शकतं. 

रेवती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवर पिकनिकला जाते. परत येत असताना त्यांची गाडी पंक्चर होते.  तो बॉयफ्रेंड एका माणसाकडे लिफ्ट मागून त्याच्यासोबत बदली टायर आणायला जातो आणि रेवतीला तिथेच थांबायला सांगतो.  ती रस्त्याच्या कडेला बसली असतानाच आतून झाडीमधून काहीतरी येताना दाखवतात आणि रेवतीच्या शेजारी आल्यावर तिचे केस वार्‍याने उडतात.  ती नजर वळवते आणि त्या गोष्टीकडे बघते.  त्यानंतर डायरे़क्ट तिचा बॉयफ्रेंड टायर घेऊन परत येताना दाखवला. त्याला रेवती कुठे दिसत नाही. तिला शोधत शोधत तो झाडीत घुसतो. एका तळ्याच्या काठाशी ती मान खाली घालून बसलेली दिसते.  हा तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारतो, ती डोकं वर उचलते आणि तिचे डोळे घारे झालेले दाखवतात. ते पाहून बॉयफ्रेंड जाम टरकतो आणि तोल जाऊन पाण्यात पडतो.  पुढच्याच क्षणाला ती नॉर्मल होते आणि त्याला म्हणते की तू पाण्यात कसा पडला. ते घरी परत येतात पण ती त्याच्याकडे न बघता, बाय न म्हणता तरातरा चालत घरात जाते आणि तिच्या रूममधे जाऊन झोपते. रात्री उशिरा तिचे आई-वडील येतात आणि नोकर त्यांना सांगतो की रेवती न जेवता झोपली.  तिची आई तिला बोलवायला जाते. रेवती झोपलली असते आणि दरवाज्याकडे तिची पाठ असते.  रोहिणी नाईट लँप लावते आणि रेवती डोळे उघडते. तिचे डोळे परत घारे झालेले दाखवतात. रोहिणी तिच्या जवळ येते (आपल्याला वाटतं की आता काहीतरी होईल) आणि ती झोपली आहे असं समजून नाईट लॅंप बंद करून जाते. 



रेवती, तिचा बॉयफ्रेंड आणि तिची मैत्रीण एका लग्नाला जातात. तिची मैत्रीण ज्या मुलीचं लग्न असतं तिच्या रूममधे जाते. रेवती आणि तिचा बॉयफ्रेंड खालीच बसलेले असतात.  थोड्या वेळानी तिच्या बॉयफ्रेंडशेजारी त्याचा एक मित्र येतो आणि ते दोघं गप्पा मारायला जातात.  अचानक रेवती उठते आणि एका धुंदीत चालायला लागते. जिना चढून ती टेरेसमधे जाते. तिथेच शेजारी तिची मैत्रीण आणि बाकीच्या मुली असतात. रेवतीची मैत्रीण तिला पाहते आणि टेरेसमधे जाते.  रेवती पाठमोरी असते.. ही तिला आवाज देत तिच्या जवळ जाते. रेवती वळते आणि तिचे डोळे परत घारे झालेले असतात.  ती हसते आणि तिच्या मैत्रीणीच्या जवळ जाते.  काही कळायच्या आत रेवती तिच्या मैत्रीणीची मान मुरगाळून टाकते. त्याच ट्रान्स मधे ती खाली येऊन तिच्या बॉयफ्रेंडशेजारी येऊन बसते. थोड्या वेळानी एका बाईला ती जेव्हा टेरेसमधे जाते तेव्हा रेवतीची मैत्रीण मान मुरगळल्याच्या स्थितीत मेलेली आढळते आणि मग ती आरडाओरडा करते.

आकाश खुराणाला एकदा मध्यरात्री तहान लागते. तो स्वयंपाकघरात येऊन फ्रिजमधलं पाणी पितो. तेवढ्यात त्याला वरच्या खोलीतून कोणीतरी भेसूर आवाजात रडताना ऐकू येतं.  तो वरती रेवतीच्या रूममधे पहायला जातो. त्याला रूममधे, अ‍ॅटॅच्ड बाथरूम मधे कोणीच दिसत नाही. त्याला बाल्कनी उघडी दिसते, तिथे तो जातो.  तिथेही त्याला रेवती दिसत नाही. तो पाठमोरा वळतो आणि रेवती समोर उभी असते - घारे डोळे आणि तीच भेदक नजर.  रेवती त्याचा गळा पकडते आणि त्याला जोरात ढकलून देते.  आरडाओरडा ऐकून रोहिणी वरती येते आणि मुलीला पाहून ती पण घाबरते. दुसर्‍या दिवशी ते डॉक्टरांना बोलावतात आणि एकंदर प्रसंग ऐकून ते एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात आणि तो तिची ट्रीटमेंट चालू करतो.

इकडे नोकर रोहिणीला सांगतो की तुम्ही शेजारच्या आजींना भेटा त्यांना माहितीये की ह्या बंगल्यात काय झालंय आधी ते.  त्या आजींच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एका बाईचा तिच्या नवर्‍यानी गळा दाबून खून केला होता आणि मग काही दिवसांनी त्या माणसाचा पण गळा दाबूनच खून होतो जो कोणी केला ते कधीच कळत नाही.  त्या बाईचं भूत अजूनही त्या घरात आहे आणि रेवतीच्या अंगात शिरून तिला त्रास देतंय.  आजीबाई त्यांना एका मांत्रिकाला भेटायला सांगतात (ओम पुरी). 

ओम पुरी त्यांना पाहिल्या पाहिल्या म्हणतो की मला माहितीये तुम्ही माझ्याकडे का आला आहात ते.  तो त्यांच्यासोबत बंगल्यात येतो आणि त्याला जाणवतं की इथल्या तळघरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो रेवतीच्या बॉयफ्रेंडला ते तळघर खणायला सांगतो. एक-दोन फरशा उकरून काढल्यावर एक मोठ्ठं भुयार दिसतं. हे दोघं खाली उतरतात. थोडंसं पुढं आल्यावर एक किंचित वळण येतं आणि लगेच उजव्या बाजूला एक बाई लाल साडी मधे बसलेली असते (इथे खरंच भिती वाटते).  ओम पुरी लगेच ओळखतो की हीच ती हडळ.  मग तिनी रेवतीचं रूप घेणं आणि मग त्या बॉयफ्रेंडला फसवणं हे सगळं होतं. शेवटी ओम पुरी तिच्या कपाळाला भस्म लावून तिला मुक्त करतो.  इथं मात्र मान्य केलं पाहिजे की ते काळे दात, त्या हडळीचं भस्म लावल्यावर विरघळून जाणं हे थोडं रामसे स्टाईल झालंय खरं.. पण ते अगदी ५ मिनिटांसाठी. 

शेवटी रोहिणी ओम पुरीला विचारते की हे सगळं काय आहे? त्यावर ओम पुरी त्याच्या खास आवाजात सांगतो की "जब रात का अंधेरा होता है तो हम दीप जलाते है.  लेकीन इससे अंधेरा मिट नही जाता.  बल्की एक सीमित दायरे के अंदर रौशनी हो जाती है. पर हम ये भूल जते है की इस रौशनी के दायरे के बाहर जिस अनंत अंधेरेने हमे घेर रखा  है न जाने कुदरतने उसमे क्या क्या छुपाके रखा है. ये एक अनोखी बात है के हम उसीको संसार मानते है जिसे हम समझ सकते है. लेकिन उस अंधेरे से हमे सचेत रहेना है जो अभी तक इन्सानी रौशनी के दायरे मे नही आया. हो सकता है की एक दिन इन्सान उस अंधेरे का रहस्य भी जान ले."


त्या छोट्या मुलाकडे परत मांजर दाखवून चित्रपट संपवला आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग सांगणं अशक्य आहे.  जेवढे महत्वाचे वाटले तेवढे सांगितले. कलाकारांचा अभिनय (विशेषतः रेवतीचा), बॅकग्राऊंड म्युझिक, दिग्दर्शन ह्या सगळ्या जमेच्या बाजू. राम गोपाल वर्माचा अगदी सुरुवातीचा पिक्चर होता हा.  त्यामुळे मन लावून दिग्दर्शित केल्यासारखा वाटतो. (जसं नोकरीमधे माणूस प्रोबेशन पिरीअड मधे खूप चांगलं काम करतो आणि एकदा पर्मनंट झाला की पाट्या टाकायला सुरुवात करतो तसं).

3 comments:

Stable_Boy said...

.............. हो सकता है की एक दिन इन्सान उस अंधेरे का रहस्य भी जान ले." Om puricha etka motha dialogue kase kaay lakshat rahila re... nakkich reverse-fwd kela asashil ekda tari :-)... any ways nice movie.. I haven't seen this movie yet.. its in my list of movies to be watched this year :-)

Anonymous said...

varsha zaale ajun navin lekh nahi

Unknown said...

Mi ha review aata ratri vachla ahe.. Ani Mala kharach aata zop Lagat nai ahe.. Mi movie baghitla nai.. Pan tumcha vivaran vachlyawar mi baghnar pan nai... **Compliment in disguise**